मी जरी सध्या इथे फक्त कपडे वाळत घालण्याबद्दल लिहिणार असले तरी एकंदरीत घर सांभाळणे, राखणे, सजवणे, सजवून ठेवणे, नीटनेटकेपणा ई. एक कलाच आहे ह्यात काही दुमत नाहीच. मग ते घर एका खोलीचं असो, फ्लॅट असो नाहीतर बंगला. आणि त्यात एक व्यक्ती राहतं असो किंवा अख्ख कुटुंब.
मी एवढ्यातचं एका ठिकाणी गेले होते काही कार्यक्रमासाठी. ती इमारत साधारण दिड - दोन शतकांपूर्वी बांधलेली होती असा अंदाज आहे.त्याचं एक कारण म्हणजे त्या ओळीने बांधल्या गेलेल्या इमारतींना बाल्कनी नव्हती. एक पण बाल्कनी नव्हती. मला तेथे राहणाऱ्यांची पार्शवभूमी थोडक्यात माहिती आहे, पण संपूर्ण खोलात मी शिरले नाही. प्रत्येकाने बऱ्याच वर्षांपूर्वी हे फ्लॅट्स घेतलेले दिसत होते. बाल्कनी नसल्यामुळे प्रत्येकाचे कपडे हे खिडकीच्या ग्रिल वर वाळत पहुडले होते कुठल्याही पद्धतीने. कुठलीही शिस्त नव्हतीच त्यात अजिबातच. अर्थात मी तेथे हे सगळं टिपायला गेले नव्हते पण ते नकळत घडलं. पावसाळ्यात असे खिडकीच्या गजांवर तर कपडे वाळत घालणं शक्यच नाही. उन्हाळयात आणि हिवाळ्यात दिवसभर छान ऊन असतं त्यामुळे शिस्तीत छोटे कपडे खाली आणि त्यावर एकतर पातळ टॉवेल / चुन्नी / तत्सम कपडा वाळत घातला कि १. जागा कमी लागते, २. शिस्त दिसते, ३. दृश्य दिसायला चांगले दिसते, ४. स्वतःला समाधान, खूप मोठं समाधान कारण असलेल्या जागेचा वापर छान केला, बाहेरून लोकांना आतले कपडे दर्शन गरज नसतांना होत नाही, त्यांना पण बघून आनंद मिळतो ई.
बाल्कनी नाही तर खिडकी हि थेट हॉल मधून दिसणारी असेल, किंवा बाकी कुठल्या तरी खोल्यांमधून, मग त्या खिडक्यांच्या गजावर कपडे वाळत घालणाऱ्याची कला दिसली पाहिजे नक्कीच, रोजच, न चुकता. तुमची, तुमच्या सोसायटीची एक शान आहे हे लक्षात ठेवा. सर्वांनी मिळून सोसायटीचा दृश्य भाग, दर्शनी भाग संभाळलाच पाहिजे नाही का? मोलकरीण हे करत असेल तर तिला देखील हे समजावून सांगा. घरचे कपडे वाळत घालत असतील तर मनापासून करा, अजिबात वेळ जास्त वाया जाणार नाही पण जे समाधान मिळेल त्यामुळे फायदे मात्र अनगिनत / अगणित होतील हे निश्चित. कलात्मकरीत्या वाळत घातलेले कपडे बघून एखाद्याचा मूड परिवर्तन होईल, उत्साह मिळेल. त्यामुळे मंडळी लागा कामाला, प्रत्येक छोटं किंवा मोठं काम अगदी मन लावून करा जसे कि ऍक्टिव्ह मेडिटेशन च. अगणित फायदे होतील तुम्हाला डायरेक्टली आणि तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांना / संपर्कात येणाऱ्यांना इन्डायरेक्टली. मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे कपडे दांडीवर कसे वाळत घातले आहेत त्यावरून वधू परीक्षा होतं असे. माणसाचा, किंवा कुटुंबाचा खरा चेहेरा समजावून घ्यायचा असेल, लग्न वगैरे ठरवायचं असेल तर नकळत असा सोसायटीत फेरफटका मारा, त्यांच्या बरोबर गाडीत चक्कर मारा, पंगतीत जेवा किंवा जेवतांना बघा आणि मग काय तो निर्णय घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा