महाराष्ट्राची एक परंपरा आहे कि नकळत जेवणाचे ताट समोर आले कि "वादनिकावळ घेता..." म्हटलं जाताच. श्री समर्थ रामदास स्वामींनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेला / विणलेला एक श्लोक आहे हा, महत्व पूर्ण असा.
माझ्या मुलांना त्यांच्या शाळेत ह्याच मतितार्थाचा इंग्लिश मध्ये आधुनिक श्लोक शिकवला होता.
आमच्या कचेरीचा एक नवीन भाग म्हणून एक संस्था स्थापन झाली होती तेव्हा एक जगविख्यात खानसामा / शेफ आले होते आणि त्यांनी खूप सुंदर समजावून सांगितले. पहिल्यांदा पानाकडे / अन्नाकडे बघून लोक जेवतात, मग त्या पदार्थांचा सुंगधामुळे, मग खाऊन आणि तृप्त होऊन.
माझे बाबा नेहेमी मला सांगायचे जेव्हा माझी स्वयंपाक घरात सुरवात होती कि माझ्या पदार्थांमध्ये एक मसाला नाही आहे. आणि तो फारच महत्वाचा घटक आहे. आईच्या हातची चव माझ्या पदार्थांना का येत नाही तेच जिन्नस वापरून असं विचारलं तेव्हा ते म्हणाले आईची माया, तो पदार्थ ग्रहण करून माझ्या कुटुंबाला स्वास्थ्य लाभावे हे जेव्हा सामवेल पदार्थ मध्ये तेव्हा खरी चव येईल.
अनेक आधुनिक गुरु सातत्याने सांगतात कि बाहेरच अन्न सेवन करणं टाळा शक्यतो, कारण त्यात काय काय मसाले मिसळले आहेत कोणास ठाऊक आणि ते त्रास दायक ठरू शकतात. जो ते ऑर्डर केलेले पदार्थ करत असतो, वाढप्याला बरं नसेल, भूक लागली असेल, त्रागा होत असेल तर ते सगळं आपण पैसे देऊन विकत घेतो. कशासाठी?
हे सगळे जण जे पोटतिडकीने सांगत आहेत ते कित्ती महत्वाचे आहे हे बघा. जेव्हा आपण जे काही सेवन करतो ते फक्त अन्न नसतं तर त्या सोबत अनेक मसाले पण पोटात जातात, ते भावनिक स्वरूपाचे पण असू शकतात किंबहुना असतातच. तेव्हा कुठलाही अनावश्यक विचार मनात आला कि "नाम घ्या श्री हरीचे". म्हणजे ते सेवन करू नका. त्याचा परिणाम नको. उगाच तसलं इनपुट नकोच. टाळा. श्री हरी आवडत, पटत नसेल तर घडलेले चांगले प्रसंग आठवा, उत्कृष्ट प्रसंग, आठवणी, ई. म्हणजे पण मस्त आणि चांगला परिणाम होईल. बघा एकदा आजमावून. कित्ती पिढ्यांआधी श्री समर्थांना ह्याची जाणीव झाली होती म्हणून त्यांनी हा पंक्ती प्रपंच केला, शाळेने, पालकांनी तेव्हा तो श्लोक म्हणायची चांगली सवय लावली त्याची महती पटवून सांगितली आणि त्याचा फायदा सदृश्य आहे अनेक स्वरूपात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा