सुरभी नावाचा एक नावाजलेला कार्यक्रम होता दूरदर्शन वर, माझ्या लहानपणी किंवा महाविद्यालयात असतांना. त्यात एक प्रश्न विचारला होता कि चॉकलेट चे जे बार असतात त्यात एकसारखे आकाराचे तुकडे आखले का असतात? आणि त्याच उत्तर म्हणजे इतरांना वाटण्यासाठी, एकसारखे आणि सहज तुकडे व्हावे म्हणून ई. माझ्या दृष्टीने एक अजून कारण आहे आणि जे आम्ही जगलो त्या वेळी, पुरवून पुरवून खाण्यासाठी, खूप दिवस मज्जा चाखण्यासाठी.
त्या वेळी वर्तमानपत्र हातात घेऊन वाचणे म्हणजे एक पर्वणी होती, सगळ्या कुटुंबालाच. प्रत्येक वर्तमानपत्राची एक खासियत असायची. त्यामुळे बहुतांशी रविवारी प्रत्येक घरी अनेकविध वर्तमानपत्र यायचे. नाहीतर शेजार कधी कामाला येणार मग? अशी मज्जा होती म्हणून सांगते. वा वा वा च. त्यावेळी आणि आज देखील रविवारी वर्तमानपत्राची पाने जास्त असायची, पुरवण्या असायच्याच, कारण अर्थात रविवार म्हणजे सुट्टीचा आणि हक्काच्या आरामाचा दिवस. त्यामुळे वेळ सत्कर्मी लावण्यासाठी असेल. पण आज मला त्याचे खरे कारण समजले, उमगले अचानक. तसं पाहिलं गेलं तर प्रेस जेथे पेपर तय्यार होतो त्याला कधीच सुट्टी मिळत नाही, सदोदित आपले काम काम आणि काम. पण ज्या दिवशी सुट्टी येते अचानक, आठवड्यात अधे मध्ये त्या दिवशीचा पेपर छापला जात नाही. हे सर्वांना आधीच ठाऊक असते. त्यामुळे मग त्या आठवड्यातला रविवारचा पेपर किंवा पुरवण्या हमखास बाजूला ठेवायच्या म्हणजे पुरवून पुरवून वाचता येईल आणि पेपर आला नाही ह्याची खंत वाटणार नाही. "दुधाची तहान ताकावर" असे काहीसे. मी तरी असे अनेक दा करते. पुरवण्या बाजूला सारून ठेवते आणि मग कधी तरी बदल म्हणून वाचण्याचा परमानंद घेते. बघा अजमावून मंडळी. पुरवून पुरवून खाणे, वाचणे, ऐकणे, ई. मज्जा काही औरच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा