संपूर्ण १०+ वर्षे मला आठवतंय त्या प्रमाणे न चुकता उगवत्या सूर्याशी हितगुज होत असे, दररोज. हितगुज कसली, ती भरभरून दिलेली पावती आणि मनःपूर्वक जोडलेले हात होते खरं तर. शतशः धन्यवाद दिले गेले, माझ्या साठी, संपूर्ण सृष्टी साठी, सर्व सजीवांसाठी आणि असेच बरेच संवाद. मावळत्या सूर्याला मात्र कधी हात जोडले गेले नाहीत, कारण तेव्हा घरच्या कामात व्यग्र असायचे. सकाळी फार लवकर कचेरीत पोचण्याची अनेक वर्षांची सवय, त्यामुळे सहज घडलं ते माझ्या हातून. किंबहुना सुर्यबाप्पाची ऊर्जाच अशी होती कि मला अगदी वेळेत ओढून आणायचीच ऑफिसला रोज. मला नव्हे तर अखंड, न थकता, न थांबता, कोणाचीही वाट न पाहता, निरपेक्ष पद्धतीने सूर्यदेव सेवा देतात. कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखं आहे त्यांच्या कडून. हि जरी नैसर्गिक बाब असली, निसर्ग नियमानुसार सगळं होत असलं तरी प्रत्येकाने बोध घेण्यासारखंच आहे. अगदी सहज माझे हात विनम्रपणे जोडले गेले त्या मावळत्या सूर्यासमोर, त्याचं जगावेगळं अप्रतिम सौंदर्य न्याहाळत आणि मनात विचार आले, किंबहुना विनंती केली गेली कि "अशीच निरपेक्ष बुद्धी दे, अशीच ऊर्जा दुसऱ्यांना देण्याची शक्ती दे आणि असंच कार्यसातत्य घडू दे माझ्या हातून, प्रत्येकाकडून". आणि सहज श्री संत तुकारामांच्या ओळी आठवल्या:
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥
ह्या प्रत्येक बाप्पासाठी, त्याच्या स्वरुपा साठी लागू आहेतच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा