मी काही वर्षांपूर्वी एक बोधकथा ऐकली / वाचली होती, सुंदर हातांबद्दल. किंबहुना सुंदर हातांची स्पर्धा ह्या बद्दल. एका शाळेत शिक्षिका सर्व विद्यार्थिनींना ह्या अनोख्या स्पर्धे बद्दल सांगतात आणि मला असं वाटतं कि काही दिवसांनी, दोन आठवड्यांनी ती स्पर्धा असते. "सर्वात सुंदर हात" हा खिताब देण्यात येणार असतो स्पर्धेच्या अंती. सगळ्या मुली लागतात मग लगबगीने कामाला. प्रत्येकाची इच्छा असते तो खिताब जिंकण्याची. त्यामुळे ते दोन आठवडे किंवा स्पर्धे पर्यंत चा कालावधी त्यांना हात सांभाळून वापरण्यात किंवा न वापरण्यात जातो. काही जणी खास मालिश करवतात दररोज. काही जणी दूध आणि केशर ह्या मिश्रणात हात बुडवून ठेवतात. काही जणींकडे घरचे देखील खूप प्रयान्तपूर्वक त्यांचे हात सांभाळतात सुंदरता टिकवून ठेवावी म्हणून. पण सरते शेवटी जी हि स्पर्धा जिंकते तिचे हात फारच खडबडीत असतात, त्या हातांना कधीही महागड्या क्रीम आणि केशर मिश्रित दुधाचा स्पर्श झाला नसतो. कारण त्या मुलीच्या घरची परिस्थिती फारशी धनसंपन्न अशी नसते. तिची आई चार घरची कामं करत असते पण त्या वेळी ती आजारी असल्यामुळे ह्या मुलीला घरचं, बाहेरचं आणि अभ्यास करावं लागतं / सांभाळावं लागतं. ती ते लीलया सांभाळते म्हणून तिला तो खिताब बहाल होतो.
हि गोष्ट आज आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात दागिन्यांचा सोस आहे, किंबहुना तो कपाटात किंवा बँकेत ठेवण्याचा जास्त. सगळ्यांचा कल त्या कडेच जास्त असतो. कारण आपण त्याला एक ठेव / गुंतवणूक म्हणून जास्त भाव देतो किंवा बघतो. ते अंगावर घालण्यावर किंवा सोन्याचे पाणी जावं म्हणतात नेहेमी अंगावरून ह्या कडे थोडसं कमी लक्ष असतं. सुरक्षेततेच्या दृष्टीने योग्य आहे ते. पण मग काही तरी छोटेसे तरी अलंकार घालावे ना शक्य असल्यास. घरची कामे तर कोणालाच सुटली नाहीत. मग काहींचं म्हणणं असं असतं कि दागिने मग खराब होतील वापरल्याने. होऊदेत ना, काय हरकत आहे, पोलिश करून चकवून आणता येतात कि लगेच. किंवा घट न होता बदलून पण मिळतात. दररोज घालण्या सारखे कमी वजनाचे, कमी किमतीचे असे नाजूक दागिने घालण्याचे समाधान पण मिळते. माझ्या मते थोडेसे जुने किंवा झिजलेले दिसले म्हणजे मग त्या साठी खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर उपयोग, सदुपयोग झाला असं म्हणता येईल. त्यामुळे समतोल साधत कधी खरे, कधी एक ग्राम चे, कधी चांदीचे तर कधी खोटे घालून मिरवावे घरातल्या घरात, काहीही हरकत नाही. दिवसा ढवळ्या जवळपास गर्दीच्या ठिकाणी जात नसल्यास थोडेफार परिधान करायला काहीही हरकत नाहीच. कोणालाही न सांगता घालून तर बघा. विचारलंच तर सांगा एक ग्रामचे आहेत म्हणून. कोण चाललंय ते सिद्ध करायला. "सगळं घाला आणि मस्त राहा". जिंका. तुम्हाला आवडेल, पटेल ते करा मंडळी.
त्या वापरलेल्या दागिन्यांना मग तो एक दुर्मिळ सुगंध लाभतो. गळ्यातलं असेल तर आईच्या / आजीच्या पावडरीचा, अंगठ्या असतील तर कणिक किंवा भाज्यांच्या पिठाचा, ह्या सर्वांशिवाय एक प्रेमाचा आणि आशीर्वादाचा. जो कुठेच कधीच लाभणार नाही. त्यामुळे वापर, सांभाळा आणि पुढील पिढीला सुपूर्त करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा