गुरुवार, १४ मार्च, २०२४

कळस


परवाच एका मंदिर समोरून जातांना माझा लेक कसा म्हणतो "हे मंदिर असं डब्यासारखं का आहे?" तो पर्यंत इतक्यांदा बघून मला हे कधीच लक्षात आलं नव्हतं. डब्यासारखं म्हणजे? इति मी. "ते फक्त चौकोनी / आयताकृती आहे, त्या वर त्रिकोणासारखं काही तरी असतं ते कुठे आहे? इति माझा लेक. "कळस?". त्यावर माझी लेक काय पट्टाकिनी म्हणाली असेल, "कळस? हा कसला शब्द ममा, कळस तर टोकाचे वागणे, बोलणे किंवा तश्या अर्थी वापरतात ना?" फार म्हणजे फार कृतकृत झाल्यासारखे वाटले मला. मराठी शाळेत न शिकता शब्द चपराख पणे लक्षात ठेवले आणि वापरले ह्यात मला प्रचंड समाधान लाभले आणि हा पंक्ती प्रपंच साधता आला. 


मराठी भाषेचं हे वैशिष्टय आहेच कि बहुतांशी प्रत्येक शब्दांचे अनेक अर्थ निघतात, जसे वापराल तसे. 


दुरून रस्त्यावरून जातांना दर्शन व्हावे म्हणून उंच कळस बांधला जातो. कळस म्हणजे वर एक टोक आणि खाली भला मोठा पाया. ह्या पायाचा आधार म्हणजे मंदिराचा गाभा. संपूर्ण मंदिराची उभारणी म्हणजे वास्तुकलेचा एक आविष्कारच, "त्याच्या" मनाप्रमाणे बांधून पूर्ण झालेला. माझ्या मते कळस किती उंच असावा, किती मोठा असावा, आतून आणि बाहेरून तो कसा सजवावा हे सगळे खूप सखल असे विषय आहेत. सिद्ध मूर्ती असलेले मंदिर, प्रत्यक्ष भगवंताचे कधी काळी वास्तव्य असेलेले ठिकाण, आणि माहात्म्य ह्या वर पण खूप काही अवलंबून असते. प्रासादिक कंपने एका उंचीवर पोचून पुन्हा आशीर्वादाच्या स्वरूपात भक्तांवर  वर्षाव होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अर्थात ती कंपने आजूबाजूच्या परिसरात पसरून प्रत्येकाला पोचत असणारच. 


कळसाचा महिमा अगाध, म्हणूनच त्याचे मनःपूर्वक पूजन देखील केले जाते. प्रत्येक धार्मिक ग्रंथ किंवा पोथी मध्ये सरते शेवटी एक कळसाध्याय असतो. संपूर्ण पोथीचे ते सार अतिशय वेगळ्या धाटणीच्या गुंफले असते. 


राजे राजवाडे ह्यांचा काळ जेव्हा होता तेव्हा काही मुकुट असे टोकदार पद्धतीचे तय्यार होत, कळसाच्या अकरा समान. माझ्या मते बंगाली लग्नांमध्ये नवऱ्याला पण खास पद्धतीचा टोक असलेला मुकुट घातला जातो. आणि असे टोकदार मुकुट प्रत्येक व्यक्ती घालण्याच्या लायक नसतो. राजा हा एकाच असतो, आणि बाकी सगळी प्रजा. तसेच लग्नात नवऱ्या मुलाला काही काळ तो सन्मान असतो. ह्या वरून जर म्हटले कि कळस म्हणजे टोक, तर वागण्यात, बोलण्यात, व्यवहारात, रहस्य जपण्यात, चाणाक्ष पणा दाखवण्यात, आणि इतर वेळी माणूस ते गाठतो, अर्थात चांगल्या किंवा वाईट पद्धतीने. माणसाची ख्याती सर्वदूर पसरतेच, संगणक आणि तंत्रज्ञान आता आहे म्हणून नाही, तर नव्हता त्या वेळी सुद्धा. मग ती ख्याती त्याच्या उत्कृष्ट कामाची पावती असो नाहीतर वाईट. आपल्या कार्याने कीर्तिमान झालेले व्यक्ती जसे सहज सामान्यांना भेटत नाहीत, दूर राहणे पसंद करतात किंवा सोप्पं नसतं ते त्यांच्या सामर्थ्यामुळे. तसेच वाईट गोष्टीचा कळस गाठलेले आणि माहिती असलेले व्यक्ती चार हात दूर ठेवणेच उचित, नाही का? 


तात्पर्य हे कि अध्यात्मिक, भक्कम, न ढळणार, साजेसा असा पाया रचा, देवळासारखी कळसाची उंची गाथा, त्याच्या सारखे कार्य करण्याचा प्रयत्न करा, आतून बाहेरून सुबक सुंदर रुपडं निर्माण करा, सर्वांना बघावंसं वाटेल असं, त्या कडे बघून शिकावंसं वाटेल असं. वैचारिक, भावनिक, सामाजिक आणि मानसिक सत्संगत कशी वृद्धिंगत होईल ह्या कडे प्रकर्षाने लक्ष द्याच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...