मी अगदी शाळेत असतांना पासून अनेक जणांकडून ऐकलं होतं हि घरी महाभारत सारखा ग्रंथ ठेवायचा नाही. किंवा सारथी+मागे कुणी बसलेला / उभा असलेला असा रथ पण वाळू वापरून केलेली कलाकृती असे देखील घरी करून ठेवायचे नाही. त्या वेळी का कुणास ठाऊक पण "असे का?"हा प्रश्न कधीच मी विचारला नाहीच. मोठे म्हणताहेत ना मग नाही करायचं, एवढं ठाऊक होतं.
एवढ्यातच मला हे असं का नाही करायचं ह्याचं गमक समजलं. अर्थात हे फक्त एक कारण असेल पण ते फार महत्वाचे असे कारण आहे. माझ्या लहानपणी वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके, वाचनालय, मैदानी खेळ, नाटकं, विविध संगीताचे कार्यक्रम ई. अशीच करमणुकीची साधने होती. त्या काळी काहीही म्हणावं पण सर्वत्र स्वथता होती. नकारात्मक असे काही वाचले जायचे नाही, कानावर पडायचे नाही आणि अनुभले जायचे नाही.
पण जेव्हा पासून टीव्ही चे आगमन झाले तेव्हा पासून सगळं गडगडलं. अर्थात प्रत्येकाने काय बघावं आणि काय नाही ह्यावर नियंत्रण असले पाहिजे, पण तसे होतांना दिसत नाही. इतक्या वाहिन्या, इतकी चढाओढ आणि बहुतांशी प्रत्येक ठिकाणी रडणं, गळा काढणं, वचपा काढणं, ह्या मार त्याला झोड, ह्याची जिरवणे, खून, आणि ते रंजकतेचा अतिरेक करून वाढवून दाखवणे. भीतीदायक प्रकार फार प्रचलित आहे सगळ्या वाहिनीवर. "लव्ह इज इन एअर" असे जर सगळे सर्वांशी प्रेमाने वागले, बोलले, चर्चा केले, कृती केले तर सर्वत्र आनंद पसरेल. अगदी तसेच सध्या सर्वत्र तिरस्काराची भावना फारच फोफावते आहे. ती कोणी प्रत्यक्ष दर्शवतो नाही तर बरेच जण मनात ठेवून जमेल तेव्हा शाब्दिक तलवारी बाहेर काढतात, किंबहुना त्या तय्यारच असतात, गरज असो किंवा नसो. अनेक जणांचा हा जन्म सिद्ध अधिकार आहे कि फक्त दुसऱ्याचं उणंदुणं काढणं, बास. एक राक्षस गण असतो ना, त्या व्यक्तीची अशी कृती दिसते नेहेमी.
टीव्ही नव्हता, वाहिन्यांचा सुकाळ नव्हता, सातत्याने दुःख घराघरात पोचलं नव्हतं तो वर सुदृढता होती सर्वत्र. आणि आता हे सगळे हुशार मंडळी उत्कृष्ट उपलब्ध, जगभरातील माहिती देणारे मनोरंजन करणारे कार्यक्रम का बघत नाहीत, ज्यामुळे ज्ञान वाढतं, मनोरंजन होतं शांत पणे. अगदी दुर्मिळ चित्रपट, गाणी, गाण्याचे कार्यक्रम, प्राण्यांवर केलेले चित्रपट, आणि असे बरेच प्रकार पहिले पाहिजेत, फक्त आणि फक्त आपल्या घरात, त्यामुळे समाजात सौख्य टिकून राहावं म्हणून. टीव्ही हे एकाच माध्यम नाही आजकाल, इतरत्र सर्वत्र तेच, मग ते मोबाईल चे माध्यम असो नाही तर संगणक. हे ह्या क्षणी थांबणं अत्यावश्यक आहे पुढचा ह्रास थांबण्यासाठी, सगळ्याच पातळीवरचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, अध्यात्मिक ई. पाऊले उचला आणि जमल्यास बाकीच्यांना प्रबोधन करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा