मी एवढ्यातच एका सुंदर, विचारपूर्वक आखलेल्या कार्यक्रमाला गेले होते, उपस्थित राहिले होते. दिग्गज, नावाजलेली माणसे व्यासपीठावर स्थानापन्न झाली होती. पेटपूजा आधीच करवली होती आयोजकांनी. थंडगार वातानुकूलित जागेत, शिस्तीत आणि भरपूर आसनव्यवस्था असलेल्या ठिकाणी, सगळ्या उच्च विद्याविभूषित, भल्या मोठ्या हुद्द्यांवर काम करणारी, किंवा काम करून झालेली उच्चभ्रू मंडळी होती श्रोते म्हणून. अगदी सगळ्यांकडे किमान एक किंवा जास्त अती महागडे मोबाईल होते. भन्नाट वेष आणि केशभुषा करून सगळे उपस्थित होते. आटोपशीर साधारण दीड तासाचा कार्यक्रम होता. दोन लहान मुले होती बाकी सगळी मोठी मंडळी. जसा कार्यक्रम सुरु झाला प्रत्येक मिनिटाला एकाच फोन वाजला. माझ्या मते एखादाच व्यक्ती सोडला तर प्रत्येक जणांनी तो फोन घेतला आणि हळू आवाजात (असं त्यांना वाटलं) बोललेच. एक डॉक्टर मॅडम तर सतत दीड तास फोन वरच होत्या. एकाच फोन वाजल्या नंतर तरी आपला फोन बंद करावा किंवा आवाज बंद करावा कि नाही? पण चे हो. हे काय कमी होतं माझ्या अगदी समोर बसलेल्या मॅडम संपूर्ण वेळ त्यांची साडी सारखी करत होत्या, ते झालं कि डोळ्यात औषध टाकत होत्या मग पर्स ची एक, दोन, मग तिसरी चेन उगढझाप करत होत्या, डोळे पुसत होत्या, पुन्हा साडी... मी डॉक्टर नाही, पण डोळ्यात औषध फक्त दिवसातून दोन किंवा तीनदा च घालतात, प्रत्येक मिनिटाला नाहीच.
कित्ती जण ह्या खुर्ची वरून त्या वर, इथून फोटो कधी, तिथून फोटो कधी, ह्याला धक्का मार, इतके फिरत होते सतत कि अरे तुम्ही कशासाठी आलात कार्यक्रमाला.
कित्ती फोन वर मोबाईल डेटा चालू होता, त्यामुळे सोशल मीडिया चे नोटिफिकेशन्स सारखे दर मिनिटाला / क्षणाला हजर. काय हे आणि कशासाठी. कित्ती म्हणजे कित्ती ती अस्वस्थता आणि ती दर्शवायची कशाला कि मी अस्वस्थ आहे. स्थिर व्हा ना आता तरी, ह्या टप्प्यावर तरी. तो जर मोबाईल काही वेळ बंद ठेवला, नाही फोन उचलला तर काय होणार आहे? सांगीतिक मैफिल होती अगदी, आठही बाजूंनी सतत आवाज, नोटिफिकेशन्स, फोन ची रिंग, फोन वर बोलणे, आवाज करत फिरणे ई. इतकी सुंदर भाषणे होती, त्या वक्त्यांनी तय्यारी केली होती, मग त्यांना मान द्या लोकहो. ज्यांना ऐकायचे आहे त्यांना तरी ऐकू द्या.
सरते शेवटी मी डोळे बंद केले, चष्मा काढून हातात ठेवला आणि शब्दमोती कानात साठवून घेण्याचा प्रयत्न केला, कारण कुठलेही सादरीकरण नव्हते व्यासपीठावर, फक्त ऐकायचे होते. कमाल वाटली पण ह्या उच्च विद्या विभूषित माणसांची. विचित्र वागणं, अनपेक्षित होतं मला कारण तेथे सगळे बहुतांशी साधक म्हणणारे च होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्याच काहीच वाटतं नव्हतं कि आपण काही तरी चुकीचं करतो आहोत. छे छे. काहीही घेणं देणं नाहीच. त्या वक्त्यांची कमाल आहे, मानायला हवं त्यांना, एक ब्र शब्द न बोलता, कुठलीही तक्रार न करता त्यांनी त्यांचे भाषण सुरु ठेवले होते. मला खूप शिकण्यासारखे आहे ह्या तुन. मला नाही आवडत असं वागणं. असो. अनेकदा / आजकाल बरेचदा काय नाही करायचं हेच शिकवणारे जास्त होतं चाललेत. मोबाईल बाबाच्या इतक्या आहारी जाऊ नका, जपा स्वतःला मंडळी, खूप उशीर व्हायच्या आधी. मूलभूत, साधी, अपेक्षित, प्राथमिक अशी हि नैतिक कर्त्तव्य आहे कि जबाबदारीने वागावे, मोबाईल बाळगावा, सोशल मीडिया वापरावा. म्यूट, सायलेंट, आणि बंद कारणे शक्य आहे जेव्हा आपण अश्या एखाद्या सभेत जातो, ऐकायला जातो, किंवा दुसऱ्यांशी संवाद साधत असतो. इतके तर अत्यावश्यक आहे. सन्मान द्या आणि घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा