श्रावणी सोमवार, महाशिवरात्र ह्या दिवशी हमखास "बेल फुल वाले" अशी आरोळी ठोकत सायकल वर भल्या पहाटे तरुण मुलं येत असतं. त्या वेळी आमच्या नागपुरात आणि गल्लीत फक्त बैठे बंगले होते. फ्लॅट ह्या धारणेची सुरवात झाली नव्हती. त्यामुळे अगदी दारात १०८+ बरीच बेलाची पाने, पांढरी फुले आणि दुर्वा असे सगळे साग्रसंगीत पुड्यात मिळत होते. श्रावणी सोमवारी तर बहुतांशी पाऊस असायचा त्यात हि मुलं भिजत यायची आणि खणखणी आवाजात सर्वांना उठवायची. बहुतांशी माझ्या शिस्तीनुसार आदल्या दिवशीच मी हार वाल्याकडून सगळं आईला आणून दिले असल्याचे पण ह्या मुलांच्या कष्टाला मी मनःपूर्वक अजूनही सलाम करते. स्वच्छ वाळू आणून मी आईला देत असे. त्या वाळूचा महादेव अर्थात पिंड ती करायची आणि भक्ती भावे जप आणि पूजा. त्यात माझा खारीचा वाटा, मीपण तिच्या सॊबत बेल वाहणे, सर्व तिला आवडेल अशी तय्यारी करून ठेवणे, दारात साफ करून रांगोळी काढणे सणाला साजेशी, तोरण आवश्यक असेल तर ई. ती सातत्याने करत असल्यामुळे आणि त्यावेळी सर्वत्र मराठमोळं वातावरण असल्यामुळे हे मला करता आलं. अर्थात सहज ते संस्कार झाले आणि मला आवड निर्माण झाली. शाळा, महाविद्यालय आणि त्या नंतर नोकरी सांभाळून माझ्या हातून हे सगळं घडलं. संपूर्ण वर्षभर भरभरून पूजा, सण, व्रत वैकले असायचीच. त्या शिवाय शेजारच्यांकडे, मैत्रिणींच्याकडे आणि इतर ठिकाणी काही असले तर मी प्रकर्षाने हजार, सर्वात प्रथम आणि शेवट पर्यंत. सर्व कामांना अग्रगणी. कधीच नाही म्हंटले नाही कधीच कमी पडले नाही. सर्व आवडीने करायला जमलं मला. कसे ते ठाऊक नाही. अगदी समजायला लागल्यापासून ते स्नातकोत्तर शिक्षणासाठी जाईस्तोवर सगळं म्हणजे सगळं अथ: पासून इति पर्यंत घडलं. आत्ता समजतंय पंचपक्वान्नांचा नैवेद्यापासून ते मंगळागौरीच्या आवाक करून देणाऱ्या सुशोभी करण्यापर्यंत सगळं हिरीरीने का झालं ते. "त्याला" ठाऊक होतं कि लग्नानंतर फार काही घडणार नाही आहे हिच्या हातून. फ्लॅट संस्कृती येणार, जबाबदाऱ्या वाढणार, संपूर्ण वेळेची नोकरी असणार त्यामुळे त्या उत्कृष्ट पहिल्या फेज / पडावात सगळं झालं. मनःपूर्वक समाधानाने आणि कौतुक करत. त्याच्या प्लांनिंग ला सलाम. त्यामुळे आता जास्त काही घडत नाही ह्याच फार मनाला वाईट वाटत नाही. भरभरून सगळे अनेक वर्ष उपक्रम, कार्यक्रम उपभोगले, आठवणी ताज्या राहतील इतके. त्यावेळी तर क्षणोक्षणी फोटो काढणे नव्हते त्यामुळे सशक्त मेंदूत जसेच्या तस्से ते उभे आहेत आज देखील. अर्थात मी माझ्या आई सारखं सगळं केलं असतं तर माझ्या मुलांना ते आपसूक आलं असतं पण असो. सगळंच साध्य करता येत नाही, मला तर जमले नाही.
बहुतेक सगळं सोडून दिल्यामुळे, तब्बेतीची कारणे म्हणा किंवा बाकी गोष्टींना जास्त महत्व दिल्या गेल्यामुळे मला "ये कहा आ गये हम..." असं वाटतं बरेचदा. "बदल हाच नेहेमी स्थिर असतो म्हणतात (चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट", असं मी स्वतःला समजावते, दोन हस्तक एक मस्तक वापरून नतमस्तक होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा