मी पंतप्रधान झालो तर, मी कार झालो तर असे हे निबंधाचे विषय असायचे माझ्या लहानपणी, शाळेत. आज उमगलं ते तसे विषय का होते ते.
आज न्याहारीला चविष्ट पालक+मुळा पराठा सेवन करते वेळी नेहेमी प्रमाणे माझ्या ताटलीत शेजारी छोट्या प्रमाणात लोणचे होते आणि त्याला खेटून चटणी विराजमान झाली होती. पराठेच मुळी इतके पौष्टिक होते कारण त्यात ज्वारीचे पीठ, तिखट मीठ, धने पूड, ओवा आणि कोथिंबीर यथोचित प्रमाणात घातली होती. आणि हो अर्थातच प्रेमाचा भरपूर मसाला देखील होताच जोडीला. तसे बघायला गेले तर केचअप, चटणी, लोणचे काहीही लागत नाहीच तव्यावरच्या गरमागरम पराठ्या सोबत, पण असो, एक पद्धत, सवय किंवा आवड म्हणून ते वाढलं जातंच पानात. गेली अनेक वर्षे मी पराठे करते आहे आणि सेवन पण करते आहे, आज पर्यंत जे घडले नाही ते आज झाले, पराठा चक्क नाराज झाला माझ्यावर. म्हणतो कसा, कि मी काय चविष्ट नाही म्हणून माझा अपमान केलास? ह्या सगळ्यांना माझ्या शेजारची जागा देऊन? तुझ्या लाटन्याखाली आलो, शेकलो गेलो, भिजलो, भाजलो आणि अत्यानंदाने तुझ्या समोर उभा ठाकलो तर जोडीला आहेतच हि मंडळी. का? माझी चव जास्त वृद्धिंगत होते का ह्या सर्वांसोबत? मी मग उत्तर दिले, कि चव तर वाढतेच, प्रथा पण आहेच, जोडी पण हवी ना? आणि शिवाय ह्या चटणीत सगळ्या डाळी आहेत, मेथी आहे, टमाटर आहे, कढीपत्ता ई. आहे त्यामुळे सकाळच्या न्याहारीची पौष्टिकता वाढते आहे, नाही का? आणि नुसती चटणी कधी कोणी खाऊ शकतं का? नाही ना, पराठे शिवाय मज्जा नाही, परिपूर्णता किंवा महत्व नाही असं म्हणा हवं तर. चटणी केवढी, तू केवढा? कशाला बघतोस इकडे तिकडे, ज्यांना जसं आवडतं तसं खाऊ दे ना. हो कि नाही? तेव्हा कुठे महाराज थोडे नरमले, हाश...
असे काहीसे माझ्या हातून आज लिहिले जायचे होते, असा मला विचार करता यावा म्हणून अनेक दशकां आधी निबंध लिहून घेतले गुरुजनांनी एक शिक्षणाचा, भाषेचा भाग म्हणून. वा क्या बात है? मज्जा आवि गयो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा