चावणे हा डासांचा स्वभावच आहे. ते त्यांचं खाद्य आहे हे हि तितकंच खरं आहे. त्यांच्या चावण्याने जेवढा त्रास होतो तेवढाच कानाशी गुणगुणण्याने देखील, मग उगाचच त्यांना हाकलण्याचा आणि असफल असा मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात आपणच मार खातो. ह्या सगळ्यात मला आज एक नवीन गोष्ट ध्यानात आली, एक वेगळा फॉर्मुला / समीकरण. बाकी सगळी शास्त्रीय कारणे आहेत, मान्य पण आहेत आणि मी त्या विषयाची अभ्यासक नाही.
कोवळी, मऊ, लहानमुलांची नितळ, गोरीपान त्वचा नक्कीच काळ्या डासांना आकर्षित करत असणार. मग ती फक्त दुरून बघण्यापेक्षा बसून बघावे त्यावर असं त्यांना वाटणारच ना? त्यात काय वावगं आहे. मग फक्त बसून चालत नाही तर मग स्वभाव आडवा येतोच. मग एकाच प्रकारच्या त्वचेवर का बसायचं, फक्त एकाच प्रकारची अनुभूती का घ्यायची, विविधता हवीच म्हणून मग खूप सारे हात, पाय चाखले जातात सहज.
माणसाचा स्वभाव पण आहे, वैताग आहे, झोप मोड होते, खाज सुटते आणि हो आजार होण्याची पण भीती असते डास चावल्यावर. त्यामुळे माणसाच्या स्वभावानुसार त्यांना मारलं जातं. हाताने, रॅकेटने, गुड नाईट च्या मशीनने आणि इतर काही पद्धतीने. मग त्यांना त्याचा वचपा काढावासा वाटलंच ना? साहजिक आहे. त्यामुळे मग चव, मस्त चावा घ्या असे ते चक्र सुरूच राहतं. जशी जशी माणूस त्यांना मारण्यासाठी विविध गोष्टींची निर्मिती करतो आहे, तशी तशी त्यांची ताकद देखील वाढते आहे, ते जास्त निगरगट्ट होत आहेत आणि सरते शेवटी काय कलियुगाचा महिमा. मग तो डासांना पण लागू पडतोच ना. आपण जसं त्यांना मारण्यात किंवा ते चावू नयेत म्हणून मागे पुढे बघत नाही तसे ते देखील करतातच. तुम्ही कुठेही असा, कुठल्याही वेळेला, काहीही पेहेराव करा ते स्वभावानुसार चावणार म्हणजे चावणारच. आपण एक मारला कि कदाचित तिकडे बदला म्हणून किंवा नैसर्गिक प्रक्रिया म्हणून आधीच १०-१०० तय्यार होत असणार.
तुम्ही म्हणणार हे सगळं तर आम्हाला ठाऊक आहे, हि काय नवीन सांगते आहे?
मला आज हे जाणवलं कि डासच नाही तर चावा घेणारे अनेक जण असतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या, मग आपण त्यांना चावणे योग्य नाही आणि शक्य नाही. पुढे जा, त्यांना मारा, हाकला, स्वतःला जपा, बाकीच्यांची पण काळजी घ्या पण थांबू नका, तक्रार तर नकोच, पर्याय शोधत राहा. चावणे हा धर्म, स्वभाव, कृतीचा, रुटीनचा आणि हक्काचा एक महत्वाचा भाग आहे चावणाऱ्यांचा, अगदी तस्साच शांत राहून कृती करत राहायचा आपला, नाही का? तुमच्या जोमाने पुढे जाण्याच्या कृतीकडे बघून, निरखून ते शेवटी हात टेकणार हे निश्चित. त्यांना खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजे कारण ते चावतात म्हणून नवनवीन तरणोपाय शोधले जातात आपल्या हातून. हे हि नसे थोडके ना?
त्यांच्या स्वभावाचा विजय असो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा