गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

१९६४: कालावधी


मी जेव्हा पहिल्यांदा आई झाले तेव्हा शास्त्रोक्त मालिश कसं करायचं हे ठाऊक होतंच पण शिकले पण होते, कारण बाळांच्या उत्तोमोत्तम वाढीसाठी, शारीरिक बाळासाठी मालिश सारखा रामबाण ईलाज / उपाय नाहीच. मुलं तर अगदीच लहान होती, ती सांगू शकत नव्हती कि त्यांना कसं वाटतंय. बरं मी शास्त्रोक्त मालिश करायला शिकले तेव्हा तेल कुठले वापरायचे, कसे आणि काय करायचे ई. शिकले पण ते किती वेळ करायचे हे विचारायची विसरले उत्साहाच्या भरात. आणि मग आले कि पिल्लं माझ्या समोर. ओघानेच समजले किंवा होत गेले कि संपूर्ण एक स्तोत्र म्हणे पर्यंत एकाला मालिश करायची. मग ती माझी मोजपट्टी निर्माण झाली, अगदी न कळत किंवा सहजी.  


माझे एक खास मित्र आहेत, त्यांची मुलगी आणि नातं आमच्या सोसायटीत राहतात, वास्तव्याला आहेत. ते समोरच्या सोसायटीत राहतात आणि ती फक्त एक छोटी इमारत आहे.  त्यामुळे सकाळचे चालणे ते काका आमच्या सोसायटीच्या भल्यामोठ्या प्रांगणात करतात. ते व्यवसायाने नावाजलेले भूल तज्ज्ञ म्हणून निवृत्त झाले अनेक वर्षांआधी. त्यामुळे आता निवांत चालतात सकाळी श्री. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र लावून, मोठ्याने सुरु असतं. त्यांच्या म्हणण्यानुसार किती वेळ चालायचे हा जेव्हा यक्ष प्रश्न माझ्या समोर उभा ठाकला तेव्हा ह्या स्तोत्राच्या माध्यमातून मस्त उत्तर लाभले. हे स्तोत्र संपे पर्यंत चालायचे, दररोज, न चुकता. किती योग्य उत्तर आहे ना? मला तर खूप भावले.   


माझे अजून एक स्नेही आहेत. ते अतिशय उत्साही आहेत, सातत्याने सोसायटीचे काम करतात, खूप जणांना हवी ती मदत करतात, अतिशय स्वतःला गुंतवून ठेवतात, श्री श्री रवी शंकरांची आराधना करतात, सत्संग करतात, दररोज न चुकता एक नवीन भजन गातात, रेकॉर्ड करून सर्वांना पाठवतात ई. असा त्यांचा निवृत्ती नंतरचा भला मोठा उपक्रम आहे. गवती चहा घातलेला सप्तगुणी चहा ते दररोज तय्यार करतात दोघांसाठी सकाळ संध्याकाळ आणि आनंद घेतात त्याचा.  त्यांच्या परिसरात आठवड्यातून दोनदा बाजार भरतो आणि ते नित्यनियमाने बाजार करतात, दोनदा दहा रुपयाची एक छोटी जुडी गवती चहाची घेऊन येतात.  दररोज दोनदा चहा, अशा पद्धतीने चार दिवसात एक जुडी संपवायची गवती चहाची म्हणजे तब्बेतीला चांगले हे त्यांचे, किंवा त्यांनी ठरवलेले, त्यांना भावलेले मोजमाप.  त्या दोघांना यथाशक्ती कामं करण्यासाठी लागणारी ऊर्जा, गाणं म्हणण्यासाठी अत्यावश्यक असे गळ्याचे आरोग्य, श्वासोश्वासावर नियंत्रण, पचन संस्थेचे योजलेले कार्य आणि सर्वगुणसंपन्न अशी प्रकृती टिकवण्यासाठी त्यांचे हे योजलेले किंवा आखलेले किंवा आखले गेलेले समीकरण, आहे कि नाही भन्नाट, आणि किंचित जगावेगळे. 


अगदी तसेच आपल्या सर्वांचे देखील आहे, लिखाणा करता किती वेळ द्यायचा, कुठे समाधान मानायचं, कुठे थांबायचं हे सगळं लिहिता लिहिता लक्षात येईल अगदी नक्कीच.  फक्त त्या करता लिहिते व्हा, तुमचे उदिष्ट, उदेष्य काय आहे हे निश्चित कराच, म्हणजे "सारी कायनात आपकी मदत करेगी". नाही का? चला तर मग ई-लेखणी उचलाच आणि लागा लिहायला. लिहिते व्हा, व्यक्त व्हा आणि सातत्य टिकवा. बघा मग नकळत कसा अंतर बाह्य बदल घडतो ते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...