अधिकृत तपासणी करणे हा एक महत्वाचा भाग होता शैक्षणिक क्षेत्रातला. शैक्षणिक क्षेत्र म्हणजे फक्त हात हलवत जाऊन, तेच ते शिकवून पुन्हा संध्याकाळी हात हलवत येणं नाही. माझ्या मते साधारणतः २०१७ पासून आमूलाग्र बदल आणि तो देखील खूप म्हणजे खूप झट कि पट झाला, काही उमगायच्या आत. कधी कधी प्रत्येक सहा महिन्यांनी तर कधी संपूर्ण वर्षानंतर अभ्यासक्रमाचे ऑडिट होत असे. मी खूप दा ह्या ऑडिट चमूची मुख्य व्यक्ती म्हणून देखील काम बघितले आहे अत्यंत आनंदाने. खूप मज्जा यायची, कारण आधी माझ्या विद्यापीठाने मला त्या ऑडिट चमूचा भाग केला, मग मुख्य केलं आणि मग चेअर मॅन म्हणून बाकी विविध संस्थांमधे पण पाठवलं.
का कुणास ठाऊक पण अगदी पहिल्या पासून, किंवा मी एक सर्टिफाइड reviewer, प्रमाणित समीक्षक असल्यामुळे असेल कदाचित, किंवा मूळ स्वभाव, पण मला त्या बाहेरून येणाऱ्या चमूला काय अपेक्षित आहे हे थोडक्यात माहिती असायचं किंवा मांडता यायचं. माझ्या चमूने मांडलेलं त्यांना भावलं अनेक वर्ष. त्यामुळे एक तर आमचं ऑडिट मस्त आणि पटकीनी होत असे, अगदी दरवेळी. बाप्पा ची कृपाच म्हणायची.
माझ्या असं ऐकण्यात आलं होतं जे माझ्या साठी नव्हतं, पण तरी देखील कानावर पडलं. जर एखाद्या ऑडिट च्या चमूने वेडे वाकडे प्रश्न विचारले किंवा वेगळ्या दिशेने गेले तर त्याच्या संस्थेच्या ऑडिट च्या वेळी गडबड होऊ शकते. कारण ऑडिट चमूचे देवाण घेवाण होत असे, ह्या संस्थेचे त्या संस्थेला पाठवले जाई. "पेराल ते उगवेल" ह्या म्हणीनुसार देखील उणेदुणे उगाचच काढले तर पुढे जाऊन गडबड होऊ शकते, कारण कुठलीच संस्था किंवा काम हे अगदीच १००% नसतं सर्वानुमते. असो. हे आज अश्या अर्थी आठवलं कि एक कार्यक्रम आहे "से एस टू द ड्रेस". होणाऱ्या नवरीचा पांढरा पोशाखाची निवड करण्याकरता लवाजमा घेऊन जातात दुकानात, अगदी जसे आपल्याकडे लग्नाचा बस्ता बांधण्याकरता. "एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ", अगदी जवळचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, तानेवाईक ई. येतात. उणेदुणे काढले जातात, आवडी निवडी सांगितल्या जातात, कधी सोज्वळ पद्धतीने तर कधी वेगळ्या पद्धतीने. असो. मला एवढंच नमूद करायचं आहे कि प्रत्येकाकडे एकदा तरी लग्न समारंभ असणार आहेच. मित्रत्व दोन्ही तर्फे असतं, त्यामुळे पुढल्या वेळी ते जे आज काही बाही ऐकत आहेत नंतर त्यांची बारी येणार. त्यामुळे एक तर विचारलं तर बोला, जमेल तेवढं मृदू असू द्या वाणी, कौतुक करा आणि त्या संपूर्ण प्रक्रियेचा भाग व्हा, आनंद उपभोगा. बास. तुम्ही जेव्हा जेव्हा अश्या ठिकाणी हजर राहाल तेव्हा तेव्हा हे प्रकर्षाने पाळा कारण बहुतेक वेळा तुम्हाला आमंत्रण दिले जाते, सन्मानाने बोलावले जाते, हे लक्षात असू द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा