माझ्या पिढीपासून सगळ्याच मुली नोकरी साठी बाहेर पडल्या, माहेरी असतांनाच आणि सासरी गेल्यावर सुद्धा अर्थार्जन सुरु राहिलंच. त्यामुळे मी जसे अनेक वेळा मुलाखती दिल्या तश्या माझ्या बरोबरीच्या सर्वांनाच मुलाखती द्याव्या लागल्या. त्या शिवाय काही नोकरी मिळणे नाही. सहज ह्या बाबतीत एवढ्यात आमची चर्चा झाली, अनेक वेळा वाचले होते लेख ह्या वर पण तेव्हा त्या कडे इतके लक्ष गेले नाही किंवा त्या वेळी ते इतके महत्वाचे वाटले नाही. आता मात्र जरा वेगळेपण जाणवायला लागलंय.
थोडीशी तफावत जाणवली मुलाखत घेतांना विचारलेल्या प्रश्नांची. मुली गेल्या कि आधी नवरा काय करतो? मुलं किती हे का जास्त महत्वाचे प्रश्न आहेत कोणास ठाऊक? पण आधी तेच विचारले जाते. पण हे मुलांच्या बाबतीत एक तर होत नाही किंवा मग सरते शेवटी सूतवाच्य करायचे म्हणून सहज कुटुंब कुठे आहे, कोण कोण आहे असा प्रश्न फक्त समोर टाकला जातो, विचारला जातो. आणि त्याचे उत्तर पण माझ्या मते मोघमचं दिले जाते. "शितावरून भाताची परीक्षा" होते कि काय हे कळत नाही. आणि तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा पण हा प्रश्न काही सुटत नाही.
फारच वेगळे वाटते हे सगळं ऐकलं आणि पाहिलं कि? आता तरी जेव्हा २०२४ संपत आलं आहे, आणि तरी देखील? कमाल वाटली, म्हणून माझे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा