२५-३०-४० वर्षांपूर्वी सोशल मीडिया नावाचा प्राणी का नव्हता? का उदयाला आला नव्हता? ह्याचं खरं कारण मला आज समजलं. त्या वेळी सीमारेषा स्पष्ट पणे आखल्या होत्या. घर आईची जबाबदारी, वडिल सगळं बाहेरच बघणार. तेव्हा स्वतःचा बँड वाजवायची, मी कित्ती आणि काय काय करते हे सांगत फिरण्याची गरज नव्हती मुलीला, तिचं महत्व तिला ठाऊक होतं आणि घरच्या दारच्यांना सुद्धा. इथवर सगळं ठीक होतं.
मागील एका लेखात मी "धन-अन्न-मन-तन" ह्या मॅपिंग बद्दल लिहिले होते. त्या प्रमाणे मग मुली शिकायला लागल्या, नोकरी करू लागल्या, आर्थिक स्वतंत्र मिळवले, उच्च शिक्षित झाल्या, उच्च पदांवर कामं करू लागल्या आणि आपला ठसा उमटवू लागल्या. हे सगळं त्या पादाक्रांत करत होत्याच, उंच शिखरे गाठत होत्या आणि आहेत, पण हे सगळं घराबाहेर. घरी आलं कि घरची जबाबदारी आहेच. ती देखील त्या उत्तम पद्धतीने, जसे जमेल तसे करत राहिल्या पण घरच्या मंडळींना, जेष्ठांना, श्रेष्ठांना कधीच त्याचे अप्रूप वाटले नाही, कौतुक वाटले नाही, किंवा तोंडावर कौतुक केले नाही, कृतीत दिसले नाही. मी सर्वसाधारण लोकांबद्दल बोलते आहे, काही अंशी सगळ्याच स्तरावर वेगळे लोक असतातच, जे सर्वांपेक्षा खूप छान वागतातच. असो.
तर जेव्हा "त्याला" हे जाणवलं कि मी आधी त्या मुलींना घर सांभाळण्याची सद्बुद्धी दिली होती, मग ती बदलून अभ्यासावर जुंपले, आणि नोकरीसाठी प्रोत्साहित केले, तेथे त्यांचा चांगलाच जम बसला अगदी प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रात, त्यांनी माझी मान खाली जाऊ दिली नाहीच. पण तरी जर त्यांना खूप ऐकून घ्यावं लागत असेल किंवा त्यांना सतत घालून पडून बोलले जात असेल तर मग अजून वेगळा बदल अत्यावश्यक होता, हे जेव्हा जाणवले तेव्हा मग मी वैविध्य सोशल मीडिया नावाच्या टीम ला आमंत्रित केले, त्यांना सशक्त केले म्हणजे मग माझ्या सर्व मुलींना त्यांनी कमावलेल्या नावाबद्दल, कार्याबद्दल आणि इतर कामांबद्दल मस्त सगळं मांडता येईल आणि तिला खूप शाबासक्या मिळतील. हे खरं कारण आहे सोशल मीडिया सुरु करण्यामागचं. स्वतःचा बँड वाजवायचा असतो हे तो वर माहित नव्हतं किंवा त्याची निकड भासली नव्हती. पण आता अत्यावश्यक आहे असं "त्याला" वाटलं. आणि "त्याला" असं देखील वाटलं कि हे केल्यामुळे मुलींबद्दलचा सन्मान वाढेल. अर्थात ह्या सर्वांमुळे पुढील पिढी मस्त तय्यार झाली, त्यांनी आईची धावपळ बघितली, त्यामुळे त्यांच्या समोर आई बद्दलचा आदर खूप प्रमाणात वाढला, आणि सर्वांनी ठरवलं कि असं आपण होऊ द्यायचे नाही. हे खूप मोठं अचिव्हमेंट होतं खरं. ज्यांनी बदलावं म्हणून हा सर्व सोशल मीडिया नावाचा सोहोळा आयोजित केला होता मूलतः त्यांच्यात मात्र तसूभरही फरक पडला नाही, पडणार नाही, त्यांना समजतंय सगळं पण दंभ आडवा येतोय. अहंकार, कुठला आणि का? हे मात्र ठाऊक नाही.
तर मुलींनो, तुम्ही खूप मस्त सगळं काम करत आहात. काही वर्षांनी वळून बघितलं तर सगळं आठवायला पाहिजे, एक यादी तय्यार व्हावी म्हणून नमूद करून ठेवा, इथे तिथे सर्वत्र पोस्ट कराच. आणि संतो राखा हे सांगण्याची गरज पडत नाहीच बहुतांशी. त्यामुळे चला तर मग "झेंडा उंचा रहे हमारा" असं म्हणत, स्वःताची पाठ थोपटत पुढील मार्गक्रमण करू या. उगाच कशाला हवी आहे कोणाकडून शाबासकी? अजिबात नकोच. वाईट बोलून, शिव्या देऊन, घालून पाडून बोलून आज पर्यंत एक काही तरी करून दाखवायची ऊर्जा मिळाली, पण आता काहीही नको, ऊर्जा नको, शाबासकी तर अजिबात नको आणि गोड चांगले शब्द तर नकोतच, ठेवा तुमच्याकडे.
बघा म्हणजे सोशल मीडिया येण्याकरता "त्याला" पण काय काय करावं लागलं आपल्या मुलींसाठी. धन्य आहे "तो" नक्कीच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा