रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

१९९५: उपस्थित आणि अनुपस्थित


कोण जास्त महत्वाचे आहे? जे तुमच्या समोर उभे आहेत, बोलतं आहेत का जे ह्या वेळी अनुपस्थित आहेत? कुठल्याही समारंभाला किंवा कार्यक्रमाला, मग तो घरगुती असो नाहीतर सोसायटीतील असो किंवा नातेवाईकांकडचा असो, सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असते. बहुतांशी सगळेच येतात. पण काहींना इच्छा असून देखील येता येत नाही, अनेक कारणे असू शकतात. समजा एका चौकोनी कुटुंबाला आमंत्रण दिले आहे, त्या पैकी फक्त एकाने हजारी लावली आहे, प्रतिनिधी म्हणून, तर असं आढळतं कि जो येतो तो फक्त तेथे त्यावेळी हजर नसलेल्यांबद्दलच चौकशी करतो, का नाही आले? हे अगदी सगळे म्हणजे सगळेच विचारतात आणि काळजी पोटी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अगदी प्रत्येक वेळी. ते मला अगदी पटते, मान्य पण आहे. जो उपस्थित असतो तो सर्वांना सांगतो देखील बाकीच्यां बद्दल पोटतिडकीने. पण जो उपस्थित आहे त्याचं काय? त्याच्या बद्दल आधी विचारायला हवे असे वाटत नाही का? मला तरी वाटतं किंबहुना मी ते इतकी वर्षे पाळले आहे प्रकर्षाने. 


मी कचेरीत असतांना बऱ्याचदा काही मीटिंग बोलवायचे. अर्थात मी मीटिंग बोलावली आहे म्हणजे मी आधी तेथे हजर पाहिजे आणि माझ्या सवयीनुसार सर्वांच्या आधी मी जाऊन सगळी व्यवस्था चोख आहे कि नाही हे बघत असे. माझ्या नंतर येणार पहिला व्यक्ती हमखास हा प्रश्न विचारणारंच, कोणीच नाही आलं अजून? का? अरे पण मी आले आहे ना, त्याचं काय? ते महत्वाचं नाही का? हा नेहेमीचा प्रश्न पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळी विचारण्या ऐवजी जर असं म्हटलं तर: अरे वा, चला कोणी येण्या आधी शांतपणे बसू या, दोघी गप्पा मारू या, काय म्हणताय, कश्या आहात, सध्या काय नवीन ताजा? असं मोघम काही. 


हे असं कचेरीत पण होत असे तेव्हा पासून कदाचित मला सवय लागली कि उपस्थित माणूस महत्वाचा. त्याच्याशी पण बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, तिथपासून सुरवात करू या, मग जे नाहीत त्यांच्या बद्दल मोघम विचारपूस, जास्त बरं होईल नाही का? जो उपस्थित आहे त्याने पण काही कामे बाजूला सारली असतील ह्या कार्यक्रमाची वेळ पाळण्याकरता, किंवा आधीच कामे आटोपली असतील, म्हणजे त्याने जमावलंय /योजलंय येथे यायला. ते जास्त महत्वाचं. 


आईला बघितलं कि आधी मुलांबद्दल विचारपूस, मस्त आहे हो, पण तिला पण विचारा, तिच्या साडी बद्दल, दिसण्या संबंधी, किंवा फक्त हवापाणी बास. मज्जा येईल करून तर बघा. 


किंवा "तू आलीस, कित्ती मस्त वाटतंय तुला बघून, एकदम झकास दिसते आहेस. आज ना हा कार्यक्रम असा असा मांडला आहे, नियोजित आहे." असं काहीसं. नवीन आलेल्या दुकानांबद्दल, चित्रपट संबंधी, OTT च्या कार्यक्रमाबद्दल, ई. दोन माणसं समोरासमोर आली कि संभाषण सुरु होणे आवश्यक आहे ज्याने दोघांना आनंद मिळेल. ती भेट लक्षात राहील. दोन व्यक्ती एकमेकांना भेटले म्हणजे ते ओळखतात, बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे त्यांना ठाऊक आहे स्वभाव, आवडी निवडी, ठिकाणं, विषय, मग तेच छेडा, इतर नको, किंवा सरते शेवटी, जास्त भर नकोच त्यावर. तुमचं मत काय आहे? जे डोळ्याला दिसतंय ते, स्पर्श करता येतंय ते, जाणवतंय ते, स्पंदन ऐकू येतात ते मोलाचे. इतर पण आहेत पण त्या वेळा करता फक्त दुय्यम स्थानावर. 


दुसरे जेव्हा तुमच्याशी अनुपस्थितांबद्दलच बोलतात तेव्हा त्यांना ते जाणवत नाही, पण जेव्हा तुम्ही त्यांच्या संबंधी न बोलता जे आले नाहीत त्यांच्या संदर्भात गोष्टी छेडल्या तर त्याचे हावभाव बघा, तुम्हाला लगेच जाणवेल फरक, प्रकर्षाने. 


चला तर मग, जे हाजीर तो वजीर, हे आत्मसात करू या.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...