आताशा मी एक मुक्त विहार करणारी पक्षीण आहे, त्यामुळे मी सर्वत्र बागडत असते. जेव्हा ज्यांनी जेथे बोलावलं तेथे हजर माझ्या PPT ला घेऊन. नवनवीन ठिकाणं, वैविध्य विद्यार्थी, खूप भन्नाट शिक्षक आणि मोठी चक्कर. मी बहुतांशी सर्वत्र टॅक्सी ने जाते येते. त्यामुळे मला भिरभिर इकडे तिकडे बघत, मज्जा करत जाता येते. ओला, उबेर ना पण समजलं आहे कदाचित माझ्या ह्या नवीन आवडीबद्दल आणि म्हणून ते मला मस्त पैकी पुणे दर्शन घडवून आणतात. ह्या-त्या रस्त्यावरून घेऊन जातात. बहुतांशी तंत्रनिकेतन हे दूर च्या ठिकाणी वसलेले आहेत त्यामुळे काही अंशी प्रवास हा गावठाणातून होतो. कारण हे सगळे भाग, विभाग, ठिकाणं आधी एक एक गावं होती, आता ती पुणे शहराचा भाग झालीत. हे तर आहेच आणि सध्याचे वातावरण गरमा गरम भाजलेला भुट्टा खाण्याचा, उकडून भाजलेल्या दाण्याच्या शेंगा फस्त करण्याचा आहे. अगदी न कळत्या वयापासून मी ह्या कृतूमानाप्रमाणे येणाऱ्या, अवतरणाऱ्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारला आहे. पण पावसाळा सुरु होऊन दोन महिने होऊन गेले पण कुठल्याही भागात मला दाण्याच्या आणि भूट्याच्या गाड्या नजरेस पडल्या नाहीतच. काय महद आश्चर्य आहे नाही? बाकी प्रत्येक खाऊ ची ठिकाणे आहेत जागोजागी, भेळ वाले, पिझ्झे, बाकी फास्ट फूड, चहा आणि बरेच काही, मिसळ, ई. मैलोन्मैल नाहीच हो. आमचं अख्ख नागपूर तेव्हा एक गाव होतं, अगदी दारात येत असतं असे सगळे ठेले वाले आणि जागोजागी, ठिकठिकाणी पण उभे असायचेच. आणि हो माझ्या नागपुरात गोडसर चवीचे मके, कणसे आणि त्यावर झणझणीत हिरव्या मिरच्यांची, कोथिंबिरीची चटणी लावून दिले जात असे. इथे फक्त लिंबू, तिखट आणि मीठ चोळतात, बास. असो. पण त्या गाड्या तरी दृष्टीपथात पडू दे पावसाळा संपायच्या आत.
त्या त्या ऋतूत ते ते खावं म्हणतात ना, पौष्टिक असं, म्हणजे माझ्या साठी हो. आमच्या नागपुरात आधी त्या शेंगा उकडयाच्या मीठ घालून आणि मग भाजायच्या. आई शपथ. हे लिहितांना सुद्धा मी नागपूरला पोचले माझ्या जुन्या दिवसात. क्या बात है? कुठे गेले ते सगळे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा