दरिद्री हा शब्द उपहासाने किंवा मित्रमंडळींमधे गमतीने पण वापरला जातो. जे प्रार्थनेवर विश्वास ठेवतात ते कोणाच्याही पदरी हे दारिद्य येऊ नये ह्या बद्दल त्या भगवंताला / दिव्य शक्तीला मनोभावे साद घालतात. पैशाशी निगडीत असलेले असे दारिद्य हा एकच प्रकार नाही तर वैचारीक, सामाजिक, बौद्धिक असे अनेक कंगोरे आहेत त्याला. पैशाने थोडेसे कमी असलेला मेहेनतीने खूप पुढे जाऊ शकतो आणि त्याची खूप उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो आणि बघतो देखील. पण जो विचारांनी दरिद्री असतो तो कधीच पुढे येऊच शकत नाही, अगदी नगण्य अशी संख्या असेल जेथे हा चमत्कार घडला.
विचारांनी श्रीमंत व्यक्ती हि समाजात, घरात, कामावर आणि प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडतेच. पण जे विचार स्तरावर दरिद्री, कमी नाही हो, पूर्णतः दरिद्री असे त्यांच्या सोबतच्या मंडळींना पण त्या दारिद्र्यात / दलदलती जोपासतात. मग एखादा व्यक्ती अगदी लहानपणापासून वैचारीक दरिद्री आहे हे जर माहिती आहे तर मग एक तर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला साथ देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर त्याच्या पासून कोसो दूर राहिले पाहिजे.
दोन खास मित्रांची कहाणी माझ्या पुढ्यात मांडली गेली अचानक इतक्यात. अगदी पहिल्या वर्गापासून ते संपूर्ण शिक्षण होई पर्यंत म्हणे दोन मित्र एका वर्गात होते. एक घरचा व्यवस्थित, आर्थिक परिस्थिती सुंदर, वडील चांगल्या हुद्यावर वगैरे. आणि दुसरा म्हणजे अत्यंत गरीब, पैशाची वानवा, तरी देखील भले मोठे कुटुंब आणि बहुतांशी सर्वांचेच विचार अगदी निकृष्ट, घाणेरडे म्हटलं तर त्या शब्दाचा अपमान होईल असे. जवळपास राहात असल्यामुळे, एकाच वर्गात असल्यामुळे असेल कदाचित पण त्यांची ओळख टिकून राहिली. जो व्यवस्थित कुटुंब संस्थेतून आला होता त्याने टिकवून ठेवली. मग ह्या दोघांची कालांतराने लग्न झाली, मुले बाळे झाली आणि त्या नंतर मुलांची लग्न जुळवायची वेळ आली. तेव्हा अनेक वर्षांनी पुन्हा एकदा दोघे समोरासमोर आले आणि सधन व्यक्तीच्या मुलीचा विवाह वैचारीक पातळीवर मूलतः दरिद्री असलेल्या व्यक्तीच्या मुलाशी झाला देखील. हे का? माहिती असतांना दरीत ढकललं त्या मुलीला वडिलांनी. असे का केले असेल? मला असंख्य प्रश्न पडले आहेत. ज्याची उत्तरे नाहीतच. नशीब म्हणून किंवा "विनाश काले विपरीत बुद्धी" असे काहीसे म्हणावे लागेल ह्या प्रकरणात. त्या मुलीची कुचंबणा झाली ते वेगळंच पण दरिद्री माणसाने प्रचंड त्रास दिला, त्याचं सातत्य इतकं होतं कि दाही बोटं तोंडात जावी इतपत. बघा म्हणजे दरिद्री लोकं कुठल्या स्तरावर जाऊ शकतात, त्यांची शक्ती आणि नसलेली बुद्धी कशी त्यांना साथ देते. दरिद्री माणसाला यत्किंचित वाटलं नसेल कि आपण एका हाडा माणसाच्या मनाला छळतोय जी आपली सून आहे, सक्ख्या मुलाची बायको? हि सोयरीक जमली तेव्हा सर्वतोपरी श्रीमंत असलेल्या माणसाची आई हयात होती. मग तिने तर जास्त पावसाळे बघितले होते ना, सगळं ठाऊक असतांना असं घडलं कसं आणि का? त्या मुलाचं नशीब घडवण्यासाठी, का हे दारिद्र्य संपुष्टात आणण्यासाठी? पुढिल पिढी जास्त योग्य उभी करण्यासाठी का पुन्हा एकदा प्रारब्ध म्हणून?
"त्याचा" निर्णय अंतिम आणि योग्य ह्या वर माझा दृढ विश्वास आहे. आपण फक्त खेळाचा एक भाग आहोत हे देखील मान्य आहेच. पण सगळं बघितलं कि आश्चर्य वाटायला लागतं. अनेक आधुनिक संत देखील म्हणतात ना "जे घडून गेलंय ते उत्तम होतं, काही शिकवण देऊन गेलं सर्वांना आणि जे घडणार आहे ते सर्वोत्तम आहे". भूतकाळात झालेले सगळे विसरून जा, सोप्प नाही ते, पण पर्याय नाही, प्रयत्न केलेच पाहिजेत, तो कार्मिक अकाउंट बंद करा कायमचा आणि ह्या पुढे सर्वांसाठी फक्त प्रार्थना करत पुढे व्हा. "ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा