काल अचानक एक चित्रपट माझ्या समोर उभा ठाकला. तो अक्षरशः मला बघ असा काहीसा म्हणाला. मी पण मग तय्यार झाले कारण त्या चित्रपटाबद्दल फक्त तीन ओळी लिहिल्या होत्या. आणि त्या वाचून इतकंच समजलं कि हा चित्रपट गोष्टींबद्दल आहे. त्यातले कलाकार मंडळी खूप म्हणजे खूप मोठी आणि नावाजलेली नावं होती, त्या मुळे पण मग तो बघावासा वाटला आणि अर्थातच तो नवीन चित्रपट होता. मला का कुणास ठाऊक पण शहरातले, नावीन्यपण दाखवणारे किंवा आंतरराष्ट्रीय धर्तीवर आधारलेले असे काहीसे चित्रपट बघायला आवडतात. उगाचच गरीबी, दारिद्र्य, गल्ल्या, बोळ, आणि इतर गोष्टी ज्या आपण नेहेमीच ऐकतो, बघतो किंवा आपल्याला त्या बद्दल नक्कीच करुणा येते, हात जोडले जातात, प्रार्थना केली जाते तेच पुन्हा करमणूक म्हणून किंवा ज्ञानात भर अश्या आशयाने बघायचे नसते. मी आहे अशी आहे. तर तो कालच चित्रपट बघून झाला आणि वाटलं कि हा असा देखील तय्यार करता येऊ शकला असता. त्या चित्रपटाचा शेवट गोड दाखवू शकले असते, अजून काही वेगळ्या पद्धतीने देखील संपूर्ण कथानक मांडता आले असते ई.
मग मलाच पुन्हा लक्षात आले कि त्या वेळी जेव्हा चित्रपटाची कथा त्या चमू समोर आली, किंवा दिग्दर्शकाने रूपरेषा ठरवली, त्याला अनेकांनी आर्थिक पाठिंबा देऊ केला, सगळे लागलेले नियम मान्य झाले आणि शूटिंग देखील झालं, तेव्हा त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी दाखवलं. कदाचित हा चित्रपट सत्यकथेवर पण आधारित असेल. मग त्यामधे जास्त बदल करण्याची मुभा नसेल. किंवा ३ वर्षाआधी काढलेला हा चित्रपट त्या परिस्थिती चपलाख बसला असेल. आणि असे जर प्रत्येकाचे मत लक्षात घेत गेले तर कधीच कुठलेच कार्य साध्य होणार नाहीच. कुठेतरी थांबणे आलेच, स्वीकारणे आलेच. नाही का? आणि चित्रपटच कशाला प्रत्येक क्षेत्रात हे असेच आहे.
"से येस टू द ड्रेस" ह्या कार्यक्रमात एक होणारी नवरी आली, खूप म्हणजे खूप वैविध्य ड्रेस परिधान केले तिच्या आवाक्यातले, पण कुठलाही आवडला नाही, विकत घेतला नाही. मग पुन्हा काही दिवसांनी परत आली. त्यावेळी त्या दुकानाच्या मुख्य व्यक्तीने म्हटलेले वाक्य असे कि "ह्या दुकानात हजारो ड्रेस आहेत. जेवढे जास्त बघत जाशील तेवढे जास्त गोंधळशील. त्या पेक्षा काही बघ, त्यातल्या त्यात आज ह्या क्षणी सर्वार्थाने जो आवडेल, भावेल, त्यात मस्त वाटेल तो निवड आणि थांब. आपल्या अवतीभोवती असंख्य माणसे आहे, खूप संपर्कात येतात, पण आपण एखाद्याला होणारा नवरा म्हटले कि मग बाकीच्यांकडे बघून आपण शोध थांबवतो. खूप त्या पेक्षा चांगले आढळतील देखील पण आपण ते स्वीकारतो".
अगदी तस्से आहे. हा चित्रपट काय, माझ्या सारख्या आईला पण वाटते तेव्हा मी असं करायला हवं होतं, हे का नाही सुचलं? पण ठीक आहे, रात गई बात गई. त्या वेळी जे सुचलं, जे रुचलं, जे योग्य वाटलं ते केलं गेलं आपोआप. बास. आपल्याला मागे नाही पुढे जायचं आहे. आणि मग माझ्यातली संशोधक अचानक जागी झाली आणि म्हणाली कि ह्यालाच तर संशोधन म्हणतात किंवा प्रगल्भ, मोठं होणं म्हणतात. ह्या पुढे जर कोणी तुम्हाला पालकत्वाबद्दल विचारलं तर तुम्ही नावीन्याने भरपूर उत्तर द्या. किंवा हा चित्रपट अजून किती वेगळ्या पद्धतीने उभा करता आला असता? असा जर जनतेला प्रश्न विचारला पुढील भाग काढावा म्हणून किंवा चित्रपट जडण-घडण शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यास म्हणून तर सांगा, किंवा आपले मत त्यांना सहज मेल करून, पत्र लिहून कळवा, त्यावर लेख लिहा नावासहीत किंवा निनावी, कित्ती तरी वैविध्य उपाय आहेत. त्यामुळे गाडी पुढे जाणं अत्यावश्यक आहे, मागे नाहीच, आणि स्थिर पण नाही. कारण थांबला तो संपला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा