माझी राणी, माझी प्रिय गाडी इतकी म्हणजे इतकी नाराज होती माझ्या वर कि ज्याचं नाव ते. आज मी तिला जवळपास १० एक दिवसांनी बाहेर काढली चक्कर मारायला. चूक माझीच आहे कारण मीच तिला मधल्या काळात दररोज माझ्या सोबत कचेरीत जाण्याची-येण्याची, वेळेची, चकाचक राहण्याची, माझी वाट बघण्याची, रविवारच्या सुट्टीची, भुट्ट्याच्या गाडी जवळ थांबून थोडासा शेक आणि भन्नाट सुगंध अनुभवण्याची सवय लावली होती. ती अचानक मागल्या वर्षी बंद झाली कारण मी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे. आताशा मी अगदीच गरज असेल तर बाहेर पडते कारण अनेक वर्ष मी सातत्याने बाहेरच राहिली आहे. आणि अर्थात तंत्रज्ञानाने बहाल केलेले ऑनलाईन चे ऑप्शन इतके म्हणजे इतके माझ्या उपयोगी पडते कि मी माझ्या घरी सुखाने बसून मग कामे करते.
शिवाय सध्या पाऊस फार आहे. खड्डे, खाचखळगे, पाणी साठलेले रस्ते, गर्दी, घाई, ह्या सगळ्यात माझ्या सारखीने का बाहेर पडायचे? अजिबात गरज नाही. त्यामुळे मग माझी राणी बिच्चारी एकटी रुसून फुगून बसली होती. तिला आता मानवायलाच पाहिजे. दररोज नाही तरी एक दिवसाआड चक्कर मारून, छोटीशी का होईना. तिच्याशी गप्पा मारून, तिला माझ्याच सारखी सवय आहे, विविध रस्त्यांवरून जायची. आता अगदी नक्की प्रॉमिस मी तिला नेत जाईन सारखं सारखं. चुकलंच माझं. मला खरंच लक्षातच नाही आलं हिच्या बद्दल. काय हे? सगळीकडे सरदलेले वातावरण, काचा बंद, वरून पाऊस सतत मग त्याचा परिणाम होणारच ना? प्रत्येकावर होतोय, तसाच तिच्या वर पण झाला. माझी सक्खी राणी असल्यामुळे मला खरंच वाईट वाटलं. ह्या नंतर असे होणे नाही.
तिला माझ्याच सारखे मोठ्याने गाणे ऐकणे आवडते, पण आज काही केल्या आवाज मोठा करतच नव्हती. काचा खाली कर गं? असं म्हटलं तर सुरवातीला ऐकलंच नाही पठ्ठीने, सलग कित्ती तरी दिवस सूर्य बाप्पाचे दर्शन नसल्यामुळे मलूल झाली होती. अशी इतकी थंडगार, निरुत्साही मी तिला कधीच बघितले नाही. उलट तय्यारच असायची सतत कुठेही, कधीही जायला. १५ वर्षांचा आमचा सहवास आहे हो, एक नाही दोन नाही. त्यामुळे आम्ही ओळखतो ना एकमेकिंना. आणि ती माझ्याच सोबत जास्त राहिली आहे ना, त्यामुळे अधिक हक्काने नाराजी व्यक्त होत होती तिची. असे ह्या नंतर होऊ नये ह्या साठी आता मला सतर्क राहावे लागणार. अनपेक्षित घडले त्यामुळे जास्तच मनाला लागले आहे माझ्या आज.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा