अगदी न कळत्या वयापासून माझं जीवापाड प्रेम जडलं, आणि ते इतकं म्हणजे इतकं घट्ट होतं, इतकं सुंदर होतं, स्वादिष्ट होतं कि कुठल्याही वेळेला मी एका पायावर उभे असायचे माझ्या प्रेमाखातर. श्रावणी सोमवार, गुरवार, शनिवार, मोठी एकादशी, महाशिवरात्र, आणि असे दिवस म्हणजे मेजवानी हे समीकरण ठरलेलं होतं माझ्या साठी. अगदी म्हटलं ना न कळत्या वयापासूनच. स्वच्छ जागेवरून रेती आणायची, बेल पत्री, बाकी पत्री, पांढरी फुलं, माळा वस्त्र, पिंड करायची, पूजा करायची, शिवस्मरण, आणि मग काय जबरदस्त, ताटलीभर, उत्कृष्ट असे उपवासाचे पदार्थ, कित्ती तरी, अहाहा च. सकाळपासून तक धरून ठेवलेले ते माझे पिटुकले मन आणि पोट, सकाळपासूनच आईची तय्यारी सुरु व्हायची, त्यामुळे घर सुगंधाने भरून जायचे, बहरयाचे, पण नियम कि पूजा झाल्याशिवाय काहीही मिळणार नाही. अर्थात मग पूर्णवेळ शाळा सुरु झाली आणि मस्त डब्बा मिळायला लागला किंवा अर्धवेळ शाळा असल्यामुळे घरी गेलं, दप्तर फेकलं कि आयत्या तटावर तुटून पडायचं. तेव्हा मी हे खात नाही, ते आवडत नाही हे असले नखरे नव्हतेच, येऊ द्या अशी स्थिती होती. काय होते ते दिवस, खरंच. आणि आजूबाजूला, सर्वत्र अगदी सारखे वातावरण. म्हणजे कधीच कोणी उपवास केला नाही हे कधीच कानावर पडलं नाहीच. म्हणजे उपवास करायचाच असतो हेच मला ठाऊक तेव्हा पासून.
काही वर्ष हे समीकरण फारच सुंदर पद्धतीने चालू राहील, पण त्यानंतर माझ्याच नोकरी मुळे आई सारखं काही करता आलं नाही मला, खूप मन खात होतं पण पर्याय दिसत नव्हते. आणि माझ्या मुलांना माझ्या एवढी ओढ नाही ह्या सगळ्या साग्रसंगीत विधींची.
माझ्या मुलगा जेव्हा पहाटे लुडबुड करायचं स्वयंपाक घरात आणि सासऱ्या सारखा कंबरेवर हात ठेवून उभा राहायचा विचारायला "आज काय आहे डब्यात मम्मा ?", उपवासाच्या दिवशी जर मी म्हटलं भगर तर त्याचे डोळे लुकलुकयाचे, इतका खुश व्हायचा आणि मग माझ्या हातचा मस्त मार खायचा, कारण त्याला बर्गर असे ऐकू यायचे. देवा, कुठे भगर आणि कुठे ते पाश्चत्य बर्गर, अर्थात तसं पाहिलं गेलं तर त्यांनी आपल्याच वडा पावाची कॉपी केली आहे, इतकंच काय तो फरक, पण तरी देखील.
आणि आता माझ्या संपर्कातले फक्त काहीच, हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच काय ते उपवास करतात, अगदी काम करणाऱ्या बायकांना धरून. महद आश्चर्य वाटायचं आधी पण नंतर जेव्हा पित्त, ऍसिडिटी, दोन प्रकारचे खाणे करण्यास वेळ नसणे आणि विविध कामाच्या वेळा, ह्या सगळ्यांमुळे मग बहुतांशी दोन हस्तक आणि एक मस्तक एवढंच उरलंय. ते हि नसे थोडके. हवामान, वातावरण, भेसळ, तब्बेतीच्या तक्रारी, वेळ, अवेळी नोकरी त्यामुळे खान-पानाच्या वेळेत बदल आणि त्यामुळे सगळीच किंचित गडगडलेली गाडी.
माझ्या कडे आणि आजूबाजूच्या फ्लॅट्स मधे स्वयंपाक करणाऱ्या एक मावशी होत्या. त्या खऱ्या उपवास करणाऱ्या. निर्जळी किंवा जास्तीत जास्त एका वेळी काही फळं, बास, नाहीतर मी, जास्त म्हणजे अती खात होते उपवासाच्या दिवशी. असो, "कालाय तस्मै नमः"।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा