बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

२०१६: शब्दांच्या अलिकडले


आताशा का कुणास ठाऊक पण एक नवीन सवय माझ्यात रुजू पावते आहे. नित्यनियमाने, अगदी दररोज, सकाळी चहा चा कप हातात आला कि नतमस्तक व्हायला होतं. कोणासमोर म्हणाल तर त्या गाई, म्हशींसमोर ज्यांनी हे दूध दिलं. शेतकरी ज्यांनी आलं तय्यार केलं आणि माझ्या पर्यंत पोचवलं, तसेच गवतीचहा सुद्धा. ऊस शेती अतिशय आव्हानात्मक. हे आव्हान ज्यांनी पेललं, सगळे कष्ट उपसून, साखर कारखान्याला पुरवले आणि जे जे हात साखर तय्यार करून माझ्या पर्यंत पोचवण्यासाठी राबले त्या सर्वांसमोर.  मी तब्बल एक आठवडा चहाच्या बागानात वास्तव्याला होते. तेथे लागणारे कष्ट ह्याची देही ह्याची डोळा बघून आले. कित्ती त्या मुली अनेक तास उभे राहून ती पाने खुडतात, टोपलीत टाकतात आणि मग त्याचे फॅक्टरीत प्रोसेसिंग होते. सर्वांची आठवण झाल्याशिवाय राहात नाहीच.  पाणी ज्यांनी अगदी दाराशी आणून सोय केली त्या सर्व कष्टकऱ्यांचे धन्यवाद, अगदी जशी "गंगा आली रे अंगणी". गॅस, सिलेंडर, स्टोव्ह, लायटर किंवा काडेपेटी ह्या कारखान्यात काम करणारे सर्व कामगार, असे सगळे म्हणजे सगळे प्रेमाने आळवले / आठवले जातातच आपोआप न कळत, आणि चहा फस्त होतो.  अर्थात चहाचे सोबती बिस्किटे अर्थातच त्यांना घडवणारे हात, मशिन्स, आणि पुन्हा एकदा शेतकरी हे देखील आहेतच ना. न विसरता, आमचे हे देखील, कारण त्यांच्याच कष्टाचे फळ म्हणजे हे घर आणि सर्व सोयी सुविधा. त्यांना विसरून कसे चालणार बरे. त्यामुळे त्यांना देखील धन्यवाद दिले जातातच, कोणीच सुटायला नको. 


हि झाली नाण्याची एक बाजू. 


दुसरी म्हणजे समाधान. एकतर सर्व इंद्रिय व्यवस्थित काम करत आहेत, किती कप चहाला किती काय काय घालायचे हे लक्षात आहे. दुसरे म्हणजे इतक्या सर्वांना त्यांच्या मेहेनतीचा मोबदला मिळण्यासाठी आपण भागीदार आहोत, न कळत. 


असा विचार केल्यावर मला जरा हायसं वाटलं नाहीतर "कशी होऊ उतराई" असा विचार सतत येत राहिला. कारण मला एक कप मस्त, चविष्ट, तजेलदार चहा मिळावा हातात म्हणून एका रांगेत बघा ना कित्ती जणांनी कामं केली आहेत, कष्ट केले आहेत. क्या बात है? ह्यालाच म्हणतात नशीब आणि "सुख म्हणजे नक्की काय असतं" ह्या परे? काहीच नाही. आणि फक्त सकाळीच नाही बरं का "त्याने" इतक्या योग्य स्थतीत ठेवलं आहे कि मनात येईल तेव्हा चहा करणे सहज शक्य आहे. आपण तो दोनदा पितो तेवढंच. 


हे सगळं शब्दांच्या अलिकडले असे आहे माझ्यासाठी कारण "दोन हस्तक आणि एक मस्तक" किंवा फक्त मनःपूर्वक दररोज चे धन्यवाद पुरेसे आहेत, शब्दात प्रेरणे अवघडच आणि शब्दापर्यंत पोचण्याआधीच प्रकर्षाने धन्यवाद दिले जातातच. 


अगदी तसेच, मोठ्या प्रमाणावर जेवणाचे ताट समोर वाढल्यावर देखील होते.  


सर्वांचे उतराई व्हा, नतमस्तक व्हा, सर्वांच्या कष्टाची जाणीव असू द्या, कारण कुठलेही काम सोप्पे नाही, आणि सर्वांच्या मदतीशिवाय काहीच चालणार नाही. त्यामुळे हे असचं पुढे चालत राहावं असे वाटत असेल तर त्या सर्व कष्टकऱ्यांना बळ द्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...