अर्धशतकी वाटचाल झाली कि, स्वेच्छा निवृत्ती स्विकारली कि, थोडेसे हात मोकळे झाले कि, मग "ताठ मानेने जगणे" ह्या म्हणीचा, ह्या वाक्यांशाचा अर्थ नीट समजतो, किंबहुना उमगतो, स्पष्टपणे. मला तरी आत्ता जास्त प्रकर्षाने तो कळला. तर त्याचं असं झालं "सारे कळत नकळतच घडले", खूप मोकळेपणाने अनेक आधुनिक गुरूंचे विचार ऐकायला मिळाले, वेळच वेळ हातात असल्यामुळे. अनेक कार्यक्रम बघितले, ऐकले, खूप वाचन झालं आणि त्यामुळे अनेकविध गोष्टी विचार करण्यासारख्या समोर उभ्या ठाकल्या. आपल्या संपर्कात आलेले प्रत्येक जण, हि संपूर्ण सृष्टी, आणि इतर सगळे किती महत्वाचे आहेत, होते, त्यांचं महत्व पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं मला. अर्थात मी काही दुसऱ्यांचे ऐकून किंवा वाचून गप्प बसणाऱ्यातली नाहीच मुळी. मी माझे ध्यान, योगासन, व्यायाम आणि मनन - चिंतन करत असतांना एक जाणवलं ते म्हणजे मानेचं महत्व.
हा असा एक अवयव आहे ज्याच्यामुळे किंवा ज्याच्या मार्फत श्वासाची, अन्न-पाण्याची देवाण-घेवाण होते. नैसर्गिकरीत्या भलं मोठ्ठं डोकं, मेंदू, चेहेऱ्यावरचे सगळे अवयव ह्या सगळ्यांचं वजन पेलण्याची ताकद ह्या मानेत आहे. सर्वदूर बघण्याची कला ह्या मानेच्या हालचालीमुळे शक्य होते. ताठ मानाने जगण्याची कला काय जगणं हिच तर शिकवते, कारण ह्याच तो कक्ष, हीच ती खोली आणि हीच ती पोकळी / जागा जिच्यामुळे बोलणे, विचार पोचवणे शक्य होते, माझ्या मते. अर्थात ह्या कक्षात प्रत्यक्षात काय काय होतं अंतर्गत भागात हे जरी खूप खोलात माहिती नसलं तरी जाणवलेलं फक्त इथे मांडण्याचा प्रयत्न आहे. डोक्यात काय शिजतंय, डोळ्यांनी काय टिपलंय, कानावर काय पडलंय, काय जाणवलं आहे, हे सगळं शब्दात मांडणे ह्या मानेच्या साहाय्याने शक्य होतं. त्यात माझ्यासारख्या आवाजाच्या क्षेत्रात काम करणारीला तर मानेचे आभार मानावे तेवढे कमीच.
सगळ्या अवयवांच्या साथीने, मला माझे विचार एखाद्या विषयांबद्दल अनेक वर्ष माझ्या विद्यार्थ्यांसमोर मांडता आले उत्कृष्टपणे, ताठ मानेने जगता आलं, त्यामुळे प्रत्येक अणुरेणूंचे तर मी आभार मानतेच, आणि मानेचे खास, जिच्यामुळे माझ्या नावाला, कार्याला मान प्राप्त झाला. धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा