रहदारीसाठी नियंत्रण साधने ठिकठिकाणी स्थानापन्न असतात आणि ती चालू परिस्थिती पण असतात. मला आज पर्यंत ह्या वाहतूक सिग्नलचा / तीन रंगांच्या दिव्यांचा एकाच उपयोग ठाऊक होता, तो म्हणजे वाहतूक सुरळीत चालू ठेवणे, मुख्य चौकात. असे चालू सिग्नल्स असले कि रस्त्यावर वाहतूक कोंडी होत नाही, सुरळीत सगळे चारी बाजुंनी जा-ये सुरु राहते. किती जण सिग्नल पाळतात, किती नाही? सिग्नल असून देखील मग पोलीस कर्मचारी का लागतात हा वेगळा विषय झाला चर्चेचा.
आज खरे कारण उमजले मला कि रस्त्यांवर ठिकठिकाणी सिग्नल्स का मांडलेले असतात ते. मला समजलेले कारण सांगण्या आधी हे निश्चित नमूद करू इच्छिते कि मी जेव्हा अमेरिकेत वास्तव्याला होते तेव्हा प्रकर्षाने हे बघण्यात आले कि तेथे गाडी चालवतांना बिनधास्त कॉफी पिणे, नाश्ता करणे ई सुरु असते बहुतांशी सर्वांचेच. कदाचित सकाळी घाई होत असावी त्यामुळे मग एकावेळी अनेक कामे मार्गी लावली जायची. अर्थात तेथील रस्ते अगदीच गुळगुळीत, वाहतूक नियम चोख पाळणारी माणसे, भल्या मोठ्या गाड्या त्यामुळे सगळ्या खाण्या पिण्याच्या गोष्टी ठेवण्यासाठी मुबलक जागा आणि तसेच राहणीमान त्यामुळे चालायचं.
आज मला एक उच्च विद्याविभूषित, तंत्र शिक्षण विद्यालयात प्राध्यापकाचे काम करणाऱ्या एका तरुणीने तिच्या गाडीने सोडलं. तिच्या तीन मैत्रिणी मिळून रोज एकाच गाडीत जातात आणि येतात, आज माझ्या चौथीची भर पडली होती त्यात. संध्याकाळची वेळ, दिवसभर कामामुळे जेवण झाले नव्हते, भूक म्हणजे भूक लागली होती त्यामुळे त्यांच्या ठराविक अड्ड्यावर गाडी थांबली आपोआप. मग काय विचारता, फ़डशाच पाडला कि वैविध्य वाफाळलेल्या पदार्थांवर, सगळ्यांनी. ह्या सगळ्यांमधे सर्वोत्कृष्ट गाडी चालवणारी तरुणी पण होती हो. आणि ती शिताफीने गाडी चालवत, इकडून तिकडून, घुसून काढून शिवाय एका हाताने मस्तपैकी गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेत होती. आणि सिग्नल आला रे आला कि मग शांतपणे घास संपवत होती, किंवा घेत होती. आज समजलं कि जागोजागी आणि ते देखील संध्याकाळच्या वेळेला, चाकरमाने घरी यायला निघाले कि सिग्नल का असतात ते. म्हणजे मग दोन घास माऊलीच्या पोटात जातात हो. थांबून आणि शांतपणे खाणे हे एकदा गळ्यात माळ पडली, दोनाचे चार, मग सहा, आठ झाले कि विस्मृतीत सहज जातातच. त्यामुळे पोटभर खायचे पण आणि गाडी चालवण्याचा आनंद पण घ्यायचा. काय कमाल वाटली मला. अर्थात माझ्या मागच्या कचेरीत सुद्धा मी हे अनुभवलं आहे. सगळ्या चिरतरुण मुलीचं, त्यामुळे नवनवीन गाणे लावायचे, न्याहारी करायची, केस आटोपायचे लागल्यास, गप्पा, गमती जमती गाडी चालवत असतांना. क्या बात है? कित्ती म्हणजे कित्ती ते मल्टि टास्किंग, देवा, खूप अभिमान आहे मला ह्या सर्व मुलींचा. जे बात, अश्याच मस्ती करत पुढे जा सख्यांनो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा