शहाणपण हे असं म्हणतात कि वयानुसार नक्की येतं, म्हणजे काय बोलावं, काय बोलू नये, कसं वागावं ई. अर्थात माणूस आहे, चुका होणार, पण सर्वसाधारण पद्धतीने बेसिक, आधारभूत, मूळ, ई. तरी वयानुसार यायला हवे. घरच्यांशी आणि बाहेरच्यांशी सुद्धा कसे वागावे, बोलावे, उठावे, बसावे, ई. सगळेच आले त्यात. आपल्या पेक्षा छोट्या दर्जाच्या माणसांना कशी वागणूक दिली जाते हे खूप महत्वाचे आहे. फक्त वय नाही, किंवा वय वाढल्यावर मॅच्युरिटी आली म्हणजे नक्की काय तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनां वरून घेतलेला बोध, अनुभवातून शिकत जाणे ई. होय. प्रत्येक गोष्ट हि आई-वडिल सांगू शकत नाही, किंवा मुले ऐकत नाहीत मोठे झाले कि, पुस्तकाला आणि शिक्षकांना पण मर्यादा असतात, पण अनुभव / स्वानुभव हा एक महत्वाचा गुरु आहे. ह्या सगळ्यातून जो शिकत गेला, घडत गेला तो खरा शहाणा. असो.
ज्या घरात मुलं होत नाही, किंवा नको तसे आजार उद्भवतात, मुलं दत्तक घेतली जातात, अश्या एक किंवा अनेक घटना जर, तर आपली लोकं कशी व्यवहार करतात ह्यावरून ते किती मॅच्युअर्ड आहेत हे दिसते ताबडतोब. ज्या घरात असे काहीही नाही, सगळे आलबेल आहे मग तेथे सगळं मस्त असतांना पुढे जाण्यास, समाजासाठी कार्य करण्यास, दररोज चे व्यवहार व्यवस्थित करण्यास केलेल्या कृती खूप काही सांगून जातात.
अनेक अशी कुटुंब आहेत, माणसे आहेत, कुटुंब प्रमुख आहेत जे सगळं व्यवस्थित सुरु असतांना, हत्तीपायी सगळे धड असतांना सकाळ सुरु झाली कि कुरबुर सुरूच करतांना दिसतात. मग अश्या माणसांच्या संपर्कात बरं आहे कि लुळी पांगळी व्यक्ती नाही, किंवा पुढची पिढी स्वतःची आहे, नाहीतर आत्ताच सर्वांचा जीव नकोसा केलायं नाहीतर कायच केलं असतं? विचार देखील करवत नाही. का अशी लोक जन्माला घालतो "तो"? ह्याचं उत्तर काही मला आज पर्यंत मिळाले नाही. कोवीड चा काळ पुढे आला, गेला, ह्या शिवाय अनेक चढ उतार बघितले असतील, कशातूनच काहीच बोध न घेता फक्त आकड्यानी मोठे होण्यात काय अर्थ आहे? जिथे जिथे शांततेने सगळं समजावून घेऊन वागणं आहे, बोलणं आणि चालणं आहे तेथे जास्त अडचणी आहेत, हा एक भाग पण आहेच, न वगळता येणारा. असो. हा कधीही न संपणारा विषय आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा