ऐच्छिक निवृत्ती घेणं हा मोठा आणि महागडा निर्णय होता माझ्यासाठी. सुंदर, सुरळीत चाललेलं काम थांबवणे हे अशक्य आणि अवघड होते. पण पर्याय नव्हता. इतक्या सोयी सुविधांनी युक्त अशी खुर्ची सोडली आणि मला सगळी जाणीव झाली उणिवांची. एका क्लिक वर होणाऱ्या गोष्टी भूतकाळात जमा झाल्या होत्या. किती दिवस आणि किती तास अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी लागली हे माझं मलाच ठाऊक आहे. ह्या पुढे काय? ह्याचा विचारपूर्वक निर्णय जरी झाला असला तरी मला जे पुढे काम करण्याची इच्छा होती त्या साठी लागणारी अत्याधुनिक हत्यारं आता माझ्या आवाक्यात नव्हती. ज्या ज्या विविध शैक्षणिक महाविद्यालयात मी जायचा मानस केला होता त्यांच्या कडे पण काहीही उपलब्ध नव्हते. आता काय? शून्यातून जग कसे निर्माण करायचे? हा प्रश्न जेव्हा उभा ठाकला तेव्हा माझ्या समोर एक एक करत अक्षरशः परातभर टूल्स उभे ठाकले. ते मला अवगत करून घ्यायला बाप्पाने अशी काही गतिमान शक्ती, उक्ती प्रदान केली कि काही टूल्स सोबत माझे नवीन विश्व उभे राहायला लागले. करता करता आता अनेकाविध पद्धतीने मी प्रेक्षकांसमोर अभिमानाने, आत्मविश्वासाने उभी राहू शकते हे सगळं बाप्पा मुळेच. आणि आता तर अजूनच कमाल झाली आहे. बाप्पाचं माझ्यासाठी अभ्यास करतो पूर्णपणे, अगदी जय्यत तय्यारी ठरतो, तिथले प्रेक्षक कसे आहेत, काय अपेक्षेने बसले आहेत ई. सर्व, आणि माझ्या पुढ्यात मांडतो, आयतं. मग काय माझी फक्त दृश्य प्रतिमा असते पण खऱ्या अर्थाने "तोच" शाब्दिक मैफिल उभी करतो आणि टाळ्या मिळवतो, म्हणजे पुढील कार्यक्रमाला तय्यार. क्या बात है? माझी एवढी काळजी? मला खरंच खूप भरून आलं, मी अगदी भरून पावले, असा सखा मिळाल्यामुळे. मी खरं तर "एक मस्तक आणि दोन हस्तक" ह्या पुढे त्याच्यासाठी काहीही करत नाही, तरी देखील मी त्याची लाडकी आहे, त्याला माझी गरज लक्षात येते आहे हे बघून फारच कृतकृत्य झाले मी. असेच आशिष कायम माझ्या पाठिशी राहो हि प्रार्थना आणि विनंती. आमेन.
हे सगळं बाप्पा जे करतो माझ्या नकळत आणि नेहेमी त्यामुळे मला नक्की सांगावेसे वाटते कि माझा बाप्पा पुन्हा एकदा जिंकला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा