असा एक पण दिवस जात नाही जेव्हा मला नकळत माझ्या आईची आठवण येत नाही. आज देखील अगदी तसेच घडले, नकळत. मी फोडणीची भगर करायला घेतली होती. आणि अगदी मंद आचेवर ती तिचे काम करत होती आणि अर्थात मी माझे. तिला मी सोडून दिले होते. आणि मला कळायच्या आत ती पठ्ठी तय्यार झाली पण, शिजून, फुलून, मोकळेपणाने आणि पट्टाकिनी पण. काहीही बघावं लागलं नाही, खाली लागलं नाही, गॅस मोठा करावा लागला नाही, ह्या सगळ्यांमुळे चिंता पाठिशी उभी ठाकली नाहीच. आम्ही दोघींनी आपआपली कामे व्यवस्थित पार पाडली स्मितहास्य राखून. तेव्हा सहज माझ्या तोंडून निघालेच, माझी आई नेहेमी सांगत असे कि मंद आचेवर सोडून द्यावा पदार्थ, मोठा गॅस कधीच करावा लागतं नाही शिवाय भन्नाट चवीचा पदार्थ झटकीनी तय्यार होऊन जातो. हे खरं तर विरुद्धार्थी आहे, मंद आच आणि झटकीनी होणे.
आपल्या मुलांचं मोठं झाल्यावर किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण अगदी तसंच असतं, सगळे जिन्नस घालून, किंवा त्यांना त्याची ओळख करून देऊन सोडून द्यावे. ह्याचा अर्थ असा नाही कि संपूर्ण दुर्लक्ष करावे, पण बारीक लक्ष नकळत राखून, अंतर सांभाळून मार्गक्रमणा करावी. म्हणजे मग एक मोकळीक मिळते आणि चविष्ट रसायन कधी तय्यार होतं ते समजत देखील नाही.
पदार्थ असो वा अजून काही, सतत ढवळत राहायची, केवळ गॅस मोठा होऊ शकतो, मोठा केला कि वेळ वाचतो ई. ह्या सगळ्यांची गरज नसतेच मुळी. हे लक्षात यायला जरा वेळ लागतो. "देर से हि सही..."
बघा स्वतः करून, आजमावून. मज्जा येणार हि खात्री नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा