मी नुकतेच माझ्या हातून घडलेले एक लिखाण एका मैत्रिणीला पाठवले. अधेमधे मी काही जणांना पाठवत असते आणि ते वाचून अभिप्राय देतातही, ज्यामुळे पुढच्या लिखाणात प्रगल्भता येते. ते लिखाण अर्थातच माझा एक अनुभव होता, ज्यात प्रामुख्याने निसर्गाचे आणि माझ्या मुलांचे वर्णन केले होते.
तिने ते व्यवस्थित वेळ काढून वाचले आणि म्हणाली, "छान वर्णन केले आहेस निसर्गाचे, छान लिहिलंयस." मी अर्थातच धन्यवाद देत उत्तरले, "अगं, मी कोण लिहिणारी? अक्षरं आणि लेखणी 'त्याचीच', मी 'त्याला' सांगेन हं की मस्त झालेय लिखाण ते."
मग मला लक्षात आले की, फक्त अक्षरं आणि लेखणीच का? दृष्टी पण त्याचीच आणि सृष्टी पण, नाही का? पाहण्याची ताकद त्यानेच मला बहाल केली आहे. डोक्यात विचार येणं, ते साठवणं, माझी बोटं चालणं, संगणक कसा वापरायचा ही सद्बुद्धी पण त्यानेच दिलेली. अहो, संगणक सुद्धा त्याच्यामुळेच निर्माण झाला आणि माझ्यापर्यंत पोहोचला. लेखक ह्या चौकटीत न बसणारी मी, एका जागी बसून, स्थिर मनाने, माझ्या हातून हे घडवून घेणारा पण तोच!
शाळेत असतांना ते अपरिपक्व वय, अनुभव नसणे यांमुळे मला लिखाण अजिबात आवडायचे नाही. त्यात भर म्हणजे, आजूबाजूला बोलणारे खूप होते: "तुला काहीच जमत नाही, साधं लिहिता येत नाही." यामुळे होता तेवढा उत्साह मावळून गेला होता आणि मी पक्के ठरवले होते की, मी लिहिणार नाहीच; लेखन हा माझा प्रांत नाहीच! मला पण माहिती आहे आणि लोकांना जास्त कळतं मला काय येतं आणि काय नाही ते. म्हणून मी लिखाणापासून लांबच लांब पळत राहिले.
पण 'त्याला' ते कदाचित मंजूर नव्हते. 'त्याच्या' स्क्रिप्ट / पटकथेनुसार, योग्य वेळ येऊन मी दररोज किंवा भरभरून लिहिणार होती आणि आता ते घडतंय. का? हे मला ठाऊक नाही. आता तर मी लिखाण कसं करायचं हे प्रामुख्याने शिकवते (मग ती तांत्रिक किंवा अतांत्रिक कथा असो).
यावरून हे सहज सिद्ध झालंय की, होणार ते होतंच. कर्ता-करविता फक्त तो. "तेरे रास्ते पे मैं तो, आँख मूंद के चला... मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा" किती स्तुत्य वर्णन केले आहे बघा अशा अनेक सुप्रसिद्ध गाण्यांमध्ये, भजनांमध्ये, पोथ्यांमध्ये आणि सर्वत्रच. हे त्रिवार सत्य आहे. हे पुन्हा पुन्हा आपल्यासमोर उभे राहते कारण आपली उजळणी व्हावी, आणि आपण आपल्या मूळ पदावर परत यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा