ऑफिसला जायच्या तय्यारीचा रोजचा एक महत्वाचा भाग म्हणजे पिण्याच्या पाण्याची बाटली आणि डब्बा भरणं. अगदी लहानपणीपासून ते माझं चक्क लग्न होईस्तोपर्यंत हे काम माझ्या वाट्याला कधी म्हणजे कधीच आलं नाही. माझे बाबा आणि आई अतिशय उत्साहाने हे माझ्या साठी करत होते, हातात कधी देत होते हे अजिबात जाणवलं नाही. मग आज मी का बोलते आहे ह्या बद्दल हा सहज प्रश्न आला असेलच ना तुमच्या मनात? तर त्याचं असं झालं, आज मी ऑफिस ला जातांना माझी पाण्याची बाटली भरत असतांना हे सगळं आठवलं, मी पट्टाकिनी जुन्या घरात फेरफटका मारून पण आले आणि पोटात गोळा, डबडबलेले डोळे घेऊन वावरू लागले.
सध्या माझ्याच राहत्या घरातून माझ्याच जुन्या घरात राहायला निघालो आहोत आम्ही. हे सगळं अचानक ठरलं जेव्हा मी नागपूरला माझ्या नवीन ऑफिसच्या कामासाठी गेले होते. असो. पण आज प्रकर्षाने जाणवतं आहे कि मला आताच, ह्याच काळात हि नागपूरची सुवर्णसंधी का मिळाली ते, आणि मला परत येऊन देखील आज एक महिना झाला तरी देखील मी परत का आले नाही? मला क्षणो क्षणी का सतत नागपूरची आठवण येते आहे, का तिथलीच माणसं डोळ्यासमोर उभी ठाकत आहेत, काय चाललंय नक्की? दुसऱ्या घरात गेल्यावर जरी ते माझंच जुनं घर असलं, तरी शुन्यापासूनच सुरवात आहे, तेथे सहज पुन्हा स्थिरस्थावर होण्याकरता आणि हे राहतं घर सोडून जातांना होणार त्रास पट्टाकिनी शमून जाण्याकरीता "त्याची" हि नागपूरची मांडणी होती तर? असं आहे तर, आत्ता समजलं / उमगलं थोडं फार. कित्ती विचार करावा "त्याने" माझा आणि का? मी कोण हो त्याची, एक साधी मुलगी? बास, नाही का? महत्वाचं व्यक्तिमत्व वगैरे नाहीच. आणि राहतं घर जरी अगदी थोडे वर्ष आमचं होत तरी देखील इथले पक्षी, हवा, झाड झुडपं, माणसं, इथले रुटीन / रोजनिशी आता अंगवळणी पडली होती. ह्याच घरात मला माझे पाय परत मिळाले, जेथे एक पाऊल टाकता येत नव्हतं तेथे चक्क एक जिना सहज चढता येतोय, ह्याच घराने मुलांची १० वी - १२ वी साजरी केली ई. अर्थात दुसऱ्या घरात एकदा राहायला गेल्यावर होईल तिथली सवय पण लवकरच. पण हे सगळे बदल सहज सोप्पे नाहीतच पचवायला, आत्मसात करायला, अगदी त्याच्यामुळेच तर नागपूर पेरलं मध्ये. किती आणि कशी उतराई होऊ "त्याची" मला खरंच समजत नाही आहे.
म्हणून ध्यानी - मनी -स्वप्नी नसतांना मला माहेरी पाठवलं, अनपेक्षित लाड झाले, सगळं म्हणजे सगळं आयतं दिलं गेलं, पुन्हा एकदा दररोज पाण्याची बाटली भरून मिळाली न सांगता, गरमा गरम सरप्राईझ आवडते पदार्थ चारीठाव आणि मग नवीन मार्गक्रमणा करायला पाठवलं भरपूर नवीन नाती आणि आठवणींचा साठा घेऊनच.
मला आठवतंय ह्या क्षणी मी असंख्य वेळा माझ्या विविध विद्यार्थ्यांना, मुलांना आणि बरेच जणांना हे समजावून सांगितलं आहे कि जर तुम्हाला थोडसं जरी वाईट / उदास वाटलं तर प्रयत्न पूर्वक आधी उपभोगलेले अप्रतिम क्षण / सहली / पदार्थ आणि इतर जे परमानंद / ओठांवर हसू देऊन जातं ते आठवा म्हणजे उत्साहाने पुढची कामं सुरु करता येतील. आज मला हे सगळं करायचं आहे सहज / नकळत.
प्रत्येक क्षण, दिवस, महिने आणि वर्ष मला फुलासारखं जपलं "त्याने", त्याबद्दल मनापासून शतश: धन्यवाद.