मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

फार मोठी मदत

"काहीही न करणे", "गप्प राहणे", "नको तेथे सल्ला न देणे", "जमेल तेवढंच काम करणे" ई. म्हणजे खूपच मोठी मदत असते. समजा तुमच्या कडे कार्य आहे. त्यात एक तर तुम्ही हिरीरीने भाग घेऊ शकता, पडेल ते काम करू शकता, मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ शकता ई. पण मग ते निभावाव प्रत्येकाने. हातातलं दिलेलं किंवा घेतलेलं काम पूर्णत्वाला नेणं फारच आवश्यक आहे, अर्धवट सोडणे नाही. तुम्हाला जमत नसेल तर हातात घेऊ नका ते काम. ते काम अर्धवट करण्यापेक्षा, चुकीचं करण्यापेक्षा न केलेलं बरं तसं स्पष्ट सांगा, मौन बाळगा. त्यालाच मोठं होणं म्हणतात हो. जेथे हवं तेथे, विचारलं तरच, आणि झेपेल तेवढंच करा.

माझे बाबा नेहमी म्हणायचे एकाच्या डोक्याने चालावं, चांगलं वाईट त्यातून शिकतो माणूस. मनं दुखावू नयेत, उगाच वाद घालू नये, आपलंच खरं करण्याच्या पाठीमागे लागू नये.

एकदा आयतं चाखून तर बघा, कित्ती मज्जा येईल, त्या देणाऱ्याला आणि तुम्हाला देखील. "कुछ ना करके भी देखो". असं मौन पाळणं, मधेमधे न करण, दुसऱ्याला मुभा देणं ई. सोप्प नसतं बरं का मंडळी. चांगलीच बैठक लागते त्याला, मन मोठं लागत आणि सगळं आत्मसात करून आपलंस करण्याची कला पण लागतेच. हळूहळू जमेल, करून तर बघा, ह्या ची गोडी / अनोखी चव चाखून तर बघा. वेगळ्या विश्वात वावरायला शिकाल हे नक्की.

शांतपणा

 
मी उन्हाळ्यात वर्गात गेले कि आधी सगळ्या पंख्यांची गती कमी करते. नॉर्मल दिवस होते तेव्हा देखील आणि आता सुद्धा. नॉर्मल दिवसात तर सगळे विद्यार्थी डोळ्यासमोर वर्गात बसायचे आणि आता अर्धे वर्गात, अर्धे घरी. माझा आवाज पोचेल कि नाही हि मला काळजी त्यामुळे पंख्याची गती कमी करते मी. उकडतं माहिती आहे मला, पण त्यामुळे असलेले सगळेच पंखे ५ वर म्हणजे जरा जास्त होतं, माझ्या दुर्ष्टीने. मग आज मी विद्यार्थ्यांना विचारलं ह्या वर काही उपाय आहे का? तर म्हणतात कसे सर्वत्र वातानुकूलित यंत्रणा हवी मॅडम, म्हणजे पंखे लावावे लागणार नाहीत आणि पंख्याच्या स्पीड मुळे तुम्हाला / शिक्षकाला आवाज मोठा करावा लागणार नाही.  त्यावर मग मी त्यांना शांत-पंखे, सायलेंट-फॅन ह्या विषयी सांगितले. ह्या विशिष्ट पंख्याची खासियत अशी आहे कि गती वाढवली तरी ते भरपूर हवा देतात / फेकतात, गारवा देतात, प्रसन्न करून सोडतात पण अतिशय शांत पणे आणि ह्या अश्या शांत पंख्यांची सगळ्यात मोठी गती ५ नाही तर ८ असते.

ह्या सगळ्या वरून एक जाणवलं मला कि असेच शांतपणे आपल्या सभोवतालच्या व्यक्तींसाठी सज्ज राहावं, न कळत शांतपणे तुम्ही आहात हि भावना रुजवावी, त्या करता महागडा AC च व्हायची गरज नाही, साधा पंखा पुरेसा ठरतो, नेहेमीच.

लेस इस मोअर

तसं पाहिलं गेलं खरंच ऑफिस मध्ये काय लागतंय, एक पॉवर पॉईंट बास, लॅपटॉप असतोच, मोबाईल असतो, त्यामुळे हॉटसॉप्ट तय्यार करून काम सुरु. मग पॉवर पॉईंट कुठेही असो.  अगदी घरी पण तेच असतं. कुठंही अगदी कमीतकमी गोष्टीं सोबत पण राहणं सहज शक्य आहे. आपण उगाचच आपल्या गरजा वाढवून ठेवतो, कारण नसतांना. अर्थात आपण प्रत्येकाकडे बघू तसे / अपेक्षा ठेवू तसे आहे. आणि  त्या हि पलिकडे जाऊन घेऊ तसं. अडून राहायचं नाही कधीच, छोटं घर फार सोप्प आवरायला आणि त्यामुळे बाकी गोष्टी करायला भरपूर वेळ मिळतो, खर्च कमी होतात ई.

अगदी तस्सेच, ऑफिस मधे स्वतःच्याच ठिकाणी कामं होतात असे नाहीच. जाऊ तेथे, लॅपटॉप असेल तेथे, इंटरनेट असेल तेथे, फक्त मोबाईल असेल तेथे, कुठेही कामं सुरु राहू शकतं, आजकाल काही अडत नाही, कारण सगळंच सॉफ्ट कॉपी म्हणजे संगणकावर उपलब्ध आहे. जागेमुळे अडत नाहीच, असू नयेच. बाहेर प्रगत देशात तर इतकी कमालीची स्वच्छता असते कॉलेज मधे कि विद्यार्थी घोळक्यात, एकटे किंवा कोणासोबत बसून कामं करतांना दिसतात. कामं होणं महत्वाचं आहे, कुठे बसून केलीत ते नाही.

आधी होतं आणि मान्य देखील आहे, आपली खुर्ची, आपलं टेबल आणि तो माहोल महत्वाचा असतो, पण अडू देऊ नका. जमेल तेव्हा त्या तुमच्या हक्काच्या ठिकाणाचा पण उपभोग घ्याच. पण "चलते रहो", पुढे जाणं हे महत्वाचं च आहे.

हे मी सध्या थोड्याफार प्रमाणात अनुभवते आहे, कारण प्रत्येक वेगळ्या क्लास च्या वेळी माझ्या बसण्याच्या जागेवरून खालीवर करणं माझ्या पायांना शक्य नाही, त्यामुळे मी जेथे तेथे माझं ऑफिस असं सुरु आहे, कोठेही अडथळा नाही, कामं फटाफट मार्गी लागतात आणि समाधान देऊन जातात. आजूबाजूचे मित्र मंडळी प्रचंड समजूतदार आहेत, ठिकाणाला फारसा भाव न देता वेळेवर / वेळेआधी व्यवस्थित कामं करणं महत्वाचं. धन्यवाद परदेशी अनुभवांना, त्या विद्यार्थ्यांना ज्यांच्यामुळे मला हे कळलं आणि पायांना ज्यांच्यामुळे हे मी प्रत्यक्षात आणलं. अर्थात सध्याच्या नवीन दिवसात हे सगळ्यांच्याच अंगवळणी पडलंय ते वेगळं.  

मोठ्ठं घर, भलंमोठं ऑफिस नकोच, उगाच फाफट पसारा नसला तरी चालतो, लेस इस मोअर हेच खरं.

तेल-विरहीत

थालीपीठ म्हणजे एक सुबक-सुंदर गोलसर आईची बोटं उमटलेले सरबरीत आणि ओबडधोबड पण जगावेगळं चविष्ट असं काहीतरी भन्नाट. ह्या पदार्थाला शब्दात बांधणं म्हणजे गुन्हाच. गोलसर आणि इकडे तिकडे छोटे छोटे भोकं केलेले, मुद्दाम. त्यामुळे दिसायला सुशोभित आणि शिजायला पट्टकन. कारण त्या सर्व भोकांमधे थोड्याफार प्रमाणात तेल सोडलं असतं, अवतीभोवती तर असतंच पण मधे देखील. प्रत्येक घास खुसखुशीत लागावा, चव जिभेवर रेंगाळावी आणि पौस्टिक असल्यामुळे असं खाण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून असेल कदाचित हे तेल प्रकरण. असो.

आमचे एक स्नेही एका दूर देशात वास्तव्याला आहेत. शनिवार रविवार आणि सणासुदीला प्रचंड स्वयंपाकाची आवड म्हणून आणि सेवा म्हणून ते तिथल्या स्थानिक देवस्थानात स्वयंपाक करतात भल्यामोठ्या प्रमाणात. आणि त्यांच्या हाताला भलतीच चव आहे, उत्कृष्टच होतो पदार्थ. एकदा भेट झाली तेव्हा आणि त्यांच्या विविध मुलाखतींमधे देखील ते म्हणतात कि विश्वास ठेवा अथवा नाही, माझ्या पुरतं हे मर्यादित आहे कि माझ्या स्वयंपाकाला चव येते ती "त्याच्या" मुळे आणि भरपूर एक मसाला मनसोक्त वापरल्यामुळे, तेल.

तेलाची कदाचित हि खासियत आहे कि चव येतेच पदार्थाला.

काही वर्षांपासून काही लेख छापून आले काय आणि सगळेच वेडे झालेत. कुठेही कान द्या, हेच ऐकायला मिळेल, हे खाऊ नका आणि ते खाऊ नका. ह्या पठडीतले दोन भयंकर प्रकार माझ्या दृष्टीपथात आले इतक्यातच, एक म्हणजे बिनतेलाचं थालीपीठ, दुसरं तेल वेगळं काढलेले थालीपीठ. बाप रे,मी उडालेच. इतकं सगळं करण्यापेक्षा, सोंग आणण्यापेक्षा, खा हो व्यवस्थित. अती नको आपण मन मारून पण नको. खा आणि पचवा, कामं करा, घरातली स्वच्छता करा, खाल्लेलं जिरेल असं काहीतरी नियमित करा आणि ज्या पदार्थांमधे लागतं त्यात हात आवरून घाला हो, तेल. नाहीतर सांधे त्यांचं काम करणार कसे, वंगण मिळायला नको, तेल तूप वाल्यांचा धंदा चालायला नको, तुमचं घर चकचकीत दिसायला नको. मग हे सगळं साग्रसंगीत हवं आहे ना तर तेल तूप वापरा पण सांभाळून. बास. सोप्प आहे. 

सेलिब्रेशन

असं कुठे लिहिलं आहे का कि फक्त वर्षाकाठीच वाढदिवस साजरा करायचा, किंवा कुठलाही दिवस हा एका वर्षानेच साजरा करायचा. कोणी ठरवलं हे? मला माहित आहे कि आपलं "मोजण्याचे एकक" हे वर्षात असते, म्हणजे किती वर्षाचे झालात, लग्नाला किती वर्ष झाली, नोकरी किती वर्ष केलीत ई. वर्षाचं महत्व ठाऊक आहे मला, पण त्या पेक्षा थोडे अधिक आणि वेगळे दिवस साजरे करावेत किंबहुना अनेक जण करतांना दिसतात आजकाल. मी देखील माझ्या लेकरांचा प्रत्येक महिन्याचा वाढदिवस साजरा केला पहिल्या वर्षी. कदाचित मी नवीकोरी आई झाले होते तेव्हा म्हणून असेल, किंवा प्रत्येक महिना पूर्ण करणे हे सुखदायी होतं माझ्यासाठी त्यामुळे असेल किंवा खरं सांगू इतके जणं यायचे ना पिल्लांना बघायला / त्यांच्याशी खेळायला कि भरपूर कपडे आणि ते देखील विचारपूर्वक वाढत्या अंगाचे आणल्यामुळे मग काय फक्त महिन्याचे वाढदिवसचं नाही तर मराठी आणि इतर सण देखील साजरे झाले प्रत्येक वेळी नवीन कपडे घालून त्याच उद्घाटन करुनच. त्यावरून आठवलं कि आजकाल साक्षगंध झाला तो दिवस, भेट झाली तो दिवस, नोकरी मिळाली तो दिवस आणि असे प्रत्येक दिवस सणांशिवाय बरं का मंडळी, साजरे होतांना दिसत आहेत. मागे झालं ते झालं, अनेक मित्र-मैत्रिणी झाल्या, टिकल्या, संपर्कात राहिल्या ई. पण आता जर नवीन ओळख झाली, तिचं मैत्रीत रूपांतर झालं, सूर जुळले तर तो दिवस दर महिन्याला, किंवा दोन-तीन महिन्यातून एकदा का नाही साजरा करायचा? हा आज मला डोक्यात आलेला प्रश्न. मी नक्की प्रयत्न करणार आहेच, तुम्ही पण करा आणि सांगा कसं वाटतंय, काय वेगळं आहे. अश्या एखाद्या दिवशी सरप्राईझ देऊन बघा, खूप छान आणि वेगळं नक्कीच वाटेल हि मला खात्री आहे. आणि हो एकदा का तुम्ही थोडेसे घरच्या जबाबदारीतून मोकळे झालात कि मग काय कारणं च हवी असतात खळखळून हसायला, एकत्र वेळ घालवायला आणि खूप साऱ्या आठवणी निर्माण करायला, नाही का ? घरच्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, आणि इतर माहितीतले रुळलेले दिवस उत्साहात तर सगळेच साजरे करतात, वेगळं करू या काहीतरी. काय म्हणताय मंडळी?  

जरी प्रत्येक दिवस हा साजरा कारण्याकरताच असतो, तरी देखील त्यात वेगळेपण आणूयात. चला मैत्र सेलीब्रेट करू या. 

One possible example : Monthly friends meeting day


दाग अच्छे है ++

एका भल्या मोठ्या कंपनीचं हे ब्रीद वाक्य आहे, जाहिरातीत प्रत्येक वेळा ऐकतो आपण. हे वाक्य मनावर इतकं बिंबल आहे कि पटायला लागलंय आता. डाग पडले म्हणून आकांडतांडव करण्यापेक्षा सोडून द्यावं, ते निघतील का ह्या कडे बघावं, बास. ऊर्जा बरोबर दिशेला वळवणं अत्यावश्यक आहेच. अगदी तस्सेच मी मागे एका अनुकथेत लिहिल्याप्रमाणे नवीन नॉर्मल दिवसात आपण सगळ्यांनी घेतलेले इंजेक्शन्स पण अच्छे आहेत. माझे सध्या बी१२ चे इंजेक्शन्स चालू आहेत ते पण मग फारच अच्छे आहेत. टोचून घ्या, थोडसं दुखलं तर सहन करा कारण ते प्रकृतीकरता आवश्यक आहे, आणि पर्याय नाही आहे. त्यामुळे गपगुमान सगळेच अच्छे आहे म्हणायचं, ऑल इस वेल म्हणायचं आणि पुढे वाटचाल सुरु ठेवायची. आनंदाचा क्षण उपभोगायचा, तो आपला म्हणायचा असं नाही, प्रत्येक क्षण आपला, नाण्याची दुसरी बाजू पण असते आणि ती बघायला शिकलं तर जगाएवढ्या वैविध्य संधी दिसतात. त्यामुळे आता सगळेच अच्छे आहे म्हणा, माणसं, परिस्थिती, वागणं, चढ-उतार ई. बघू तसं आहे, पण हे आपसूक होऊ द्या, ओढून ताणून नको. रोजनिशीचा भाग असा असू द्या आता तरी, आता पासून आणि नेहेमी करता. काम, छंद, व्यायाम, खाणं, घरची - दारची काम, समाज सेवा आणि इतर गोष्टी ह्या मधे इतकं स्वतःला व्यग्र ठेवा कि सगळंच मस्त दिसेल, हा तो, हे ते चांगलं नाही हे म्हणायला पण वेळ नसावा. कारण सोप्प आहे एकाच्या दृष्टीने एखादी गोष्ट बरोबर तर दुसऱ्यांच्या चूक. मग का पडायचं ह्यात, अनाहूत सल्ला नको. कोणाच्या अध्यात मध्यात नकोच.  

सोय आणि उद्देश

माझ्या दृष्टीने आधीच्या काही अनुकथांमधे नमूद केल्याप्रमाणे प्रत्येकालाच गाडी चालवता येणं हि काळाची गरज आहे. एकतर सोय होते, विद्यार्थ्यांना शिक्षण हे उद्देश असतं त्यामुळे वर्ग असतील तसं पोचणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट्स साठी इथे-तिथे जावं लागतं ई. माझी लेक फारच ते स्वातंत्र, हवेशी गप्पा मारणं, गती, नियंत्रण, ई. मस्त एन्जॉय करते आहे. त्यामुळे एकदम माहितीचा भडिमार करायचा नाहीच असं मी ठरवलं, आणि तसंच वागते देखील आहे, जे तिला फार आवडतंय, आणि त्यातून तिला भरपूर शिकायला मिळतंय आणि वाव पण. असो. तर अचानक एका आडोशाला उभे असलेले पोलीस दिसले आम्हाला ओळीने दोन-तीन दिवस. तो धागा धरून मी तिला सहज सांगितलं कि तुझ्या कॉलेज च्या नेहेमीच्या रस्त्यावर असे पोलीस असतात का थांबलेले ते बघ, लक्ष ठेव. गाडीची कागदपत्र बघून घे, समजावून घे, PUC वेळोवेळी करावी ई. एक अजून वाक्य सांगितलं तिला कि तुझ्या कडे सगळे कागदपत्र आहेत, तू नियमाप्रमाणे आत्मविश्वासाने गाडी चालवत आहेस, तर पोलीस काहीच म्हणणार नाहीत. पण असं होऊ शकतं कि उगाच भलत्या कारणासाठी दंड भरा वगैरे. त्यावेळी उगाच वाद घालायचा नाही, परीक्षा असेल, महत्वाचे तास असतील तर डोक्याला खुराक नको. त्यापेक्षा थोडेसे पैसे द्यायचे मागितले तर, रसीद घ्यायची आणि निघायचं तेथून. त्या पोलीस च्या मुलाला आईस्क्रीम दिल घेऊन आपण असं समजायचं. मग काय करायचं, दुसरा पर्याय नाही. उगाच ह्यामुळेच भ्रष्टाचार वाढतो ई. बोलत बसायचं नाही, त्रागा करायचा नाहीच कारण ते आपलं उद्देश / उद्दिष्ट नाहीच मुळी. अर्थात हा माझा मार्ग, हि माझी पद्धत, ह्या वर दुमत असू शकतं, असायलाच हवं. आणि आधी लिहिल्याप्रमाणे मी फक्त सूचित करते तिला, जबरदस्ती नाही. तिला तिच्या मार्गाने जाण्याची पूर्ण मुभा आहेच. आणि माझ्या मुलीच्या बाबतीत तरी ती तसंच करते, माझं, बाकी मोठ्यांचं ऐकते आणि अतिशय हुशार पद्धतीने कधी फक्त स्वतःला पटेल असं, कधी कॉम्बो अशी कृती करते. बिनधास्त च. असं पाहिजे.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...