कशी कुणास ठाऊक पण अनेक वर्षांपासून मला एक नकळत शिस्त लागली आहे. आठवड्यातून एक किंवा दोन दिवशी घरच्या देवांसाठी सुबक सुंदर हार आणायचेच. काही कारणांनी हार नाही मिळाले तर फुलं आणून हार करायचे. इतके गोंडस दिसतात देव, देवघर आणि एक सुगंधित वातावरण निर्मिती होते. त्यांना काही गरज नसते ह्या सगळ्या हार फुलांची आणि सजावटीची पण आपल्याला नक्कीच आहे, घराला एक घरपण मिळत, माझ्या दृष्टीने. सातत्याने हारवाल्यांकडे जाऊन सुद्धा इतक्या वर्षांनी काल एक वेगळा अनुभव आला, मिळाला. हार वाल्याकडे फक्त दोन हार तय्यार होते. मला जास्त हवे होते त्यामुळे ते तय्यार होईस्तोवर मी दुकानात उभी होते आणि पूर्णवेळ त्या उद्योगाचा वेगळाच आस्वाद घेत होते. संपूर्ण सुगंधित असे ते वातावरण होते. देवाला वाहायची फुले वेगळ्या पठडीतले असल्यामुळे अप्रतिम सुगंध दरवळत होता. मी फारच वेगळ्या विश्वात पोचले जणू. मी काही मिनिटात जर इतकी छान अनुभूती घेऊ शकते तर तो उद्योजक तर दररोज हा अनुभव घेत वृद्धिंगत होणारच. अश्या सुगंधी वातावरणात निर्मिती झालेले ते हार मग आपल्या देवघरात "चार चांद" लावणारच. कधीही कंटाळवाणं होऊ देत नसेल तो मंद सुगंध ह्या व्यावसायिकांना. प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फुले, त्यामुळे हार, गजरे, वेण्या, माळा, तोरणं आणि बाकी सजावट लागेल तशी करतांना अत्यानंद मिळत असेल ह्यात शंकांचं नाही.
मी आचारी ह्या व्यावसायिकांचे पण जवळून अनेक वर्ष निरीक्षण केले आहे. ते देखील एका वेगळ्या सुवासिक घमघमाटात / सुगंधी वातावरणात काम करतात सतत. अनेकांच्या मते त्या सततच्या अरोमा मुळे भूक मरते, काही खावंसं वाटत नाहीच. जबरदस्ती शरीर नावाचं मशीन चालवण्याकरता तोंडात टाकावं लागतं. आणि सर्वांच्या चवीचं झालं कि नाही हि एक काळजी असते सारखी.
आमराईत काम करणारे पण फक्त त्या ऋतूत तो एक अनोखा सुगंध अनुभवत जोमाने काम करत असतील. ऋतू संपला तरी देखील त्या अनोख्या सुगंधाच्या आठवणीत आणि वाट बघण्यात, त्या आंब्यांच्या झाडांचे संगोपन करण्यात सहज दिवस सरत असतील.
अत्तर, उदबत्त्या आणि इतर तत्सम वस्तू तय्यार करणारे पण सतत दरवळत असतील त्यांच्या वागण्या, बोलण्यात, उठण्यात आणि बसण्यात देखील.
मातीचा एक न्यारा सुगंध. बागकाम करणारे, झाडांची निगा राखणारे तो नेहेमीच मनात आणि आठवणीत साठवून ठेवत असतील, नक्कीच.
सौंदर्य प्रसाधनगृहात काम करणारे पण वैविध्य क्रीम्स, लेप, फवारे, सुगंधी द्रव्ये, नेलपेंट्स आणि बरेच काही वापर करतांना प्रसन्न प्रचिती येत असणारच.
बिस्किटे आणि इतर पदार्थ तय्यार करतांना येणार सुवास असे अनेक व्यवसाय मला जाणवले आणि आठवले आज त्या हारवाल्याकडे जाऊन आल्यावर.