"असे कसे बोलायचे न बोलता आता..." हे एक मराठी सिरीयल चे शीर्षक गीत आहे. "शब्देविण संवाद" हि पण सौंज्ञा आपल्याला ठाऊक आहेच आणि "इशारो इशारो मे ..." हे देखील अनेक जणांनी अनुभवलं असेलच, मग तो शिक्षक-विद्यार्थी ह्यांच्यातील संवाद असो, नाहीतर आई-मुलांचा, नवरा-बायकोचा असे अनेक आहेतच. ह्या शिवाय एखादा निरोप, मेसेज, फोन, पत्र, भेट, प्रसंग खूप काही सांगून, शिकवून आणि बोलून जातोच. शब्दच हवेत असे मुळीच नाही. शब्दांच्या पल्याड एक जग आहे, भलं मोठं. त्या जगातील एक मोती मला सापडला काल अचानक. तिचे नाव सौ. दिप्ती कुलकर्णी. मंत्रमुग्ध करणारा असा कार्यक्रम तिने सादर केला. तिच्या हातात जादू आहे हे फारच छोटे वाक्य आहे दिप्ती करता. कमाल आहे तिच्या कलेची. हार्मोनियम ला संवादिनी असे का म्हणतात हे खऱ्या अर्थाने पटवून दिले तिने काल. अक्षरशः शब्द बोलके केले तिने तिच्या पेटीच्या वाजवण्यातून. कित्येक प्रकार, असंख्य राग, गाणी, भजनं सादर केली एका कार्यक्रमात. सगळं अद्भुत आणि प्रचंड आशिर्वादात्मक असाच होता तो अनुभव. इतक्या कमी वयात इतकी उंची गाठणं म्हणजे ह्या जगा पलिकडचेच आहे ह्यात वादच नाही. लोकल-टू-ग्लोबल असा प्रचंड विस्तार आहे तिच्या कार्यक्रमाचा. अनेक देशात, भारतात विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रम सादर केलेत. काल प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर, तुळशीबागेतल्या मंदिरात होते सादरीकरण. आणि अयोध्येत एक नाही, दोन नाही तर तीनदा आमंत्रण आले आणि तिने सादर केले, प्रत्यक्ष प्रभूंच्या जन्मभूमीत. अजून काय हवंय?
फक्त संवादिनी मार्फत जवळपास २ तास सलग दर्दी प्रेक्षकांना खिळवून ठेवून संवाद साधता येतो, त्यांच्या पर्यंत शब्दांशिवाय, बोलांशिवाय पोचता येतं ह्याचे प्रात्यक्षिक दिले दिप्तीने. माझ्याकडे तिच्या बद्दल सांगण्यासाठी शब्दच नाहीत कारण ती कधीच शब्द वापरात नाहीच, पण संवाद लक्षात राहील असे खूप काही देऊन जाते. तिची पेटीशी इतकी जबरदस्त नाळ जुळली आहे कि ती एक तर डोळे मिटून वाजवते, किंवा प्रेक्षकांशी संवाद साधते, त्यांनी तिच्या सोबत गायलेले बघून आनंद उपभोगतो. एका मागून एक विविध गाणी, भजन, राग वाजवायचे, शिवाय साथीदारांशी सतत संवाद साधायचा हे सोप्प नाहीच.
माझ्या मते संवाद हा दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये, दोन सहृदयी माणसांमधे, दोन बंधनात असणाऱ्यांमधे, दोन नात्यात असणाऱ्यांमधे घडतांना दिसतो सहसा. पण असा अनोखा संवाद मी प्रथमच अनुभवाला, जो संवादिनी च्या मार्फत दीप्ती आणि प्रेक्षकांमधें होत होता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही, शिवाय सगळ्या साथीदारांसोबत, सूत्रसंचालकासोबत, आणि इतर असे अनेक. ध्यानस्थ अवस्था गाठणे, अत्यानंद होणे, "सुख म्हणजे नक्की काय असतं" हे नेमकं समजणे असं काहीसं मला जाणवलं काल दिप्तीच्या कार्यक्रमातून.
तिला लाभलेला प्रभू रामचंद्रांचा भरभरून आशीर्वाद बघून, अनुभवून थक्क व्हायला झालं. तिच्या हातून असे असंख्य अजून कार्यक्रम होवोत, अनेक जणांशी तिला संवाद साधता येवो हि प्रार्थना.
https://www.youtube.com/watch?v=clslG3VcB4Q