अगदी समजायला लागल्या पासून माझ्या वेळी तरी एक वाक्य सारखं कानावर पडायचं मग ते आईने सांगितलं असो, किंवा शेजार पाजारी, मित्र मैत्रीण, नातेवाईक, सणसमारंभात सर्वत्र एकवाक्यातच जणू. "उद्या सासरी जायचं आहे...", खाणं, पिणं, बसणं-उठणं, वागणं-बोलणं अगदी प्रत्येक वेळी. अशी जय्यत तय्यारी करून सासरी पोचले आणि तेथे वेगळंच मांडून ठेवलेलं होतं, अगदी सगळं उपर, अनिश्चित, अनभिन्न असं. दोन दशकं उलटून गेली पण पकड मधे काहीच नाही. म्हटलं असं का?
काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला, "ना सासरची ना माहेरची". म्हणजे "घरो घरी मातीच्याच चुली" आहेत तर, हे लक्षात आलं.
मागे एकदा लिहिल्याप्रमाणे ह्या न्यू-नॉर्मल दिवस सरल्यानंतर आमच्या जुन्या घराचा नक्षा नखशिखान्त बदलला गेला. मुलीची,मुलाची आणि ह्याची स्वतंत्र खोली अभ्यास आणि कामाच्या मस्त टेबल सहीत तय्यार झाली. मी मात्र कधी इथे ठाण मांड, कधी तेथे, आज ह्याच्या खोलीत, तर उद्या त्याच्या, नाहीतर मांडी घालून खाली सगळे विविध प्रकार अनुभवले. मग सहज लक्षात आलं कि मी शिकलेली सवरलेली, नोकरी करणारी असून देखील माझा मेज, माझी खोली कुठे आहे? तर कुठेच नाही. माहेरी पण नाही. अरेच्चा. म्हटलं हे काय.
मग कोणाचा तरी स्वर सातत्याने कानावर आला, मंत्रमुग्ध व्हायला झालं अक्षरशः. तो आवाज सांगतो मला कि "श्वास तरी आहे का तुझा गं?" हवा, वारा, प्राणवायू हा आपोआप वावरतो आहे म्हणून आणि श्वासोश्वास यंत्रणा सुरळीत सुरु आहे म्हणून खेळ आहे ना, नाही तर. सगळ्या अत्यावश्यक क्रिया जसे के पचन, रक्ताभिसरण, मनन, चिंतन, चलन-वलन ई. सुरु आहे बिनबोभाट मग? आणि "ह्यात तुझं काय आहे?, तू कशाला जबाबदार आहेस? तुझ्या मुळे काही होतंय का?" अर्थात उत्तर "नाही" असेच आहे, मग चिंता कशाला? आपलं जर काहीच नाही ज्यात प्राण आहे, आपला धरून, तर मग प्राणहीन वस्तू किती आहेत, कोणी वापराव्या ह्या करता तय्यार केल्या आहेत हे सगळं डोक्यात आणण्याची गरज नाहीच सपशेल. जागी हो, वेगवेगळी ठिकाणे अनुभवं आणि मार्ग क्रमण सुरु राहू दे.
हे सगळं घडत होतंच तेवढ्याच माझी एक सख्खी मैत्रीण आहे कचेरीत, तिने सहज विषय काढला. म्हणते कशी, "कचेरीत तरी आपल्याला मान आहे, कामं भरपूर करवून घेतात पण त्याचा मोबदला देखील देतातच ना, पैश्याच्या स्वरूपातच नव्हे तर पाठिवर थाप, प्रशंसा पत्र देतात आणि एक त्यामुळे ओळख निर्माण होते हे वेगळंच, भरपूर शिकायला पण मिळते, वैविध्य लोकांची ओळख होते...". हे सगळं घडण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही कचेरीत येता तेव्हा तुच्यासाठी खास जागा असते नेमलेली, संगणक दिला जातो, खुर्ची आणि इतर लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देखील वेळोवेळी दिल्या जातातच.
मग त्या लेखात "सासरची ना माहेरची" ह्यात एक टप्पा अजून जोडावासा वाटतो "सासरची ना माहेरची पण ऑफिसची / लोकांची". इथे नाही तर तेथे सगळं व्यवस्थित पार पडतंय, घरचे-दारचे ह्या-ना-त्या निमित्याने फुल-ना-फुलाची पाकळी स्वरूपात सगळं करत आहेत, डोक्यावर छत आहे, तिन्ही त्रिकाळ पोटभर वाढलं जातंय, मुलं आहेत, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आहेत, मेंदू जागेवर आहे, समाधान आहे, हेच पुरेसं आहे. कोणी तरी म्हटलं कि "आपल्याला हे शरीर भाड्याने दिलं आहे काही काळा करता, बास, त्याचा सदुपयोग करा, ज्या कार्यासाठी आपली "त्याने" निवड केली आहे ते घडेल निश्चित, हसत खेळत, ह्या नाहीतर त्या जागी बसून, उठून, रांगून का होईना गाडी पुढे जाते त्या बरोबर जा.