जे बागकाम करतात ते देखील खूप वर्षांपासून अनेक प्रयोग करत आले आहेत. एका गुलाबाच्या झाडाला तसं पाहायला गेलं तर एकाच रंगाची फुलं यायला हवीत, पण प्रयोग केल्यामुळे एकाच झाडाला एक फुल अनेक रंगात आणणं शक्य असतं. अर्थात सरते शेवटी हा फक्त एक प्रयोग आहे आणि शिवाय त्या फुलांच्या झाडाला पण जीव आहे, मन आहे, भावना आहेत आणि अर्थात मूड / मनःस्थिती / भावस्थिती आहेच कि. प्रयोग केला माणसाने म्हणजे तो सफलच झाला पाहिजे प्रत्येक फुलागणिक हे कुठे लिहिलं आहे आणि होतं?. त्यामुळेच बहुतांशी प्रत्येक वेळी प्रयोग केलेल्या झाडावर विविध रंगांची / ढंगांची / सुवासाची / आकाराची फुलं येतांना दिसतात. अगदी माणसांसारखंच आहे त्यांचं देखील हे ह्यावरुन स्पष्ट होत. असो.
आमच्या ह्यांनी अत्यंत शिगेला पोचलेल्या उत्साहाने बोगनवेल रोपवाटिकेतून जाऊन आणलं आणि ते देखील उत्कृष्ट हिंदीत शंभरदा खात्री करून घेऊन कि ह्या वेलाला विविध रंगांची फुलं येतील ह्याची हे निश्चित करून. झालं, आले ते बोगनवेल आमच्या घरी वास्तव्याला. अनेक महिने तर त्यांना नवीन मातीत आणि नवीन हवेत रुळायला लागले त्यामुळे कुठलीही हालचाल नव्हती. आताशा बहरलं आहे ते वेल पण फक्त आणि फक्त एकाच रंगांच्या फुलांनी. एक साधी रेश सुद्धा नाही हो दुसऱ्या रंगाची. अर्थात त्या हिरव्या पानांमधे वेलीवर आरूढ झालेली ती फुलं फारच मनमोहक दिसतं आहेत पण ह्यांचा संपूर्ण हिरमोड झाला.
सरते शेवटी बागवान हे जे अनेकविध रंग येण्याचे प्रयोग करतात त्याला "डोळा बांधणे" असे संबोधले जाते. पण प्रत्येक फुलझाडं हे त्याच्या मर्जीप्रमाणे, एकंदरीत सभोवतालच्या वातावरणाप्रमाणे, मातीच्या पौष्टिकतेनुसार आणि अनेक अश्या बऱ्याच कारणांनी एक डोळा बांधा नाहीतर अनेक, त्यांना हवं तस्संच वागणार, फुलं देणार, बहरणार, बास. करत बसा प्रयोग. घराच्या आंगणात / बाल्कनीत नैसर्गिकरीत्या फुललेलं सौंदर्य लुटा, आनंद उपभोग ना? मज्जा येईलच.
पुन्हा एकदा हे सिद्ध झालं कि "आपल्या हातात काहीही नसतं च" आणि "कधीही कुठलीही अपेक्षा करूच नये". बास, आहे त्या सौंदर्याचा लाभ घ्या भरभरून.