बुधवार, २२ मार्च, २०२३

माझ्या डायरीतलं अजून एक पान

माझ्या संपर्कांत आलेल्या असंख्य लोकांपैकी एक खास, माझी मैत्रीण म्हणायला हरकत नाही, ती तशी वयाने, मानाने, अनुभवाने मोठी होती / आहे माझ्यापेक्षा पण तरीदेखील आमची एकदा जी ओळख झाली आणि अजून टिकून आहे. आमच्या तारा फार पट्टिकिनी जुळल्या तेव्हा. तिचाच एक किस्सा येथे नमूद करावासा वाटतो आहे, थोडक्यात सांगते, मुद्द्यावर येते. 

तर तिला एक गोंडस बाळ झालं, थोडसं उशीरा सामाजिक दृष्टीने, आणि काही कारणास्तव तिने झटकीपट निर्णय घेऊन उपचार घेतले आणि त्याचा परिणाम म्हणून हे बाळ जन्माला आलं. उपचार घेणे हा फक्त तिचा एकटीचा धडाडीचा निर्णय होता आणि स्वप्नात देखील हे तिच्या विचारपल्याड होतं कि तिने ते नवऱ्या व्यतिरिक्त अजून कोणाला सांगावे.  गरजच नव्हती. ती दोघे आणि डॉक्टरची फौज च फक्त सगळं सांभाळत होती. पण एकदा नवरोबांनी नकळत काही वर्षांनी ते जगजाहीर केलं आणि सासरी सांगून टाकलं त्या मुलाच्या जन्माचं रहस्य / कहाणी / प्रोसेस. बास मग काय, वर्षाव सुरु झाला त्या दोघांवर. इति सासरकडचे: "तरीच आम्हाला फरक जाणवतं होताच, फक्त आम्ही तो बोलून दाखवला नाही कधी तुला, तुझा मुलगा अगदी ढ आहे, तो कधीच पुढे येणार नाहीच, काहीही करू शकणार नाही, काय करून ठेवलंस हे तुझं? आयुष्य बरबाद केलंस, आता तुझं कसं होणार?....." आणि हे पाढे सुरूच राहिले सतत, खूप वर्ष. ती भीती मग माझ्या मैत्रिणीच्या पण मनात घर करून बसली कारण खूपच प्रमाणात ते सातत्याने सांगितलं जायचं, कुटुंबातल्या बाकी मुलांसोबत सतत तुलना केली जायची आणि काही विचारू नका. तसं पाहिलं गेलं तर त्या मुलाची वाढ अगदी बाकी कुठल्याही मुलाप्रमाणे होत होती, आहे, म्हणजे शारीरिक, सामाजिक आणि मानसिक ई. पण का कुणास ठाऊक भीती मुळे कदाचित ह्या माउलीने कळत - नकळत थोडीशी जास्त कडक शिस्त बाळगली, सगळं शिक्षण व्यवस्थित पार पडलं, पुढील खास क्षेत्रातलं शिक्षण घेणं सुरु आहे, मित्र मैत्रिणी आहेत, मुलगा जगावेगळा हुशार नाही पण ढ नक्कीच नाही आहे.  जरी ह्या भीतीचा माझ्या मैत्रिणीच्या तब्बेतीवर जगावेगळा परिणाम झालाच, भोगावं लागलं, भोगते आहे, पण मुलगा वेगळा नाही निघाला. जगभर असंख्य पालक वैविध्य कारणास्तव वेगवेगळे उपचार घेतात, बाळं जन्माला येतात आणि सगळं सुरळीत होतं देखील. इतका मोठा काळ मधे सरला, तिने मग गूगल विद्यापीठाला विचारलं, शोधलं, शोध निबंध वाचले / चाळले, ठराविक प्रतिष्ठित डॉक्टर्स शी संवाद साधला आणि फरक जाणून घेतला. हे आधी करायला हवं होतं. असो. पण सरते शेवटी सर्वानुमते दोन ठळक गोष्टी समजल्या  

१. नैसर्गिक पद्धतीने किंवा उपचार घेऊन बाळ जन्माला आलं तरी दोन्ही सारखेच असतात आत बाहेर, काहीही फरक नाहीच 

२. नैसर्गिक पद्धतीने किंवा उपचार घेऊन बाळ जन्माला आलं तरी दोन्ही मधे कुठलीही खात्री नसते कि कुठलं बाळ किती हुशार असणार, ते समाजात कसं मिसळणार, त्याची वैचारिक पातळी काय असणार, त्याची वाढ कशी होणार ई. किंबहुना कधीच कशाचीच कधीच खात्री नसतेच, नाही का?

इतक्या खालच्या पातळीला जाऊन, गरज नसतांना त्रास देणं ते देखील स्वतःच्या मुलाला, सुनेला आणि नातवाला हे शिक्षित लोकांचं लक्षण नाहीच मुळी. अर्थात 

जे होतं ते चांगल्यासाठी एवढंच काय ते खरं. आणि जशी कुठल्याही पद्धतीने बाळ जन्माला आलं तरी काहीही फरक नसतो हे त्या सासरकडच्यांनी सिद्ध केलं, ते स्वतः नैसर्गिकरीत्या जन्माला आले, तरी इतकी साधी वागण्याची पद्धत ज्यांना समजत नाही त्यांचा कायच उपयोग, कोण हे इतक्या अधिकाराने बोलणारे, ना उच्च विद्या विभूषित, ना डॉक्टर्स, ना प्रेमळ आई वडिल. असो, हा न संपणारा विषय आहे. 

सोमवार, २० मार्च, २०२३

तो बदल

माझ्या लहानपणीपासूनच अनुभवलेलं लिहायचा मला अधिकार आहे, त्या आधी काय होत होतं ते नकोच. तर मी नेहेमीच भल्या मोठ्या घरात वावरले. त्या वेळी गगनचुंबी इमारती असतात हे देखील मला ठाऊक नव्हतं. शहरात राहून सुद्धा बैठी घरं, बंगले त्या भोवती सुंदर फुललेला, सुगंधाने बहरलेला, सुशोभित, शानदार बगीचा. त्यात असंख्य फुलझाडं, फळांची झाडं, वेली, वृक्ष, भाज्या, दुर्वा, नक्की एखादं कडुलिंबाचं झाडं, आंब्याचं झाडं ई. लावलेले आणि जपलेले असायचेच. सगळंच घरी, हेच बाळकडू मिळालेलं. सर्वत्र हेच वातावरण आणि हिच प्रथा, एक सारखं सगळं आजूबाजूला, जमीन अस्मानाचा फरक नाहीच मुळी. त्यामुळे प्रत्येक धार्मिक कार्याला सगळं घरीच उपलब्ध असायचं, पत्री, फुलं, पानं, अगदी विड्याची पानं देखील. नसतीलच काही कारणांनी तर शेजार देखील बहरलेला आणि फुललेला. त्यात आई, आजी मंडळी घर उत्कृष्ट सांभाळणारी, त्यामुळे सगळं पुढच्या फाटकापासून ते मागच्या आंगणापर्यंत लखलखीत, सजलेलं, संभाळलेलं असंच. काहीच बघायला नको. प्रत्येक पूजा बहुतांशी घरचेच लोक करायचे, पण गुरुजी आलेच तर ते फक्त स्वतः यायचे, पूजा करायचे, दक्षिणा प्रसाद घेऊन निघून जायचे.  आता फ्लॅट संस्कृती + घरची स्त्री उंबरा ओलांडलेली, त्यामुळे मग गुरुजी हा संदर्भ बदलला, पुरता बदलला. सगळे सामान गुरुजींनी आणणं जास्त सोयीस्कर झालं. आता यजमान फक्त बसतात तय्यार होऊन, बाकी सगळं गुरुजी घेऊन येतात. ३६० अंशाचा असावा हा बदल नाही. अर्थात पूजा होणं महत्वाचं, ते संस्कार, लहरी / तरंग (व्हाईब्ज) निर्माण होणं अत्यावश्यक, पूजेसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध होते त्यामुळे, काहीही कमी पडत नाही, सर्वांनाच समाधान आणि सुकर असा हा बदल. 

माझ्या सोसायटीत एक मस्त-मौला काकू राहतात. त्या हाडाच्या शिक्षिका आहेत, एक वेगळं रसायन देखील आहेत आणि आता निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी काल एक पोस्ट शेअर केली आम्हा सर्व मुलींसोबत. त्यात असं नमूद केलं होतं कि "स्वयंपाकाच्या मावशी सुट्टीवर आहेत? तर स्वीगी नकोच आता. शेफ ला कळवा तो / ती येऊन तुमच्या घरी स्वयंपाक करून खाऊ घालेल". अप्रतिम भन्नाट अशी कल्पना आहे हि. मला तर फारच आवडली. मी अजून त्या संकल्पनेचा व्यवस्थित आढावा घेतला नाही, चौकशी केली नाही किंवा चर्चा देखील. पण करीन म्हणते, लवकरच. असं काही उपलब्ध असेल तर कित्ती छान ना, अमृततुल्य असे घरचं खायला मिळेल, चव बदल आणि शिवाय दिज्जग व्यक्तीच्या हातचं जो ह्यात माहीर आहे, अहाहा च. वर नमूद केलेल्या गुरुंजी सारखा तो पण जर सगळं साहित्य, इंडक्शन कुकर, कुटुंब संख्येनुसार भांडे घेऊन आला तर फक्त घरच्यांनी वीज उपलब्ध करून द्यायची आणि यथेच्छ खायचं, बास. कित्ती मस्त ना, म्हणजे जे शेफ झालेत त्यांना खूप मोठी गुंतवणूक करून त्यांचे रेस्टॉरंट सुरु करायला नको, ते सांभाळायला नको, लोकं येतील कि नाही ह्याची चिंता तर नकोच, जाहिरातीचा खर्च नको, खुर्च्या, टेबल, वाट्या चमचे ई. काहीच पसारा नको. जशी गरज तसे घरोघरी जा मस्त स्वयंपाक करून खाऊ घाला आणि पैसे कमवा.  मी तर अगदी फिदा च झाले हि संकल्पना ऐकून, ज्याच्या कोणाच्या सुपीक डोक्यातून हि आली असेल त्याला साष्टांग नमन. हो अर्थात माझ्या लहानपणीपासून लग्न कार्याला येणारे स्वयंपाकी बघितले आहेत मी, पण ते यायचे जेव्हा फार मोठ्या प्रमाणात आणि काही दिवस भरपूर करावं लागायचं तेव्हा. त्यांची पूर्ण चमू यायची. हे शेफ प्रकरण अत्याधुनिक आहे, एकट्याचा खेळ आहे.   

आमच्या माहितीतले दोन गुरुजी आहेत ज्यांनी पूजा करून भला मोठा बंगला बांधला आहे पुण्यात, दुसरे गुरुजी होंडाची सर्वात मोठी गाडी मधून मिरवतात.  ह्याचा अर्थ सरळ आहे कि हा दिसतो छोटा व्यवसाय, एकाने चालवलेला पण मस्त चालतो. प्रत्येक शेफ चे आपले दुकानचं असावे असं थोडीचं आहे. 

सौंदर्य प्रसाधन गृहाचे पण अगदी तसेच आहे नाही का? भला मोठा खर्च, गुंतवणूक करण्यापेक्षा घरोघरी जाऊन सेवा द्यायची आणि कमवायचं, समाधानाने. 

सरते शेवटी घरच्या खाण्याची सर कुठेच नाही. स्वस्थ खा आणि मस्त राहा. एकदा शेफ ला घरी बोलावून तर बघा, आवडेल तो बदल सर्वांना. 

रविवार, १९ मार्च, २०२३

लेस इज मोअर

 मी ह्या आधी लिहिल्या प्रमाणे, अगदी लहानपणी पासून छोट्या छोट्या गोष्टी वाचायला प्रचंड आवडतात. मोठीच्या मोठी कादंबरी ज्यात लांबलचक कथा सुरूच राहते हे शांतपणे संयम बाळगून वाचत राहणं हे माझं काम नाहीच मुळी. कथा सुरु होऊन, संपून त्याचं तात्पर्य समजलं कि दुसरी कथा, असं मला खूप आवडतं.  हि माझी जुनी सवय आता अत्याधुनिक पद्धतीने गोष्टी सांगतात तेथे पण सुरु राहिली आहे. युट्यूब च्या माध्यमातून सांगितलेल्या पण बऱ्याच अप्रतिम गोष्टी आहेत आणि त्या मी बघत असते, आनंद घेत असते, पण पुन्हा एकदा छोट्या, कमी वेळेच्या. तंत्रज्ञानामुळे खूप सुंदर वाखाणण्यासारखे बदल झाले आहे जाहिरात क्षेत्रात देखील आणि अनेक व्यवसाय त्याचा बखुबी उपयोग करून घेत आहेत. जाहिरातींच्या नावाखाली सुंदर गोष्ट सांगितली जाते, त्या पात्र पण असतात आणि संदेश देखील. मोठ्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्या उतरल्या आहेत इथे आणि त्यामुळे माझ्यासारखीला ती एक पर्वणीच आहे, पोटभर सुख भोगते मी त्या सगळ्या गोष्टी बघून. भंडार आहे अक्षरशः अश्या गोष्टींचा ऑनलाईन, बघावं तितकं नवलंच आणि न संपणारं असं. 

एक मुलगी एका मुलाशी ऑनलाईन व्हिडीओ चॅट करत आहे असं पाहिलं दृश्य आहे आणि त्याने सुरवात होते. ती किंचितशी नाही पण जरा जास्त वैतागलेली दाखवली आहे कारण मुलगा परदेशी असतो, ३ महिने काम आहे म्हणून जातो आणि आता काही ८ महिने झाले असतात असा संवाद चालू असतो तेवढ्यात दारावरची घंटी वाजते.  तशीच ती दार उघडते तो त्या मुलाचे आई-वडील दारात उभे, ती व्हिडीओ चॅट स्क्रीन तशीच चालू, आधीच गोंधळ त्यात वाढतो. तेवढ्यात त्याची आई एकमेकांना हाय हॅलो करून झाल्यावर विचारते "देऊ का रे? सांगू का एकदाचं?". काही समजायच्या आत मुलाची आई गुढग्यावर बसून सुबक, सुंदर, देखणी, मौल्यवा, तरुण आंगठी पुढे करत म्हणते "करशील माझ्या मुलाशी लग्न?". तिला काय उत्तर द्यावं ह्या बद्दल समजत नाही. सासू (होणारी): "ह्या वयात गुढगे दुखतात गं, जास्त वेळ नाही बसता येणार मला".  

हे सगळं मंत्रमुग्ध होऊन मी बघत होते आणि मी उडाले, हरवले, एक वेगळीच अनुभूती आली. कित्ती म्हणजे कित्ती ताकद असते ह्या माध्यमांमधे. ते प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत साधे तर काळजाला भिडतात, थेट, आरपार. आणि त्या पल्याड म्हणजे मी ह्या सर्वांकडे फक्त जाहिरात म्हणून नाही तर हे बघितलं कि त्या सातासमुद्रापार असलेल्या त्या मुलाने हि अशी भन्नाट आयडियाची कल्पना आधीच्या पिढीतल्या आई-वडिलांना सांगायची, ती त्यांनी स्विकारायची आणि अमलात आणायची, हि सगळी प्रोसेस कित्ती वेगळी आहे. हे असं कुठेतरी, कोणाबरोबर तरी प्रत्यक्षात घडलं असणार आहे म्हणून ते जाहिरात स्वरूपात माझ्या सारख्या सामान्य प्रेक्षकाला दिसलं आणि समजलं. ज्या कुटुंबात हे बीज पेरलं गेलं त्याच्या बद्दल बोलण्यास माझ्याकडे एकही शब्द नाहीच माझ्या शब्दकोशात. अशी माणसं पण आहेत? ह्या जगात? हे ऐकून, बघून, जाणून धन्य झाल्यासारखं वाटलं. किती तरी पिढ्या ना मस्त पद्धतीने कित्ती आणि काय-काय शिकवून गेलेत बघा काही मिनिटांच्या जाहिराती मधून.  धन्य तो मुलगा ज्याला हे असं सुचलं, त्याहून धन्य ते आईबाबा ज्यांनी फक्त तय्यारी दाखवली नाही तर अत्यानंदाने कृती केली, हो म्हटले, तरुण दिसणारी आवडेल अशी सुंदर आंगठी विकत घेतली, मुलीच्या घरी आले, सरप्राईझ दिलं, अत्याधुनिक पाश्यात्य पद्धतीने गुढग्यावर बसून ऐटीत मागणी घातली, कोणाची बिशाद हो ह्या नंतर नाही म्हणायची? अहाहा च.  

बहुतांशी वर्तमानपत्रात किंवा इथेतिथे ऐकून, वाचून आपण नकळत सैरभैर होतो, कारण वर्तमान पात्रात अगदी पहिल्या पानांपासून भरपूर नकारात्मक बातम्या असतात. कुठंतरी शंका-कुशंका घर करतात. त्यात कामाचा ताण, आणि बरीच बाकीची कारणं. अश्या ह्या दलदल वाटणाऱ्या परिस्थितीत सुगंधी, प्रसन्नता वाढवणारं कमळ उगवावं अशी हि जाहिरात. नकारात्मकता समूळ नष्ट करून सकारात्मकता, उत्साह, ऊर्जा, ताकद निर्माण करणारी अशी हि गोष्ट. हि जाहिरात किंवा अश्या पद्धतीच्या वेगळ्या धाटणीतल्या जाहिराती, शॉर्ट फिल्म्स मोठ्या प्रमाणात जनसमुदायापर्यंत पोचाव्यात हि अपेक्षा. 

वैचार्य आणि जिभभान

देहभान ह्या सदराखाली एक खास लेख इतक्यातच वाचनात आला. त्यात लेखकाने गंभीर नाही पण एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. त्या लेखाचा विषय / शीर्षक बघितल्यावर उत्सुकतेने मी तो वाचायला घेतला आणि अगदी शेवटच्या ओळीपर्यंत माझी ती उत्सुकता कायम होती, कारण माझी नजर काहीतरी वेगळं शोधत होती. ते महत्वाचं असं मला आता वाचायला मिळेल, पुढील परिच्छेदात मिळेल असं वाटलं. अनेक पेहेलू, वैविध्य घटक मांडले आहेत लेखकाने, अतिशय खोलात जाऊन, विचार करून असे. असो. माझे काही विचार आहेत हा लेख वाचल्यानंतर किंबहुना ह्या विषयाबद्दल ते आता मी थोडक्यात येथे मांडते आहे. 

"डाय एम्प्टी (Die Empty)" नावाचं एक जगप्रसिद्ध पुस्तक, वाङ्‍‍मय, एक साहित्यातला शिरोमणी असलेलं माझ्या वाचनात आलं, मग आम्ही त्यावर चर्चा देखील केली एकत्र. त्या पुस्तकाचा विषय जरी वेगळा असला तरी तो गाभा कायम टिकवून मी भारतीय कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित लिखाण करावं हा प्रकर्षाने विचार करते आहे. मूळ पुस्तकाचा विषय हा प्रत्येकाच्या डोक्यात येणाऱ्या अप्रतिम, सुंदर, नाविन्यपूर्ण कल्पना आणि त्या बद्दलचा उहापोह हा आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार नवीन कल्पनेला मूर्त रूप द्या, चर्चा करा, स्वतःकडे जपून / लपवून ठेवू नका, मोकळेपणाने / उघडपणे सांगा आणि अमलात आणा. सगळ्या अप्रतिम कल्पना उराशी बाळगून, त्याचं जडत्व / ओझं सांभाळत निघून जाऊ नका. मोकळे व्हा. 

तसेच प्रत्येकाला जे दुसऱ्यामधे चांगलं दिसतं, आढळतं ते सांगून मोकळे व्हा. भारतीय लोकांची सवय हि आधी हातभार लांब यादी करायची आणि उणेदुणे काढायची आहे.  न विचारता  लांबलचक यादीच द्यायची काय काय चुकतं ते. खूप क्वचित चांगले उद्गार मुखातून निघतात, पट्टाकिनी. 

माझी सर्वांना मनापासून विनंती आहे कि चांगलं बोला, जे आवडलं आहे ते समोरच्याला सांगा, कृतज्ञता व्यक्त करा, गोड बोला, प्रोत्साहन द्या ई. हे मी काही थोडके शब्द किंवा संज्ञा इथे दिल्या आहेत. आणि हे सर्व प्रथम घरच्या, आपल्या माणसांसाठी निश्चित करा, बाहेरच्यांसाठी तर आपण करतोच. आणि मग बघा प्रत्येक नाती कशी फुलतील, बहरतील आणि टिकतील ते. आपल्या माणसाला गृहीत धरून सारखं घालून पाडून बोललात तर कुठलीही कृती हि मनापासून, आवडीने, उत्साहाने घडणार नाही. घरातलं वातावरण पण मग दूषित होऊ शकतं आणि माझ्या दुर्ष्टीने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहेच. प्रत्येकजण अगदी प्रत्येकजण चार चांगल्या शब्दांचा भुकेला असतोच. मध पेरा जिभेवर आणि बघा तरी स्वतःला कित्ती म्हणजे कित्ती भन्नाट वाटतं ते. "अती तेथे माती", हे लक्षात ठेवून उगाचच, धरबंध नसल्यासारखं गोड पेरू नका, मधुमेह होईल नाहीतर. पण उगाचच मोठे आहात म्हणून, अधिकारी आहात म्हणून, किंवा तुमची सवय म्हणून रागावू नका, चुकीचे शब्द बोलू नका, भरमसाठ अपेक्षा ठवू नका, पुढच्यांचा विचार करा आणि बघा तुम्हाला किती समाधान वाटेल ते. तुमचा दृष्टिकोन बदलाचं मंडळी, स्वतःसाठी तरी. ह्या अश्या पद्धतीने एक्सिट घ्या, "डाय एम्प्टी (Die Empty)". नाण्याला दुसरी बाजू असतेच हे लक्षात असू द्या, "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे", फक्त मी काय ते महान बाकीचे नाही हि धारणा चुकून बाळगत असाल तर संबंध बिघडलेच म्हणून समजा. समोरच्याला प्रेम, आपुलकी, काळजी, हवीशी वाटणे होईल ते फक्त मधामुळे. सातत्य महत्वाचं. कोणीही काहीही एकट्याने करूच शकत नाही, आपल्या जवळचा व्यक्ती हि तितक्याच पातळीवर, कणभर जास्त करत असते, ते दिसत असतं पण बोलून दाखवायला जातं नाही सहसा कोणी, आणि मग कुरबुरी सुरु होऊ शकतात, ज्या मग वेगळ्या वळणावर येऊन थांबतात.  तो मार्ग निवडण्यापेक्षा मधाळ रस्ता बरा, नाही का? प्रयोग म्हणून तरी करून बघा, बाकी कश्याची गरज भासणार नाहीच. फुकट आहे उपलब्ध फक्त ते जाणून बुजून नक्की वापरा. जिभेवर साखर पेरण्याकरता समोरच्याचा तसा विचार व्हायला हवा सर्वप्रथम. 

(With due respect to the writer and his deep thought process, giant experience etc behind this article) बाकी लेखात मांडलेले मुद्दे हे गौण ठरतील जर अँप्रिशिएट करण्याची सवय बाळगली तर. "पेराल ते उगवेल" त्या पद्धतीने, अँप्रिशिएट करा आणि ऍप्रिसिएशन मिळवा, करत राहा मिळवत राहा, कुठलीही इच्छा पूर्ण करणे सोप्प आहे कि नाही?

शनिवार, १८ मार्च, २०२३

झोप

एवढ्यातच माझ्या एका मैत्रिणीशी फोन वर बोलणं झालं आणि तिने एक किस्सा सांगितलं. ती आणि तिची एक नातेवाईक आजी म्हणे खूप दिवसांनी फोन वर बोलत होत्या. त्या आजींना बोलता बोलता हि म्हणाली कि रात्री लवकर झोप येते आताशा दिवसभराच्या दमणुकीमुळे. तेव्हा आजी म्हणतात कश्या "बरी येते ग झोप तुला? मला तर खूप त्रास होतो, झोपच लागत नाही". त्या नंतर माझ्या मैत्रिणीला वाटलं उगाच जास्तीचं बोलून गेले, कशाला नको ती माहिती द्यायची? आणि त्या नंतर तिला तिच्या झोपेचे काही किस्से आठवले आणि माझ्या देखील कडा ओल्या झाल्या. त्यातले काही खाली नमूद करते आहे. 

माझी एक अगदी लंगोटीयार, शाळेपासूनची सख्खी मैत्रीण, अत्यंत म्हणजे पराकोटीची आवड झोपण्याची. झोप म्हणजे तिचं औषध देखील. बाकी काहीही लागत नसे, कधीही कितीही वेळ अगदी मनापासून झोप आवडायची. ह्याचा अर्थ ती जाड होती, आळशी होती असं मुळीच नाही. अभ्यासात बऱ्यापैकी हुशार, कामात पुढे, सर्वांची आवडती, गाडी चालवणे, मग शिक्षण, नोकरी, स्वयंपाक, घरातली कामे, विणकाम-भरतकाम  ई. सगळं नेटकं करायची, पण त्या व्यतिरिक्त झोप.  झोप येत नाही हा प्रकार पण जगात असतो हि तिला माहित देखील नव्हतं. तर अशी हि माझी सखी समाज नियमानुसार मग पुढच्या पायऱ्या चढत गेली, मोठी नोकरी, पुढील शिक्षण, लग्न, दोनाचे चार वगैरे. नवरा फिरतीची नोकरी असलेला होता, बऱ्याचदा गावाबाहेर, देशाबाहेर असायचा. आधी तिची गैरसमजूत होती कि त्याला त्याचं ऑफिस पाठवतं आहे कामानिमित्य, पण काही वर्षांनी समजलं की हाच उड्या मारत मुद्दाम बाहेर जात असे. कारणं माहित नाहीत. त्यामुळे एक खांबी तंबू सारखे सगळं हि जमेल तसे करत असे, घरचे, बाहेरचे, मुलांचे ई. मग नवरा कैलास मानसरोवर, एव्हरेस्ट कॅम्प, हि चढाई, ती ट्रेक, इथे जा तिथे जा असं पण करू लागला, काहीच चूक नाही त्यात, पण त्यामुळे महिना महिना गायब साहेब. काही ठिकाणी अजिबात महिनोन्महिने संपर्क नाही, दोन लहान मुलं घरी, फारच मोठी जबाबदारी आणि भीती पण, मुलांना सांभाळण्याची, त्याला काही झालं तर? त्यात ऑफिसचं काम. ह्या सगळ्यात झोप म्हणजे काय? हे ती विसरलीच. संपर्काबाहेरच्या ठिकाणी गेला नवरा कि महिना भर दिवसा ऑफिस आणि रात्रभर जागी. आता हे असं सगळं केल्यामुळे किंवा शारीरिक बदल, ह्या सगळ्यांमुळे तब्बेतीवर प्रचंड परिणाम झाला इतका कि तो कधीही म्हणजे कधीही न भरून निघणारे असे नुकसान. 

त्यामुळे त्या आजींना तिला सांगावसं वाटतंय कि आता पुन्हा ती झोप एन्जॉय करते आहे.  

कठडा

भारतात, पुण्यात किंवा इतर शहरांमधे साधारण १५ एक वर्षांपूर्वी बांधलेली घरं म्हणजे फ्लॅट. महानगरात फ्लॅट हा थोडासा परवडणारा उपाय आहे. फ्लॅट म्हटला कि एखादी बाल्कनी आलीच. बाल्कनी म्हणजे मोकळी / उघडी जागा, जागेच्या सभोवताली असलेला कठडा, त्यावर बार्स / ग्रिल ई. तो कठडा कदाचित ह्या करता बांधतात कि एक तर त्या ग्रिल / बार्स ना एक आधार शिवाय एक सीमा किंवा कुंपण असल्यासारखे, एक आधार किंवा एक सभोवतालचं बांधकाम ई. त्या कठड्याला एक रुंदी, उंची आणि जाडी असते. त्यावर / त्याच्या आधारे बार्स बांधलेले असल्यामुळे कठडा असून सुद्धा त्यावर बसता येत नाही. मध्यमवर्गीय लोकांना सहसा घर म्हटलं कि हिरवळ आणि चार झाडं, त्यामुळे बाल्कनीत कुंड्या ठेवायची सवय आहेच. छोट्या, चपट्या, आयताकृती अश्या कुंड्या मावतील देखील ह्या अश्या कठड्यावर पण बाल्कनी हि घराबाहेर चा भाग असल्यामुळे बऱ्याचश्या सोसायटीत कुंड्या कठड्यावर मांडण्याची परवानगी नाहीच.  मग तसं बघितलं गेलं तर त्या कठड्याच्या सपाट भागाचा खरं काही उपयोग नाहीच. पण सपाट भाग असल्यामुळे त्यावर धूळ प्रचंड साठते, घाण होते, पालापाचोळा ई. पडतो आणि शिवाय ती साफ करतेवेळी प्रचंड काळजी घ्यावी लागते. नाही तर खालून जाणाऱ्यांची दुसऱ्यांदा आंघोळ व्हायची. हे सगळं अनेक वर्ष बघून आज सहज एक डोक्यात आयडियाची कल्पना आली. सपाट भागाशिवाय जर तिरकस किंवा आतल्या भागात उतार असलेला असं बांधला तर? खूप घाण साठणार नाही आणि धुतांना / पुसताना अगदी सोप्पे होईल, खाली जाणाऱ्यांची आंघोळ होणार नाही आणि सगळं पाणी बालकोनीतच पडेल? कित्ती सहज सोप्पं आहे ना? मग का करत नाहीत हे बांधकाम व्यवसायी?

किंवा आधी कठडा देऊन मग नियम करण्यापेक्षा नाही दिला इतका मोठा कठडा, आडवा देण्यापेक्षा उभा दिला तर जास्त सोयीचं होईल माझ्या दृष्टीने. 

गरज किंवा उपयुक्तता हिचं नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची पहिली पायरी आहे. वापरायला लागलं कि मग त्या वस्तूचे फायदे आणि तोटे दिसायला लागतात, नवीन पद्धती सुचवता येतात आणि अश्या पद्धतीनेच एक व्यक्ती / एक व्यवसाय / एक जागा / एक देश पुढे जातो, प्रगती करतो. वास्तुतज्ञांना माझ्या चार डोळ्यांनी टिपलेले असे हे छोटेसे निरीक्षण आवडेल आणि ते ह्यावर नक्की विचार करतील हि अपेक्षा.    

मंगळवार, १४ मार्च, २०२३

पौष्टिक गरम भेळ-उपमा

मी मागे अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या घरी ज्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी आहेत त्या माझ्या स्वयंपाक घरात उभ्या उभ्या हिंडून येतात, कुठे भटकून येतात कुणास ठाऊक?, दुबई का अमेरिका?, पण जातात हे खरं. किंबहुना, माझ्या स्वयंपाक घरात निश्चित नसतात हे खरं. आताशा माझा त्यांच्याबद्दलचा इतका गाढा अभ्यास झाला आहे कि त्यांच्या चालीवरून, घरात शिरण्याच्या पद्धतीनुसार, उत्तर देण्याच्या पद्धत / संभाषण ह्या वरून पट्टाकिनी समजतच. आज देखील दौऱ्यावर होत्या बहुदा, लांब पल्ल्याच्या, त्यामुळे त्यांनी फारच उच्च दर्जाची पौष्टिक न्याहारी करून मला खाऊ घातली. मला विचारल्यासारखं केलं, मी सांगितलं व्यवस्थित, त्यांनी केलं, मी खायला घेतलं आणि उडालेच. मस्त, भन्नाट, नाविन्यपूर्ण पदार्थ मी पट्टदिशी फस्त केला घड्याळाच्या काट्याकडे नजर ठेऊन. खाता खाता हे विचार आले, म्हटलं मांडव इथे, म्हणून हा पंक्ती प्रपंच हो. 

माझ्या पुढ्यात होता तो उपमा. त्याला खरं काय उपमा देऊ हेच समजायच्या आता मी तो संपवला देखील. आज उपवास असल्यामुळे बाकीच्यांसाठी खिचडी होती, हा जगविख्यात उपमा फक्त माझ्या साठी पेशल तय्यार केला गेला होता. त्यामुळे माझी ती नैतिक जबाबदारी होती संपवण्याची. घरी केलेला, गरमागरम, पहिल्या वाफेचा, किंचित तुपाची धार असलेला, कांदे, गाजर, उडीदडाळ, अर्थात मिरची कढीपत्ता सहित साग्रसंगीत असा तो. पोह्यावर, ते देखील घराबाहेर टपरीवर का माहित नाही पण कच्चा कांदा वरून पेरून देतात काही ठिकाणी. संध्याकाळी भेळेत कच्चा कांदा बरा वाटतो, पण सकाळी? खातात बरेच लोकं. असो. पण उपम्यावर कोणी वरून कच्चा कांदा वाढलेला, किंवा घेतलेला मी कधीच बघितला नव्हता. आज मला दुग्धशर्करा योग अनुभवता आला. गरम उपमा आणि ना शिजलेला ना कच्चा माल त्यात. वा, म्हणजे वा च. कोथिंबिरीत रवा होता का रव्यात कोथिंबीर हा पण यक्षप्रश्न पडला मला. पण मज्जा आली, काय ते प्रत्येक वेळी एकसारखं खायचं? विविधता पाहिजे कि नाही?, "एका दगडात दोन..." हो आज, भेळ पण आणि उपमा पण, गरम भेळ. सगळ्या भाज्यायुक्त, अर्ध कच्या, घरी केलेला म्हणजे मस्त पौष्टिक असा. अहाहा, माझ्या दिवसाची सुरवात अतिशय अप्रतिम पद्धतीने केल्यामुळे शतशः धन्यवाद मावशींना. भटकंतीला गेल्या होत्या तेथे शिकून आल्या कदाचित हा असा नवीन पदार्थ आणि ताबडतोब वेळ वाया न घालवता, विस्मरणात जाण्याआधी मला खाऊ घातला देखील. दिसतं होता तो आंतरराष्ट्रीय, परदेशी स्पर्श भारतीय उपम्याला. म्हणून म्हणाले मंडळी, बहुतांशी त्या भारताबाहेर गेल्या होत्या चक्कर मारायला हे सिद्ध झालं जे मला वाटलं होतं, आहे कि नाही मी हुशार?

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...