माझ्या संपर्कांत आलेल्या असंख्य लोकांपैकी एक खास, माझी मैत्रीण म्हणायला हरकत नाही, ती तशी वयाने, मानाने, अनुभवाने मोठी होती / आहे माझ्यापेक्षा पण तरीदेखील आमची एकदा जी ओळख झाली आणि अजून टिकून आहे. आमच्या तारा फार पट्टिकिनी जुळल्या तेव्हा. तिचाच एक किस्सा येथे नमूद करावासा वाटतो आहे, थोडक्यात सांगते, मुद्द्यावर येते.
तर तिला एक गोंडस बाळ झालं, थोडसं उशीरा सामाजिक दृष्टीने, आणि काही कारणास्तव तिने झटकीपट निर्णय घेऊन उपचार घेतले आणि त्याचा परिणाम म्हणून हे बाळ जन्माला आलं. उपचार घेणे हा फक्त तिचा एकटीचा धडाडीचा निर्णय होता आणि स्वप्नात देखील हे तिच्या विचारपल्याड होतं कि तिने ते नवऱ्या व्यतिरिक्त अजून कोणाला सांगावे. गरजच नव्हती. ती दोघे आणि डॉक्टरची फौज च फक्त सगळं सांभाळत होती. पण एकदा नवरोबांनी नकळत काही वर्षांनी ते जगजाहीर केलं आणि सासरी सांगून टाकलं त्या मुलाच्या जन्माचं रहस्य / कहाणी / प्रोसेस. बास मग काय, वर्षाव सुरु झाला त्या दोघांवर. इति सासरकडचे: "तरीच आम्हाला फरक जाणवतं होताच, फक्त आम्ही तो बोलून दाखवला नाही कधी तुला, तुझा मुलगा अगदी ढ आहे, तो कधीच पुढे येणार नाहीच, काहीही करू शकणार नाही, काय करून ठेवलंस हे तुझं? आयुष्य बरबाद केलंस, आता तुझं कसं होणार?....." आणि हे पाढे सुरूच राहिले सतत, खूप वर्ष. ती भीती मग माझ्या मैत्रिणीच्या पण मनात घर करून बसली कारण खूपच प्रमाणात ते सातत्याने सांगितलं जायचं, कुटुंबातल्या बाकी मुलांसोबत सतत तुलना केली जायची आणि काही विचारू नका. तसं पाहिलं गेलं तर त्या मुलाची वाढ अगदी बाकी कुठल्याही मुलाप्रमाणे होत होती, आहे, म्हणजे शारीरिक, सामाजिक आणि मानसिक ई. पण का कुणास ठाऊक भीती मुळे कदाचित ह्या माउलीने कळत - नकळत थोडीशी जास्त कडक शिस्त बाळगली, सगळं शिक्षण व्यवस्थित पार पडलं, पुढील खास क्षेत्रातलं शिक्षण घेणं सुरु आहे, मित्र मैत्रिणी आहेत, मुलगा जगावेगळा हुशार नाही पण ढ नक्कीच नाही आहे. जरी ह्या भीतीचा माझ्या मैत्रिणीच्या तब्बेतीवर जगावेगळा परिणाम झालाच, भोगावं लागलं, भोगते आहे, पण मुलगा वेगळा नाही निघाला. जगभर असंख्य पालक वैविध्य कारणास्तव वेगवेगळे उपचार घेतात, बाळं जन्माला येतात आणि सगळं सुरळीत होतं देखील. इतका मोठा काळ मधे सरला, तिने मग गूगल विद्यापीठाला विचारलं, शोधलं, शोध निबंध वाचले / चाळले, ठराविक प्रतिष्ठित डॉक्टर्स शी संवाद साधला आणि फरक जाणून घेतला. हे आधी करायला हवं होतं. असो. पण सरते शेवटी सर्वानुमते दोन ठळक गोष्टी समजल्या
१. नैसर्गिक पद्धतीने किंवा उपचार घेऊन बाळ जन्माला आलं तरी दोन्ही सारखेच असतात आत बाहेर, काहीही फरक नाहीच
२. नैसर्गिक पद्धतीने किंवा उपचार घेऊन बाळ जन्माला आलं तरी दोन्ही मधे कुठलीही खात्री नसते कि कुठलं बाळ किती हुशार असणार, ते समाजात कसं मिसळणार, त्याची वैचारिक पातळी काय असणार, त्याची वाढ कशी होणार ई. किंबहुना कधीच कशाचीच कधीच खात्री नसतेच, नाही का?
इतक्या खालच्या पातळीला जाऊन, गरज नसतांना त्रास देणं ते देखील स्वतःच्या मुलाला, सुनेला आणि नातवाला हे शिक्षित लोकांचं लक्षण नाहीच मुळी. अर्थात
जे होतं ते चांगल्यासाठी एवढंच काय ते खरं. आणि जशी कुठल्याही पद्धतीने बाळ जन्माला आलं तरी काहीही फरक नसतो हे त्या सासरकडच्यांनी सिद्ध केलं, ते स्वतः नैसर्गिकरीत्या जन्माला आले, तरी इतकी साधी वागण्याची पद्धत ज्यांना समजत नाही त्यांचा कायच उपयोग, कोण हे इतक्या अधिकाराने बोलणारे, ना उच्च विद्या विभूषित, ना डॉक्टर्स, ना प्रेमळ आई वडिल. असो, हा न संपणारा विषय आहे.