मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

अनोखी प्रसूती


मराठी भाषातज्ज्ञाने काय सुंदर पद्धतीने ह्या भाषेला अलंकार चढवले आहेत, वा. ह्या आधी अनेक वेळा ह्याच प्रत्यंतर आलं मला पण आज चा अनोखाचं आहे अनुभव. तो, ती आणि ते हे अगदी लहानपणी शाळेत शिकवले गेले. अर्थात आईची घरची शाळा आणि मग नेमकी शाळा शाळा. शिकवले गेले ते दोन स्वरूपात, एक प्रत्यक्ष, जाणीवपूर्वक, वर्गात, धडे आणि स्वाध्यायाच्या माध्यमातून. दुसरे स्वरूप म्हणजे निरीक्षणातून. एक ठाम मत किंवा शास्त्रीय समीकरण आहे, प्रसूती म्हणजे महिला, मुलगी ह्यांचीच. आताशा सर्वत्रच "आम्ही प्रेग्नेंट आहोत" ह्याचा नारा आहे. आधी तो फक्त होणाऱ्या आई वडिलांपर्यंत मर्यादित होता आता तो आजी आजोबांना पण सामील करू पाहतो आहे. वैचारिक पातळी बदलते आहे. 


आज मी पुन्हा एकदा अनोख्या माहेरी आले आहे. गेल्यानंतर देखील इच्छा पूर्ण होतात ह्या वर माझा आज विश्वास बसला आहे. किंबहुना आई नेहेमीच माझ्या सोबत आहे ह्याची खात्री पटली आज प्रकर्षाने, वेगळ्या स्वरूपात. 


एका काम निमित्य आज मी एका विश्वविद्यालयात आले आहे. तेथे अतिथीगृहात राहते आहे. बैठा मस्त आलिशान बंगला आहे हा. अतिशय मस्त आणि शांत परिसरात वसलेला, पहुडलेला. खूप हिरवळ, झाडी, डोंगर पाठीमागे, मोरांचे आवाज आणि प्रदूषण विरहित जागा. अनेक फळ आणि फुल झाडे आहेत. त्यात एकाच वेळी विराजमान झालेली आंब्याची झाडे आहेत. अचानक मला जगावेगळा, अद्वैत अद्भुत अश्या सुगंधाने मोहित केलं. बघते तर काय एका आंब्याचे झाड मोहराने बहरले मोहरले होते. आणि तेच मला खुणावत होते. अहाहा च. प्रसन्न, प्रफुल्लित व्हायला झाले मला. आयुष्यभराचा सुगंध मी साठवून घेतला माझ्यात आज. ते झाड एक तर लहान, असेल ४ वर्षाचं आणि त्याला जानेवारीत मोहरलेला बहर म्हणजे ते झाड जणू प्रसूत आहे अशी अनुभूती आली मला. लवकरच त्याला फळं धरतील, पहिलटकरीण जशी. ते म्हणजे तो आणि ती चा अनोखा मिलाप माझ्या दृष्टीने. त्या सारखे कणखर उभे ठाकणे आणि ती सारखी मधुर फळे आणि सावली देणे. अशी अनोखी प्रसूती असू शकते ह्याची कमाल वाटली आणि जाणवली मला. ते झाड नेहेमीच प्रत्येक कृतूत बहरू दे अनेक वर्ष हि मनापासून इच्छा आणि प्रार्थना. प्रत्येक प्रसूती जरी अगदी नैसर्गिक, अत्यंत कठीण आणि वेदनादायक असली तरी सुखद असते, शब्दांच्या पल्याड. 


शनिवार, २७ जानेवारी, २०२४

निर्माल्य


आपल्या भारतात आणि मी जगले त्या महाराष्ट्र राज्यात संपूर्ण वर्षभर वैविध्य सण साजरे होतात, घर घरात पूजा केल्या जायच्या आणि एक धार्मिक वातावरण सर्वत्र सारखं असायचं. त्या वेळी ते सहज शक्य होतं कारण बंगले होते, दारात पूजेला लागणारी फुलं-पानं होती, आई हे सर्व करण्याकरता घरी असायची बहुतांशी, ई. पूजेनंतर निर्माण होणारं निर्माल्य घरीच, अंगणात, झाडांना वगैरे घालून जिरवलं जायचं. आणि अर्थात सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळी देवाला वाहण्याच्या फुलांना सुगंध होता, ते नैसर्गिक स्वरूपात वावरत होते. आताचे संपूर्ण दृश्य अगदीच वेगळे आहे. माझ्या पिढी पासूनच सगळ्याच घराबाहेर पडल्या. प्रत्येक सणाला सुट्टी अशक्य. त्यामुळे एकतर थोडक्यात पूजा किंवा नो पूजा अशी परिस्थिती. पुढील पिढीला काही दर्शवू शकलो नाही. इच्छा नव्हती अशातला भाग नाही पण घडू शकले नाहीच. शिवाय सर्वत्र एकसारखे वातावरण. प्रत्येक घरची मुलगी घराबाहेर कामाला. नवऱ्याला, सासरकडच्यांना, मुलांना एक खास विषय "आई काय करते, कुठल्या हुद्द्यावर काम करते". सँडविच पिढी असल्यामुळे कामाला वाघ, ती ओढ पराकोटीची. त्यामुळे पूजा ह्या गुरुजींनी करायच्या, आई कमावतीच हवी आणि पाश्चात्य माहितीची भरमाड ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे सध्याच्या पिढीला मानसपूजेला, ऍक्टिव्ह मेडिटेशन ला जास्त प्राधान्य, फारच प्रॅक्टिकल अप्रोच. आणि मी तो मानते, त्यांच्या विचारांचा सन्मान करते. 


अशी मी, किंवा माझ्या पिढीतल्या मुली आणि आपण सर्वांनी एक फारच महत्वपूर्ण बाब लक्षात ठेवली पाहिजे आणि करायचं तर संपूर्ण व्यवस्थित, अर्धवट नाही. सध्याच्या घाई गडबडीचा काळात पूजा तर करायच्या आणि निर्माल्य रस्त्यावर, कचऱ्यात किंवा नदीत / कुठल्यातरी पाण्यात फेकायचं, हे मूलतः चुकीचे आहे, अपमानास्पद आहे माझ्या दृष्टीने. एक तर पूजा करा आणि व्यवस्थित निर्माल्य जिरवा, वेळ काढून त्याचा सदुपयोग करा, नाहीतर पुजेचा घोळ नकोच. प्रदूषण, अपघात आणि अपमान टाळा. घरच्या सर्वांनी एक सुसंस्कृत नागरिक म्हणून पर्यावरणाची जबाबदारी घ्या. घरी पूजा व्हावी असं वाटत असेल तर त्याला पूर्णत्व द्या.  

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

मातीशी नाळ


प्रत्येक जीव नाळेशी जोडला असतोच. किंबहुना प्रत्येकाला जीव देणारी ती नाळ. अश्या ह्या अनन्यसाधारण महत्व असेलेल्या ह्या घटकावरूनच हि मराठीतली म्हण जन्मली असावी; "नाळ जोडणे". अनेक ठिकाणी सर्वश्रुत असलेली म्हणजे "मातीशी नाळ जोडणे". प्रत्येकाला बाह्य स्वरूपात हे जोडणे शक्य होतेच असे नाही, कारण ते आव्हानात्मक आहे. पण असे आव्हान पेलणारे नक्कीच वेगळ्या धाटणीतले आणि खास व्यक्तिमत्व. अशीच एक चमू आहे, जे सातत्याने संशोधन कार्य अविरत सुरु ठेवतात, लोकार्पण किंवा लोकसेवा, सुदृढता ह्या शुद्ध, सात्विक आणि निर्मळ दृष्टिकोनातून. त्या चमूचे एका नावीन्याने ओसंडणाऱ्या उच्च पदस्थ पण मुळचे शेतीची आवड असणारे, अगाध ज्ञान असलेल्या एका व्यक्तीशी सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे सुपीक माती, सुधृढ गाई / जनावरे, बायोगॅस प्लांट, मुबलक पाणी आणि सर्वार्थाने आत्मनिर्भर अश्या जमेची बाजू असलेले कामाचे ठिकाण. मग काय अमर्यादित क्षमता. त्याचा सदुपयोग करून, प्रयोगाअंती दही आणि लोणी ची कार्यक्षमता वाढवायला सफल झाले. ग्राहक खुश कारण सर्वांना त्याचा परिणाम अनुभवता आला. दही आणि लोणी मातीच्या कुल्लड मध्ये वितरित करायचा प्रयोग यशश्वी झाला, भावाला आणि आवडला. हे सोप्पं नव्हतंच. पण एक अतोनात जिद्द कमी आली. ते कुल्लड तय्यार करणे, विविध्य प्रयोग, मग त्याचे झाकण, मग घरपोच पोचवणे ई. शिवधनुष्य पेलत ते आज यशशिखरावर पोचलेत. मातीशी नाळ जोडणे आपण पुरते विसरलो होतो, जे "ट्रूली देसी" च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून सामर्थ्याने सिद्ध केलं. "केल्याने होतं आहे रे..." हे खरं करून दाखवलं. कुल्लड दही हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. नक्की अजमावून बघाच, आज. 

प्रवेश द्वार


ठिकठिकाणी आपल्या नजरेस पडणारे, अगदी घरी, कचेरीत, देवळात, दुकानात, अगदी कुठेही, आणि त्यात वैविध्य रंगांचे, आकाराचे, प्रकारचे म्हणजे दार, दरवाजे. हे दारं दृश्य आणि अदृश्य स्वरूपाची असतात बरं का. माझ्या पिटुकल्या अनुभवांवरून बोलते आहे मी हे. खैर अदृश्यांबद्दल थोड्या वेळाने बोलू. आधी दृश्य बघुयात. हे खरं तर मी माझ्या एका भूतकाळातल्या विद्यार्थिनी कडून शिकले, किंबहुना तिने मला तिच्या कृतीतून शिकवले. कृतीतून म्हणण्यापेक्षा आचरणातून. हि २०१७ ची गोष्ट आहे, आमची भेट झाली दोघींची आणि त्यानंतर २०२० पर्यंत आम्ही एकत्र होतो. ह्या ३ वर्षांच्या काळात फक्त एकदा तिने मला भिजलेल्या शब्दात थोडक्यात काही सांगितले पण त्यानंतर नाही. तिचा एक मंत्र होता कि कचेरीच्या दारात आलं कि घरं संपूर्णपणे जाणीवपूर्वक विसरायचं, तरच उत्कृष्ट कामे होतील आणि आखून दिलेल्या वेळेत. असं केलं नाही तर मग भज होतं, सगळी गडबड होते आणि काहीच साध्य होतं नाहीच. अर्थात हे घरच्या दारात उभं ठाकल्यावर पण अंगिकाराव, किंबहुना कुठल्याही ठिकाणी हेच सत्य आहे. करमणुकीला गेला असाल आणि जाणीवपूर्वक उत्साहाने जर आनंद उपभोगला नाही तर सगळं व्यर्थ / केरात, नाही का? आणि हो, हे असं करण्यामागे अजून एक भक्कम कारण आहे. आधुनिक संतांकडून ऐकलं आहे कि दारात सातत्याने आनंद+सुख दोन्ही हात पसरवून उभे असतात, आत येण्याकरता. आणि शिकलेली माणसं कुठल्यातरी अगदी नगण्य गोष्टीला कवटाळून दुःख करत बसलेले दिसतात त्यांना. मग कंटाळून ते निघून जातात. त्यांचं घरात नेहेमी स्वागत करा मंडळी, आपल्या मनाची, हृदयाची कवाडं मोकळी करून, उघडी ठेवून. कवाडं बंद झाली कि मग काय डोळ्यावर पण झापड येते. 

माझं अहो भाग्य कि मला त्या वेळी अशी अनमोल संशोधक लाभली. तिच्या ह्या शिकवणी मुळे आज मला सहज सोप्पं जातंय आत - बाहेर करतांना. ती आज खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे, विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे तिची. संपूर्ण डिपार्टमेंट ला शिताफीने पुढे नेण्याचं कार्य ती करते आहे, तिच्या हातून घडतंय. "असे संशोधक येति आणि स्मृती ठेवुनी जाती".

उंबरा असतो प्रत्येक दाराला, भारतात बहुतांशी बाप्पा असतो विराजमान दारावर प्रतीकात्मक असा, देवळात कासव जसा, मग हे सगळं का? सोप्पं आहे, तेथेच सगळं प्रयत्नपूर्वक सोडून आत येण्यासाठी. बास. 

अगदी प्रत्येक जण कळत-न कळत आई, बहीण, बायको, मैत्रीण, शेजारीण, सखी, ई. भूमिका निभावतो ना. मग अगदी तसेच हे पण आहे. एका पात्रातून दुसऱ्या, इतकं सोप्पं आहे. "केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे". ओझं बाळगून आज पर्यंत कोणालाच काहीच मिळालेलं नाहीच मुळी. चला तर मग प्रवेशद्वाराचे महत्व नव्याने समजावून घेऊ या. जेथे प्रवेश कराल तेथले व्हा. 

गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

बीज अंकुरे अंकुरे

 || बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत

कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ||


८० च्या दशकात गोट्या नावाची एक मालिका दूरदर्शन वर प्रदर्शित झाली होती. त्या मालिकेचे हे शीर्षक गीत जे आदरणीय अशोक पत्की सरांनी आकाराला आहे, चाल दिली आहे. आज हे बहुमूल्य असे गीत आठवण्याचे कारण खास आहे. असेच एक आशिर्वादात्मक अंकुर रुपाली आणि अविनाश ह्यांच्या कुशीत बहरू लागले. जगावेगळा आनंद देत होते, ते दिवस काही वेगळेच, शब्दांच्या पल्याड असे. 


|| बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर

लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर

हवी अंधारल्या रात्री, चंद्रकिरणांची साथ ||


सानिकाची दोन्ही घरचे फार प्रेमाने काळजी घेत होते. आणि काही दिवसात / महिन्यात त्यांच्या एक खास बात लक्षात आली ती अशी कि पिल्लुच्या दुधाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एक वेगळ्या दिशेने विचार करणे आवश्यकच आहे. आणि खास निगराणी ला सुरवात झाली, अभ्यास सुरु झाला, संशोधन प्रारंभ केले गेले आणि अनेक विध बाबी समोर आल्या लख्ख निर्मळ प्रकाश जणू. तिथून मग एक भन्नाट वाटचाल आरंभ झाली. 


|| अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड

मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड

निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात ||


एका नवीन अर्भकाचा जन्म झाला ज्याचे नामकरण केले गेले "ट्रूली देसी". मग एक मोहीमच हाती घेतली गेली ज्यात होती काळी-आई आपली माती, अनेक उत्कृष्ट दर्जाच्या अस्सल देसी गाई आणि त्यांची वासरे, कणखर बैल आणि भली मोठी नावाजलेली फौज, जाणकार मंडळी, निष्णात अनुभवी जेष्ठ. हि मोहीम फक्त सानिका पूर्ती मर्यादित न राहता ती महाराष्ट्रातल्या सर्वांसाठीच उभी ठाकली, मोठी होतं गेली आणि ५ वर्ष सातत्याने नानाविध प्रयोग करत बहुमूल्य झाली आहे, वाखणाणली जाते आहे. 


|| नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु

फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु

क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत ||


महावृक्ष आणि कल्पतरू होण्याकडे वाटचाल आहे "ट्रूली देसी" ची. आता त्यांचा आवाका वाढला आहे. नवनवीन प्रयोग सुरूच आहेत आणि यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे, अथक मेहेनत घेत आहेत सगळेच. पण जे ग्राहक "ट्रूली देसी" चे दूध, आणि दुधजन्य इतर पदार्थ घेत आहे, चाखत आहे, अनेक दिवस वापरात आहेत त्यांना मायेने कोणीतरी अशी उत्पन्ने फक्त त्यांच्या साठी खास तय्यार केली आहेत ह्याची जणीव प्रकर्षाने होतं आहे. त्यांच्या आणि कुटुंबाच्या सर्वंकष वाढीसाठी, आरोग्यासाठी हे आत्यंतिक महत्वाचे आहे हे ठामपणे उमगले आहे. 

प्रत्येक सूर, ताल, शब्द, गंध, वाद्य अशी जगावेगळी जुळवाजुळव होऊन जशी गान निर्मिती होते अगदी तसेच काहीसे "ट्रूली देसी" चे नियोजन जुळले आहेत. भक्कम पायावर इमारत उभी आहे ज्यात प्रत्येक बाबींचा प्रकर्षाने, अनुभवणे आणि संशोधक पूर्व असा अभ्यास नजरेस पडतो आहे. प्रत्येक गाईंची काळजी, त्यांचा आहार, विहार, दुधाची गुणवत्ता, वैविध्य अत्यावश्यक चाचण्या, शुद्धता, सात्विकता, प्रवाहनत प्रत्येक वेळी घेतलेली काळजी आणि घरपोच वितरण, शिवाय हवे तेव्हा प्रत्यक्ष शेतात जाऊन अनुभव घेण्याची सोय. ऑर्केस्ट्रेशन अगदी वाखाणण्याजोगं. 

अशीच "ट्रूली देसी" ची उत्तरोत्तर प्रगती होवो हि मनःपूर्वक प्रार्थना आणि सदिच्छा. 

ती


अगदी काही दिवसांची होती ती, दुपट्यात गुंडाळलेली, भन्नाट गोरी पिल्लू. तेव्हा जर कधी गरज पडली तर मी असायचे, कधी खेळवायला, कधी खाऊ घालायला, कधी आईचं / घरचं साफ सफाईचं काम होईस्तोपर्यंत वगैरे. नंतर मग हा क्लास कुठे लावायचा, हे कुठे मस्त मिळतं अशी छोटीमोठी बातचीत होतं असे तिच्या सोबत किंवा बहुतांशी तिच्या आई बरोबर. 

आज तब्बल १६ वर्षांनी तिलाच मी साडी नेसवली कारण आज तिचा दहावीचा निरोप समारंभ आहे शाळेत. गेले कित्येक दिवस तिच्या आईची लगबग सुरु होती, आमच्या गप्पा देखील होतं होत्या. साडी कुठून घ्यायची, मेकअप - केस कुठून कसे कधी करायचे ई. मग एकदाची साडी तय्यार झाली, आणि नेसली पण गेली. क्या बात है? इतकी गोंडस दिसत होती म्हणून सांगते ती, अनेकदा दृष्ट काढली तरी कमीच आहे. तीच जी माझ्या हातात मावत होती, कडेवर बसत होती, मी सांगितलेल्या गोष्टी ऐकत होती,मी  दाखवलेले पक्षी आनंदाने बघत होती, ती आज साडीत, ह्याची देही ह्याची डोळा, खूप भाग्यवान समजते मी स्वतःला. शेजारी इतके मनापासून जवळ असतील हे जाणवलं. मी मोठी झाले आहे हे जाणवलं नाही, असं वाटलं ती तर काल पिल्लू होती, आणि आज बघा एक व्यक्तिमत्व घडतंय तिच्या रूपात. एक नावीन्याने-भरपूर पुण्याची राणी, झाशीची नाही हो. काय काय बोलू आणि काय नाही असं झालयं मला आज. अगदीच आमने सामने घरं, त्यात दोन्ही घरात जुळी त्यामुळे एक वेगळंच नातं, ते स्नेहबंध जुळले गेलेत. खूपच पिटुकली बाब आहे पण मला भावली खूप मनापासून. म्हणून हा पंक्ती प्रपंच. 

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

माझ्या चष्म्यातून


अगदी न कळत्या वयापासून मी माझ्या आईला प्रत्येकाला पोटभर खाऊ घालतांना बघितलं आहे, मग ते घरी येणारे पाहुणे असो, मित्र मॆत्रिणी, नाहीतर रोजच्या मावशी. मला देखील मग तशीच सवय लागली. जमेल तेव्हा जमेल तसं मी पण फुल-ना-फुलाची पाकळी खिलवू लागले. "वर्क इज वर्शीप" / "काम हीच पूजा" ह्या प्रमाणे चाकरमाने ८-१० तास दररोज घराबाहेर असतात. त्यात माझी कचेरी हि गावाबाहेर. त्यामुळे आणि ह्या म्हणीच्या संदर्भातून मी कचेरीत बोलावलेले पाहुणे देखील कधी विन्मुख गेले नाही, काही तरी खाऊनच गेले नेहेमी. शिवाय मला माझ्या PhD च्या गुरूंनी नेहेमी खाऊ-पियू घालून खूप काळजी घेतली मग मी पण मागे राहते काय. माझ्या फड च्या तरुण विद्यार्थ्यांसोबत मी मस्त मेस मध्ये जाऊन भरपेट / यथेच्छ खाऊन येत असे, अनेक वेळा. आमच्या मीटिंग तेथेच होतं बऱ्याचदा. 


मग माझे पाय सूचित करते झाले कि आता जरा हळु मार्गक्रमणा करावी. पण त्यावेळी देखील पाहुणे येणं, PhD मीटिंग ई. सुरु होतंच. मी त्यातून सुवर्णमध्य काढले. एक म्हणजे मी कोणाला दुसऱ्याला पाहुण्यांसोबत जेवण करायला विनंती करत असे. नाहीतर दुसरं म्हणजे जर पाहुणे मस्त ओळखीचे असतील, काही मानणारे नसतील तर उत्तम बेत आधीच आखून घरून अप्रतिम चविष्ट असे त्यांच्यासाठी पण डब्ब्यात घेऊन जात असे. ताटल्या, वाट्या, चमचे ई. सगळे साग्रसंगीत. कधीतरी आणि आधी माहित असल्यावर सहज शक्य होतं ते मला. माझ्या पायाने जाऊन मेस मध्ये खाण्यापेक्षा खूपच चांगला पर्याय. 


मी आताशा अनेक संस्थांमध्ये विविध विषयांवर बोलायला जाते आहे. काही ठिकाणी माझ्या PhD च्या विद्यार्थिनी असल्यामुळे त्यांना ठाऊक आहे माझी सवय. त्या मस्त डब्बा घरून घेऊन येतात माझ्या करता. पण इतर ठिकाणी माहिती असून आणत नाहीत, जेवायची वेळ असतांना सुद्धा, हक्काने खाऊ घालणं ते देखील ओळखीच्या मैत्रिणीला हि साधी माणुसकी झाली, नाही का? असो. मी नेहेमीच माझी सोय करून जाते म्हणून वाईट वाटत नाहीच. हसू येतं. माझा दृष्टिकोन असा झाला आहे हे कदाचित मला बदलावं लागेल.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...