१९९५ पासून ते २०२३ पर्यंत, मधे साधारण एखाद वर्ष वगळले तर मला दोन रकाने सातत्याने भरलेले दिसायचे. रकान्यातले सगळेच खाणे नाही तरी बहुतांशी ये-जा असायचीच. किंबहुना ह्या सगळ्या खाणे आणि रकान्यांनी एक नकळत सवय लावली मला. भरलेले, बहरलेले रकाने बघायची, अनुभवायची आणि त्यामुळे शांत राहण्याची. शांत म्हणण्यापेक्षा स्थिर. एक भरोसा होता कि ते रकाने भरत राहणार आहेत. हालचाल होत राहणार आहे. ती हालचाल, किंवा त्यातला एखादा देखील रकाना कधी रिकामा होईल हे स्वप्नात देखील अनुभवलं नव्हतं. कधीच होणार नाही हि खात्री होती. तो भरोसा दांडगा होता. मला माझ्यात ती शक्ती त्याने बहाल केली होती. डोकं चालू ठेवलं होतं आणि पराकोटीची त्याची कृपा कि सर्वांपासून तसं बघितलं तर अलिप्त पण ठेवलं होतं. एक स्वच्छंद राहण्याची सवय तरी देखील हात राखून सगळे व्यवहार.
पाच वर्षांपूर्वी एक दिवस आला आणि मार्ग बदलला. हळू हळू अनपेक्षित बदल घडत गेले, डोळे खाड्कन उघडतं गेले आणि वेगळे ना भूतो ना भविष्यती असे अनुभव, प्रसंग उभे ठाकले. माझे सर्व प्रेमळ सहपाठी, कचेरीतले, घराजवळचे, शाळेतले, इतर मित्र-मैत्रिणी सर्वतोपरी धावून आले, प्रचंड प्रोत्साहन दिलं. त्यामुळे गाडी रुळावर आली पण संथगतीने, संथगतीसोबत. ते देखील पचवायची ताकद दिली त्याने. आणि आता मात्र त्या दोन रकान्यांपैकी एक रिकामा झाला. भरेल संथगतीने ह्यात शंका नाहीच. पण रिकामा रकाना बघायची सवय नाही. रिकामा रकाना बघावा लागेल कधी मला हे माझ्या खिजगणतीत नव्हतंच. अर्थात हे पचवण्याची ताकद देखील तोच देईल ह्या वर २०० टक्के खात्री आहे. मी वाट बघत नाही पण अनेक महिन्यांपासून एक फुलाच्या पाकळी एवढी रक्कम येऊ घातली होती. माझ्या डोक्यातून निघूनच गेली होती. आज लक्षात आलं म्हणून तपासून बघितलं. हा महिना, मागचा महिना, पण नाही, रकाना रिकामा होता. पुढील महिन्यात येईल ह्याची खात्री आहे आणि आता पाकळी पेलायचीच ताकद उरली आहे. त्यामुळे येणार, सातत्य राहणार त्यात आणि गोगलगाई सारखी गती मिळणार हे निश्चित. तो पाठिशी असतांना मी कोण काळजी करणारी हो. पण ह्यातून एक लक्षात आलं कि अगदी जे आपले असतात, अगदी प्रेमाचे, जवळ पेक्षा जवळचे अश्यांचे रकाने रिकामे राहू देऊ नयेत कधी. फुलाची पाकळी द्यावी ताकद असल्यास. आज माझे आई आणि बाबा हयात असते तर त्यांनी हे निश्चित केलं असतं कुठेही गवगवा न करता, आपसूक. माझ्यात देखील त्याने ताकद द्यावी, टिकवावी म्हणजे मला कोणाला तरी रकाने भरायला मदत करता येईल, ताकदीप्रमाणे. "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" आज समजला आणि उमगला ह्याचा अर्थ.
ह्याचा अर्थ असा नाही कि काहीही करून फक्त तो रकाना भरण्यासाठी आटापिटा करायचाच, नावडीचे काम करत आणि जुंपलेले राहायचे. शारीरिक आणि मानसिक क्षमते बाहेर जाऊन गाडी चालू ठेवायची. नाही. त्यामुळे रकाने अजून सपाट्याने रिकामे होऊ शकतात. त्यामुळे सजग राहा आणि योग्य ते कर्म करत राहा.