रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

युगानुयुगे


काही दिवसांपूर्वी पंगतीच्या जेवणाचं महत्व नमूद करणारा ब्लॉग लिहिला गेला होता माझ्या हातून. त्यात मुखत्वे मी भावी जोडीदाराची निवड करण्याचा तो चपराख मार्ग आहे असं लिहिलं होतं.


पंगत जेव्हा अस्तित्वात होती किंवा सर्रास आधी घरच्या कर्त्या पुरुषांनी जेवायला बसायचं असा अलिखित नियम होता. मग अंगत-पंगत घरच्या अन्नपूर्णेची आणि इतर मुलींची व्हायची. घराच्या आत हात धुवायची सोय असो नाहीतर बाहेर, किंवा पाऊस पाणी असेल तेव्हा, आधुनिक घरात काय आजकाल बऱ्याच घरात अगदी सोप्पं जावं म्हणून दोन पाउलांवर लगेच बेसिन मांडलं असतंच. त्यामुळे तेथेच हात आणि मनोभावे स्वच्छता म्हणून तोंड देखील धुतलं जातं. हि मध्यम वर्गीय पुरुषांना, मुलांना लागलेली सवय, कदाचित लावलेली किंवा निरीक्षणातून शिकलेली म्हणावं. आता थोडासा, अगदी यत्किंचित बदल झालेला आढळतो. मुलं मुली समान, सर्वार्थाने सारखे हक्क, सगळेच घराबाहेर कामानिमित्य ई. मुळे सगळेच एकत्र जेवायला बसतात. अर्थात मागे पुढेच. आधी पुरुषांना वाढलं जातं, मग कदाचित मुलांना आणि मग मुली / घरच्या अन्नपूर्णा. अन्नपूर्णेचे लक्ष सर्वत्र. कोणाला काय हवं नको ते बघत, थोडेसे सावकाश, कारण उरलेले संपवायला, भांडी ताबडतोब घासायला टाकायला मोकळे म्हणून, आणि अश्या अनेक कारणांनी त्यांचे जेवण संपायला अवधी होतो. पुरुष मंडळी पट्टाकिनी खाऊन हात धुवायला मोकळे आणि ते देखील मोकळे पणाने. स्वतःचे यथेच्छ जेवण झालं म्हणजे झालं. बाकी कुठल्याही खिजगणतीत नाहीतच. बरं कितीही देश विदेशी जा, अंतर्देशीय शाळेत शिका, भल्या मोठ्या हुद्द्यावर काम करा, चांगल्या सवयी अंगीकारणे लक्षात येतंच नाही. बाकी सर्व समाजात, वेळे आधी चार गोष्टी सुनावल्या जातात ह्या २०२४ मध्ये देखील. पण अत्यावश्यक असे, आपल्याच घरच्या लोकांचा प्रत्येक वेळी आदर, मान, त्यांचं अस्तित्व काही म्हणजे काही नाहीच. घरात अनेक ठिकाणी हात + तोंड धुवायची सोय असतांना, दार लावून घेण्याची तसदी, चार पाऊल चालून जाण्याचे कष्ट हे सुधृढ लोक जे अती शिकलेले आणि अती अनुभवी समजतात, मिरवतात आणि दर्शवतात देखील. कुठे जातो ह्यांचा शहाणपणा कोणास ठाऊक. हे साधं सांगायची काही गरज पडावी म्हणजे अहो आश्चर्यम. बरं ह्यांच्या सोबत बसलं नाही तर चालत नाही, त्यावरून सुरु होतं, त्यांच्या नंतर बसावं तर अन्न थंड होतं, उशीर होतो. आधी जेवलं तर शिष्ठपणा (त्यात घरी सासू सासरे असतील तर) आणि खूप बारीक सारीक उरतं. सगळ्याच बाजूने गोची करून ठेवली आहे मुलींची. असो. 


पंगतीत असलेला एक नियम लावणं आता फारच आवश्यक झालाय. सर्वांनी एकत्र वाढल्यावरच सुरु करायचं आणि सर्वांचं झाल्याशिवाय उठायचं नाही, मग काहीही झालं तरी. ह्या नियमामुळे मुली व्यवस्थित जेवतील तरी. 


काही घरात म्हणतात कि रात्रीचे जेवण तरी सर्वांनी एकत्र करावे. मग ते अन्न उपभोगू द्या ना सर्वांनाच. बसा जरा त्यांच्या सोबत. त्यांना वाढा, आग्रह करा, गप्पा मारा, किस्से ऐकवा. आताशा सर्वच नियम धाब्यावर बसवले आहेत आपण, मग जेवल्या जेवल्या च हात धुवायचे हे पण थोडेसे बाजूला सारा. जेवा आणि जेवू द्या.  

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

फेशियल


फेशियल हे खूळ इतक्यातच जास्त जोम धरतेय. इतक्यात म्हणजे झाले असेल एक तप कदाचित. मला काही त्यात फारसा रस नाहीच. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आधीच्या मुली / स्त्रिया काय करत असतील? हा प्रश्न मला नेहेमी पडतो. काही दिवसांपासून मला त्याचं उत्तर गवसलं म्हणून हा पंक्ती प्रपंच. आधी एक तर संपूर्ण पौष्टिक असे पदार्थ सेवन होत असतं. त्यात परसात उगवलेल्या भाज्या, स्वतःच्या शेतीतले पिकलेले सगळे भरपूर प्रमाणात मिळत होते. मुबलक होते सारेच, त्यात स्वच्छ हवा, निरोगी वातावरण, निर्मळ प्रदूषण विरहित श्वास देखील सामील होते. पाणी लख्ख असे आणि दगदग त्या मानाने फारच कमी. घड्याळाच्या काट्यावर दुर्लक्ष करत पळापळ नव्हती घरच्या स्त्रीची. घरचे आणि बाहेरचे, मुलांचे, पैशाचे, आणि इतर अनेक असे विविध मार्गी क्लेश नव्हतेच. त्यामुळे देखील एक तेज कायम होतं त्यांच्या चेहेऱ्यावर आणि व्यक्तिमत्वावर देखील. बाहेर खायला उपलब्धच नव्हतं त्यामुळे आईची घरी किंमत होती, फारच मोठ्या प्रमाणात. आता हॉटेल / रेस्टारंट मध्ये पाटी असते अगदी घरच्या सारखं म्हणून आणि घरी आणण्या च्या मसाल्यांवर म्हणतात हॉटेलचा स्वाद. सगळा सावळा गोंधळ उडाला आहे. म्हणून मग नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायला, स्ट्रेस नावाचा सवंगडी झाकायला तो फेशियल चा आधार. 


आणखी एक पराकोटीचे महत्वाचे कारण म्हणजे तेव्हा सातत्याने स्वयंपाक घरीच होत होता, मसाले घरचे आणि बहुराशी सगळेच घटक स्वच्छ आणि शुद्ध स्वरूपाचे. त्यामुळे मसाले युक्त, ठराविक वेळी, दररोज कमीतकमी दोनदा उत्कृष्ट वाफ मिळायची. ती योग्य प्रमाणातली उष्णता, आणि एकंदरीत बाष्पीभवन फारच सर्वांसुंदर, बहुमूल्य असा परिणाम द्यायचा. तो नजरेस पडायचा. विहिरीवरचे पाणी, जात्यावरच्या दळण, पाट्यावरचे ओले मसाले, गॅस + कोळशाचे समीकरण, तुळशीच्या प्रदक्षिणा, जमिनीवरची उठबस, विविध पीठं मालाने + लाटणे, वैविध्य तेलांचा सर्वतोपरी वापर ई. आणि अनेक अश्या कारणांमुळे उत्कृष्ट उपयोग होत असे. मुख्य म्हणजे चिमण्या तेव्हा फक्त घराबाहेर वास्तव्याला असायच्या. जेव्हा पासून चिमण्यांना स्वयंपाक घरात अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं तेव्हा पासून बिघडलंच सगळं, म्हणजे प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने हो. "कालाय तस्मै नमः". मी आणि आमची अख्खी पिढी ते जगलो आणि आता हे जगतोय, सुंदर आठवणी जाग्या झाल्या, आई, आजीची भेट घडली आज नव्याने पुन्हा एकदा. त्यांच्या सगळ्यात आधुनिक अश्या तेव्हाच्या माजघरात, स्वयंपाकघरात, कोठीच्या खोलीत चक्कर मारता आली मला. 

तांदूळ


गेले काही दिवस किंवा महिने म्हणा आमच्या घरी एक नवीन वारं वाहतं आहे, ब्राउन राईस नावाचं. बदल हाच स्थिर आहे ह्यावर माझा दृढ विश्वास असल्यामुळे आणि मी दररोज च्या जेवणात भात खात नसल्यामुळे मी तो सहज करायला सुरवात केली. ह्यांना आवडतो ना, गरजेचं आहे ना मग चला तर पुढे. तो भात शिजायला जरा जास्त वेळ घेतो नेहेमीच्या पांढऱ्या तांदळापेक्षा. म्हणजे अगदी कुकरला लावा नाहीतर भांड्यात शिजवा वेगळा तो वेळ घेतोच हे प्रकर्षाने जाणवलं. थोडसं डोकं लावलं तेव्हा समजलं कि पांढरा म्हणजे पॉलिश केलेला, वरचे थर काढून तयार केलेला असा. त्यामुळेच तो पट्टाकिनी शिजतो हो. 


ह्या छोटयाश्या अनुभवावरुन एक सहज जाणवलं कि प्रत्येकाने अगदी असेच राहावे प्रतिदिनी. जेव्हा हवे तेव्हा थर पांघरावे. नाण्याच्या दोन बाजू इथे देखील निदर्शनास येतात. एक म्हणजे गेंडा कातडी व्हावे गरजे नुसार आणि काही म्हणजे काही अंगाला न चिटकू देता पुढे मार्ग क्रमणा करत राहावी. आणि दुसरे म्हणजे विविध गूण संपादन करत राहावे, शिकावं, नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात, व्यक्तिमत्व बाहेरून जाईल असे नेहमीच पाऊल उचलत राहावीत आणि त्याचे थर पण भार नाही असे मार्गस्थ होत राहावे. ह्या मुळे स्वतःला अत्यानंद होतोच, अनुभवामृत चाखायला मिळते आणि तुमच्या आदर्शांवर बाकींना पण मग मार्ग दिसतो. 


अजून एक कंगोरा असा कि हवं तेव्हा थर काढून पण टाकता आले पाहिजेत. आजची पिढी त्याला अन लर्निंग असे संबोधते. नको ते झटकून टाका पट्टाकिनी आणि पुढे मार्ग स्वच्छ मोकळा निर्मळ असा तय्यार होतो. असे नको असलेले थर काढून टाकले कि अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी, गमती, आत्मसात करण्यास सुकर जातं, अगदी त्या पांढऱ्या तांदळासारखे. 


बघा म्हणजे ते इतके बारीक तांदुळाचे दाणे देखील मला कित्ती शिकवून गेले आज. अर्थात आपण हे सगळं करतंच असतो सदोदित न कळत, पण आता कळते पाणी करा, थोडीशी मेहेनत घेऊन करा, करत राहा. एकदा करून भागणार नाहीच, सदोदित पुढे चालायचं म्हणजे सातत्य महत्वाचे. असे केल्याने मग अमृतानुभवची प्रचिती नक्की येईल.  

प्रसिद्ध उपयुक्त म्हणी


शहाण्या माणसाने कोर्टाची आणि पोलिसांची पायरी कधीही चढू नये म्हणतात. मला ह्यात एक अजून ठिकाण जोडावंसं वाटतंय ते म्हणजे हॉटेल / रेस्टॉरंट्स. घरच्या अन्नाला तोडच नाही. अगदी अपरिहार्य कारणांमुळे किंवा अगदी क्वचित बाहेरचं खाणं ठीक पण शक्यतो नकोच. अगदी स्टार हॉटेल मध्ये तरी अनेकविध नियम, अटी लागू पडतात, पाळाव्याच लागतात त्यामुळे ते उत्तम दर्जाचे घटक पदार्थ वापरात असतील अशी आशा आहे. पण छोटी ठिकाणं म्हणजे जरा प्रश्नचिन्हच. काही अपवाद वगळता बाकींबद्दल न बोललेलं बरं. पैसे देऊन तब्बेत स्वतःच्या हाताने बिघडवून घेण्यात काय अर्थ आहे. आणि आधुनिक गुरु आणि त्याच्या संस्था पण सांगतात कि बाहेरचं खाणं टाळा, अनेक अर्थाने. त्यांच्या दुर्ष्टीने घरी जशी आई स्वयंपाक करतांना तिच्या मायेचा स्पर्श आणि मसाला त्यात मिसळतो, आशीर्वाद असतो आणि मनापासून इच्छा देखील कि हे अन्न सेवन केल्यावर माझ्या कुटुंबाला फायदा व्हावा, तब्बेती सुधृढ राहाव्यात ई. तसे बाहेर जे स्वयंपाक करतात, तुम्हाला वाढून आणून देतात त्यांना जर बरं नसेल, त्या वेळी भूक लागली असेल किंवा ते चमचमीत पदार्थ खायची इच्छा उत्पन्न झाली तर मग तो मसाला मिसळला जातो न कळत त्या अन्नात. त्याचे कदाचित परिणाम होतात खाणाऱ्यावर. हे एक महत्वाचे कारण आहे स्वच्छता आणि घटक पदार्थांशिवाय. 


मला एक सांगा, जे घरी, फ्लॅट मध्ये राहतांना सहज कुत्रा पाळतात, तो एक सजीव प्राणीच आहे. त्याला माणसापेक्षा जास्त वास टिपण्याचे इंद्रिय आहेत. तो एक घराचा सदस्य म्हणून राहतो किंबहुना त्याला तसे पाळले जाते, माणसासारखे. पण अनेक संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे कुत्र्यांना माणूस जेवतो ते अन्न चालत नाही त्यांचं स्वतःच वेगळं असतं आणि तेच द्यावं लागत त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने. बंद, वातानुकूलित फ्लॅट मध्ये राहतांना त्या श्वानाला घरची सगळी मंडळी जेवत असतांना सुगंध येत असेल आणि खायची इच्छा देखील, साहजिक आहे. त्याचं वेगळं खाणं झालं असलं तरी देखील. आणि आपण टाळतो द्यायला. मग त्याची इच्छा नेहेमी होते त्याचं काय? 


प्रत्येक जणच घरी काम करणाऱ्यांना खाऊ पियू घालतातच असे नाही. आणि आजकाल तर कधीही कोणीही त्यांच्या वेळेनुसार खातात. मग ती पण हाडामासाची माणसेच आहेत ना. 


माझ्या मते ह्याचा पण परिणाम होत असावा. तेव्हा अगदीच गरज असेल तरच घरी पक्षी, प्राणी पाळा, त्यांना त्यांच्या कळपात राहू द्या. आणि घरच्या मावशींना कणभर द्याच आवर्जून. त्या देखील घरच्या सदस्य आहेतच.

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...


आपल्या सर्वांसाठी, मानवांसाठी अनेक गोष्टींना महत्व आहे, आई वडील, नातेवाईक, मोठ्यांचा आदर, शिक्षण, समाजाचं ऋण, अर्थार्जन, योग्य विनियोग वेळेचा आणि पैश्यांचा सुद्धा ई. यादी फार मोठी आहे. माझ्या दृष्टीने ह्या यादीत सर्वात अग्ग्रगणी येते ते भोजन, अन्न. अन्नाचं महत्व अनन्य साधारण असेच आहे. जीवनाचे सार आहे. आग्रहण म्हणजे एक मोठी साखळी आहे, ज्यात शेतकऱ्याचे प्रचंड कष्ट, निसर्गाची कृपा, शारीरिक मानसिक आरोग्य ते अन्न तय्यार करण्यासाठी, पचवण्यासाठी आणि रिचवण्यासाठी देखील. शेतकरी ते स्वयंपाक घर ह्यात अनेक अजून व्यवसाय / व्यावसायिक येतातच. हे सगळे साखळीतले माणिकमोती सातत्याने राबत असतात तेव्हा चार घास लाभतात आणि सुख देऊन जातात. ह्याच साठी अगदी न कळत्या वयापासून, शाळेतच अन्नाचं महत्व समजावून सांगितले जाते, विविध प्रकारे. श्लोक पाठ आणि पठण करून घेतले जातात नियमित पणे, मग तो विद्यार्थी कुठल्याही माध्यमात, जगातल्या शाळेत जावो. मराठीत, इंग्लिश, आणि बाकी स्थानिक भाषेत तोच मतितार्थ असलेले शब्द / रचना असतात. मुलं अगदी तन्मयतेने ते म्हणतात देखील. 


शाळेत शिकवलेले, किंवा त्या कोवळ्या वयात शिकवलेले बाकीचे विषय म्हणे जन्मभर न चुकता लक्षात ठेवायचे कारण ते जगायला आवश्यक आहेत. जसे कि गणित, भूमिती, भूगोल, इतिहास, विज्ञान आणि इतर. 


माझ्या अनेक प्रसंगी मिळालेल्या / चाखलेल्या अनुभवातून एक समजलं आहे कि माणूस फार उच्च कोटींचा हुशार आहे. तो हवं ते हवं तेव्हा लक्षात ठेवतो किंवा विसरतो, किंवा तसे उपदेश करतो. विषय, त्यातली समीकरणे ई. लक्षात ठेवून वापरायची, मग अन्नाचे महत्व सांगणारा श्लोक किंवा त्यातला मतितार्थ का नाही? त्या अन्न पुरवठा साखळीतले कित्येक जणांचे अपार कष्ट कसे काय बाजूला सुरू शकता, विसरू शकता, अन्नाला उठता बसता, समोर आले कि सातत्याने नाव ठेवता आणि का? काय मिळतं असं करून? पैसे फेकलं कि सगळं मिळालं का? तर नाही.  हि उच्च कोटीच्या शाळेत गेलेल्यांची गत.


माझ्या मैत्रिणीचा नवरा म्हणायचा, जेव्हा ती त्याला विचारायची कि स्वयंपाक कसा झालाय ते, पानात मीठ, लोणचं, लिंबू का वाढतात? तर प्रत्येकाची चव, पातळी वेगळी असते. ज्याला जे हवं ते लावून घ्यावे. इतकं सोप्पं आहे ते. अन्नाविषयी नको ती चर्चा नको. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणं नोहे जाणिजे यद्न कर्म.  जे पेराल तेच उगवतं, ज्वारी पेरली तर ज्वारीचं मिळणार ना. अगदी तस्सेच, सातत्याने अन्नाविषयी कुरकुर केली कर ते तस्सेच लागणार चवीला. एकदा आणि नेहेमीच नतमस्तक व्हा आणि सेवन करा. त्या प्रत्येक घटकाला धन्यवाद द्या ज्यांच्या परम कष्टामुळे पुढ्यात आयतं सुग्रास मांडलंय, चारीठाव. कित्येक जण आहेत ज्यांना दिवसाला फक्त एक भोजन लाभतं. 

कलियुगात मुंग्या येतच नाहीत का?


माझ्या लहानपणी प्रचंड कडक शिस्त होती, प्रत्येक गोष्टीच ठिकाण ठरलेलं असायचं, आणि हो वेळ सुद्धा. कधीही काहीही चालायचं नाहीच. स्वयंपाक घरातच किंवा डायनिंग टेबल वर बसूनच जेवायचं, ई. "झोपायच्या ठिकाणी खायचं नाही, मुंग्या येतील"  इति आई. तेव्हा अजून एक महत्वाचा दुवा होता तो म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट्स असे बाहेर हादडायचे पर्याय सर्रास उपलब्ध नव्हते. अगदीच बाहेर गावी ते देखील गाडीने / बसने प्रवासाला गेलो तर धाबे दिसायचे रस्त्याच्या काठी, किंवा चहाच्या टपऱ्या असायच्या, बास. उठ सुठ बाहेर खाणे खिजगणतीत नव्हतेच. त्यामुळे पण असेल कदाचित मुन्यांना घरीच खाद्य मिळत असावं. त्या वेळी साखर गोड होतीच आणि माणसांमधला गोडवा पण टिकून होता. कुणालाही साखरेचा बाऊ नव्हता. शारीरिक कामे, चालणे, घरकाम, अंगमेहेनत, बघीच्यातले काम, शेतीची कामे ई. मुळे असणार नक्कीच. आताशा मी स्वतः आई असून हे वाक्य वापरायची पुरती विसरूनच गेले. हा झाला एक भाग, का साखरेतला गोडवा कमी झालाय? ह्या कलियुगातील साखरेतला हो मंडळी. माझ्या मते कलियुगातील मुंग्यांना एकतर गगनचुंबी इमारतीमध्ये चढायला नकोसं होतं असेल. किंवा त्यांना देखील आता इतके पर्याय उपलब्ध आहेत अगदी देश विदेशातील मग तुमच्या कडचं मिळमिळीत घराचं, तेच ते सारखं कोण चाखणार हो? छे छे. सगळेच बदललेत, अत्याधुनिक झालेत, मग मुंग्यांनी तरी का मागे राहावं? मानव जर सर्रास स्मार्ट फोन वापरात आहेत तर ह्या मुंग्या पण स्मार्ट झाल्या असतील. आताशा त्या AI च्या मदतीने आधीच विचारपूस करून, पोटभर खाऊन लुप्त होतं असतील, सोशल मीडिया संलग्न काही वर वेळ व्यतीत करत असतील, आभासी जगाचा आनंद लुटत असतील. त्यामुळे मुंग्या लागल्या, साखर किंवा गोड पदार्थ उन्हात ठेवा असे काहीच कुठेच कानावर येत नाहीच माझ्या. मी तरी काही एअर पॉड, इअर प्लग्स, इअर फोन ई. पैकी काहीच वापरात नाही, कधीच. आणि हो स्क्रीन वर सुद्धा मोजक्या वेळी असते मी.  जे अश्या यंत्रणा वापरतात सातत्याने, त्यांना ना दिसणार ना ऐकू येणार. काही तरी गोम आहे हे निश्चित. मुंग्यांसाठी पण "चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट".  

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

आभासी भेट


एक दिवशी गाडी चालवतांना अचानक एका वाहिनीवर खूप सुंदर रचना ऐकायला मिळाली. त्यात असं म्हटलं होतं कि "मीरे सारखी साद घातली तर श्री कृष्ण पण भेटीस येतो". इतकी आर्तता हवी, आपण वर वर आठवण करतो मग ती पोचणार कशी कोणापर्यंत?


माझ्या दृष्टीने दोन पद्धतींच्या आभासी भेटी असतात. एक म्हणजे मनःपूर्वक स्मरण ज्यात भावना, कंपन / व्हायब्रेशन्स अगदी नक्की पोचतात अगदी नैसर्गिक रित्या, प्रगतशील आर्टिफिशियल तंत्रज्ञान न वापरता आणि दुसरे म्हणजे विडिओ कॉल, किंवा सोशल मीडिया वापरून पाठवलेले निरोप. एखाद्या व्यक्तीची आठवण करून त्याची भेट सिम्यूलेट करणं, सदृशीकरण करणं म्हणजे एक आत्मिक भेट होय. तंत्रज्ञान विकसित होण्याआधी आणि आता देखील अशी भेट घडतेच. स्वानुभव घ्या नक्की. 


एकदा एक अनुभवामृत कानावर पडले सहज, ते येथे मांडते आहे. एक प्रयोगातून विज्ञान अशा पद्धतीने काही अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांना सदृशीकरण करायला सांगितले सूर्यनमस्काराचे. जे शारीरिक पद्धतीने सूर्यनमस्कार घालून फळ मिळवतात त्यांच्या मानाने आभासी पद्धतीने केल्यामुळे, असे त्यांनी पडल्या पडल्या डोळ्यासमोर मांडले, किंवा स्वतःला भासवले कि ते प्रत्यक्ष १२ आसने करत आहेत. थोडा जास्त अवधी लागला पण बहुतांशी सगळ्यांनाच फायदा झाला. प्रत्येक वेळी, प्रत्येक जणांना हे फायदेशीर ठरेलच असे नाही पण हा एक तरणोपाय आहेच. सरते शेवटी दुधाची तहान ताकावर, नाही का?

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...