सोमवार, ६ मे, २०२४

कृतज्ञता


आदरणीय आणि सर्वश्रेष्ठ श्री रामाचे मंदिर स्थापनेच्या वेळी "नादातूनी ह्या नाद निर्मीतो..." हि आरती सर्वश्रुत झाली. अजून देखील अगदी नित्य नेमाने हि आरती ऐकणारे खूप जण आहेत, त्यातली मी एक. त्या वर माझ्या हातून काही ओली लिहिल्या गेल्या होत्या आणि मला एक जप माळ पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले ती आरती / भजन ऐकून. त्याच कारण म्हणजे फक्त किती वेळा राम नाम माणसाने / गायकांनी उच्चारले आहे हे नाही तर जितकी वाद्य वाजली ह्या संपूर्ण आरतीत, जितक्या ताल आणि सूर वाद्यांनी, समूह गायकांनी साथ दिली ह्या सगळ्यांची बेरीज १०८ होते असा माझा अंदाज आहे, किंबहुना खात्रीच. 


प्रत्येक व्यक्तीला त्याचे कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते ती सूर्य बाप्पाकडूनच. प्रत्येक व्यक्तीलाच कशाला? अगदी संपूर्ण सजीव समूहाला तोच तर ऊर्जा पुरवतो, किंवा तोच ऊर्जेचे स्तोत आहे. ह्या उपर मी तर म्हणेन कि प्रत्येक निर्जीवातल्या सजीवाला देखील तोच कार्य करण्यास मोलाची मदत करतो. आता ह्या श्री रामाच्या आरती विषयीच बघा ना, काही दिवस जर तबला तस्साच पडून राहिला तर तो हवा तास वाजत नाही, किंवा तसे गोड बोल कानी पडत नाही. त्याला देखील हवा लागली पाहिजे, ऊन / ऊर्जा हवीच, वादका सोबत. सूर्य बाप्पा जरा विश्रांती घ्यायला ढगा आड लपला कि म्हणे तबला सर्रदतो, मग खूप वेळ घेऊन लावावा लागतो. 


तबलाच कशाला ढग आले कि सर्वांनाच थोडसं निरुत्साही वाटतंच. पाऊस पडतो तेव्हा, त्या मोसमात बरीचशी लाकडी दारे सुद्धा फुगून बसतात, कपड्यांना वास येतो. 


अगदी समुद्र, नद्या, फुलं, पानं, पक्षी, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचाच उत्साह टिकवून ठेवणारा आपला सूर्य बाप्पा. 


मला हे सुचवायचं आहे कि फक्त भजन ऐकून, कानावर पडून, किंवा शब्दांमुळे, गायकाच्या शैली मुळेच प्रसन्न आणि अध्यात्मिक बाहेर येत नाही तर वातावरण निर्मिती व्हायला आणि टिकायला सगळेच कारणीभूत ठरतात, सूर्य ऊर्जेने युक्त वाद्य, वाद्यवृंद, कोरस गाणारे, दाद देणारे श्रोते, आणि इतर अनेक घटक.    


अश्या ह्या सूर्य बाप्पाला नमन, दंडवत, जो प्रत्येकाचा सखा आहे, सोबती आहे आणि पिढ्यानपिढ्या, अनेक वर्ष पासून अथक, निरपेक्ष कार्य करतोय दिवस रात्र संपूर्ण जगभर. हि जरी सुष्टीची किमया असली तरी ती कमाल आहे. 

शनिवार, ४ मे, २०२४

निमंत्रण

 काही दिवसांपूर्वी मला माझ्या एक खास मैत्रिणीचा फोन आला. तिचा आवाज ऐकून इतकं अफाट वाटलं म्हणून सांगते कि ज्याचं नाव ते. तश्या आम्ही आपआपल्या विश्वात, रोजनिशी सांभाळता सांभाळता हवं तेव्हा भेट होतं नाही पण हो, वर्षातून एकदा भेण्याची धडपड करतोच आणि होतेच भेट. पण ती सर्व संशोधक आणि शिक्षक कुटुंबासमवेत आणि थोडक्यात. त्या नंतर कधीतरी नमस्कार चमत्कार चे मेसेज काय ते. त्यामुळे तिचा आपणहून आलेला फोन म्हणजे पर्वणीच होती. दुधात साखर किंवा चेरी ऑन केक असं झालं जेव्हा आम्ही दोघी काही वेळा का होईना एक मेकींसमोर आलो, बोललो, गप्पा झाल्या, सेल्फी ने मस्त आठवण जपली आणि मज्जा आली. "थोडक्यात गोडी" म्हणतात ना अगदी तस्से. निमित्य होते तिने मला आमंत्रण द्यायचे ते एका परीक्षेचे. मी काय एका पायावर तय्यार. गेले कि लागलीच. काय काय गम्मत केली म्हणून सांगते. एक तर मी "गाडीतून-चक्कर" वेडी मुलगी, अगदी म्हणजे अगदी कळायला लागल्या पासूनच. त्यामुळे तिच्या महाविद्यालयांत जायचे म्हणजे फारच मोठी चक्कर मला, ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. त्यात गाडीवान सोबत, मग काय विचारात. इकडे बघू का तिकडे, ह्या पाट्या वाचू का त्या, भिंतीवर रेघाटलेली चित्रे टिपू का नवीन झालेल्या / सजलेल्या इमारती बघू असं झालं माझं, आणि हे सलग दोन दिवस. माझ्या सारखी भाग्यवान मीच. अजून काय हवंय? त्यात वेळेच्या आधी निघायची अनेक वर्षाची सवय, सध्याचे रिकामपण त्यामुळे कुठलीही घाई नाहीच, यथेच्छ अनुभवाला मी तो प्रवास. हे काय कमी होते, म्हणून एकत्र घरचे डब्बे खाल्ले, विद्यार्थिनींना परीक्षक म्हणून वैविध्य प्रश्न विचारणे किंवा उत्तरे काढून घेणे हे तर इतके म्हणजे इतके एन्जॉय केले कि विचारूच नका. धमाल आली.  मग भेट झाली ती त्या संस्थेच्या संशोधनाच्या उच्च पदाधिकारी, अधिष्ठाता ह्यांच्याशी. विद्यार्थिनी फारच हुशार आणि अप्रतिम रित्या घडलेल्या अश्या दृष्टीस पडल्या. अशी संधी मिळाली होती ना कि जी प्लॅटिनम च्या पल्याड होती. तिचा मस्त उपभोग घेतला मी. फार म्हणजे फारच भन्नाट अनुभव होता तो, आणि अगदी बहरलेले असे गेले ते दिवस.  "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". 

आदरणीय महर्षी कर्वे, त्यांच्या सहचारिणीला आणि वास्तू देवतेला नतमस्तक होऊन माझे दोन्ही दिवस सुरु झाले. कारण ते नसते तर हि संस्था उदयास आली नसती आणि मला तेथे यायची संधी मिळालीच नसती. त्यांच्या अफाट आणि अगाध कार्याला नमन अगदी मनःपूर्वक. 

शतशः धन्यवाद ह्या निमंत्रणाबद्दल सुनीता. 

और

 औरत ह्या शब्दातच और आहे. अजून काय हवंय? ज्यांनी कोणी हि हिंदी भाषा तय्यार केली, किंवा शब्द घडवले त्याला सलाम. मिशन मंगल नावाच्या चित्रपट देखील एक वाक्य आहे, कि बरं झालं ह्या मिशन चे नाव मम्मी होतं नाहीतर .... पुढे बोलण्यात अर्थच नाही. सर्व जणी त्यांच्या ऑरा मुळे (औरत्वामुळे) सगळं यथोचित सांभाळतात, ह्या साठी प्रत्येकीच्या पाठीवर थाप. 

शुक्रवार, ३ मे, २०२४

उरलेले चिवडे


विकत आणलेल्या वैविध्य प्रकारच्या चिवड्याची म्हणे एक निश्चित तारीख असते खाण्याची. त्या नंतर ते चविष्ट लागत नाहीत किंवा खाऊ नयेत. आणि काय होतं कि उपवासाचा साधा, उपवासाचाच पण तिखट, ह्या आणि त्या कंपनीचा, मक्याचा, फरसाण एक दोन प्रकारचे असे अनेक प्रकार घर म्हटले, शाळा कॉलेज ला जाणारी चार मंडळी घरी असली कि असतातच, ठेवले जातात. कारण प्रत्येकाला आता बदल हवा असतो, एकाच एक घरी केलेला चिवडा खायला आवडत नाही. त्यामुळे काय होतं कि डब्ब्यात बरेच पुढे आढळतात. नवीन आणला चिवडा कि मजेत आणि आवडीने फस्त करायला सुरवात होते. पण जसे दिवस सरतात तसे नवीन पुढे उघडले जातात आणि जुने तसेच पडीक राहतात डब्यात किंवा त्याला डब्याचे धन म्हटले तरी हरकत नाही. त्या सगळ्या पुड्यांची वेळ संपली कि मग फेकून देणे हा एकच पर्याय उरतो. पण माझ्या सारखी डोकं चालवणारी मुलगी तसं होऊ देत नाहीच. भेळ कर, तर कधी ह्यात घाल तर त्यात घाल असं करून संपवतेच, नाहीतर वेळ व्हायच्या अशीच घरी काम करणाऱ्या मुलीच्या घरी रवाना करते. 


आज काय मज्जा आली म्हणून सांगते. एक अनोखा उपयोग नजरेस पडला मला आज त्या उरलेल्या चिवड्यांचा. तर त्याचं काय झालं कि मी पोहे करायला घेतले नाश्त्यासाठी म्हणून, साग्रसंगीत. आमच्या कडे शेंगदाणे हा प्रकार घातलेला आवडतो पोह्यात. मग ते कांदे पोहे असोत, नाही तर बटाटा किंवा गाजर वगैरे घालून केलेले. आणि माझ्या कडे मला मदत करणाऱ्या ताईने काल उत्साहात सगळ्याच भाजलेल्या दाण्यांचे कूट करून टाकले. आता आली का पंचाईत? सकाळी काय करावे, फोडणी झालेली. अश्या वेळी पट्टाकिनी सोसायटीतल्या दुकानात जायचे पट्टाकिनी हा पर्याय होता, मसाला शेंगदाणे होते ते सोलून घालायचे हे जवळपास निश्चित केले, आणि मग ट्युब लाईट पेटली कि माझी. बास मग काय, मज्जा आली, असे पोहे मी आयुष्यात पहिल्यांदा करत होते हो. दोन चिवड्यांची पाकिटे होती हे आठवले. त्यांच्या तारखा चार डोळ्यांनी बघितल्या. तारीख आहे म्हटल्यावर मग त्यातले शेंगदाणे निवडून घेऊन वेळ साजरी केली. दडपण आले होतेच मला पण निभावले थोडक्यात. सरते शेवटी मस्त काजूमय पोहे डिश मध्ये सजले असते अगदीच जय काही तरणोपाय सुचला नसता तर. पण जमलं बावा सगळं. अश्या प्रकारे तीन मधला हा एक नाश्त्याचा प्रकार व्यवस्थित पोटात स्थानापन्न झाला. आज शनिवार, जरा शांतता त्यामुळे मग एक का न्याहारी करायची हा माझा मला विचारलेला मीच प्रश्न हो.  

गुरुवार, २ मे, २०२४

कढी पिठलं


हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. दोन्ही वैविध्य पद्धतीने तय्यार केले जातात, किंवा चाखले जातात. जसे कि पातळ पिठले (वरून पीठ लावून केलेले किंवा कालवून), घट्ट पिठले, पातीचे पिठले, आणि बरेच असे. गोड कढी, पांढरी कढी, भाज्या घालून केलेली कढी, किंवा कढी गोळे, ह्या काही कढी करण्याच्या पद्धती किंवा रचना. "नागपूर तेथे सगळंच भरपूर" ह्या पद्धतीने तिथला एक खास पदार्थ आहे तो म्हणजे "भातावरचं पिठलं". जसा गोळा भात करते वेळी भात शिजत आला कि गोळे पेरतात आणि वाफवतात, अगदी तसेच, भात शिजत आला कि पिठल्याचं कालवलेलं पीठ वर पेरायचा आणि झाकून ठेवायचं, वरून फोडणी देऊन यथेच्छ ताव मारायचा. 


ताकातलं पिठलं हा पण एक फार आवडीचा पदार्थ आहे. अगदी म्हणजे अगदी झट कि पट होणारा.  ते पिठलं पण घट्ट / पातळ ह्या दोन्ही प्रकारे करता येतं. पातळ ताकातलं पिठलं हे बऱ्याच अंशी कढी तत्समच लागतं मला. खूप अंतर वाटत नाही. कारण ताकातलं पिठलं हे अगदी साध्या पद्धतीने केलं असतं, फक्त फोडणी देऊन, बाकी कांदा, लसूण, टोमॅटो ई. घटक न घालता केलेलं. "ते" पिठलं आणि "ती" कढी हा फरक आहेच जो मान्य करावा लागेलच. आणि त्यामुळे "त्याला" जरा जास्त पीठ लागतं घट्टपणा यायला आणि "हि" थोडक्यात खुश असते नेहेमीप्रमाणे. 


बुधवार, १ मे, २०२४

तो अप्रतिम नजराणा


आपल्या हिंदू संस्कृतीनुसार पूजेच्या किंवा धार्मिक कार्याच्या वेळी कलश पूजन केले जाते. म्हणजे नारळ आणि तांब्याचा तांब्या ह्या दोघांना हळद कुंकवाची बोटे काढली / उमटवली जातात, कुंकवाचे स्वस्तिक पण ह्यावर विराजमान होते आणि मगच पूजेला खरी सुरवात होते. हि खूप वर्ष चालत आलेली प्रथा आहे आणि अजून देखील ती पाळली जातेच. त्या नारळाला श्रीफळाचे महत्व दिले जाते अश्या प्रकारे पूजा सुरवात केल्यावर. शुभ मानले जाते, सुवासिनी साठी जे महत्व आहे हळदी-कुंकवाचे, देवांना पूजेला आग्रहाने विनंती करून स्थानापन्न होण्यास आळवणी केली जाते ह्या अश्या पूजेच्या तय्यारीने. 


तर परवाची गोष्ट. मी आदल्या दिवशी इडली चे पीठ भिजवले कारण दुसऱ्या दिवशी साग्रसंगीत तो बेत होता म्हणून. सध्या खूप ऊन वाढलंय त्यामुळे पट्टाकिनी पीठ फुलते आणि इडल्या खूप मऊसूत होतात. अगदी तसे सगळे विचारपूर्वक भिजवले, वाटले आणि झाकून ठेवले. सकाळी उठून दर्शन घेतले तर काय अहो आश्चर्यम, पीठ मस्त फुलले होतेच  पण अगदी किंचित बाहेर पडले होते. ते ज्या भांड्यात भिजवले होते त्या भांड्याच्या काठाला एक पिठाची किनार तय्यार झाली होती आणि शिवाय अगदी जशी हळदी-कुंकवाची बोटे उमटावी जणू तशी ती फुललेल्या पिठाची रांगोळी तय्यार झाली होती. काय दृश्य होते ते? ते बघण्यातच आणि अत्यानंद मानण्यातच मी इतकी गुंग झाले कि फोटो वगैरे काढणे त्या वेळी सुचले नाहीच. इतकी सुबक सुंदर कलात्मक ती कृती घडली होती आपोआप कि ज्याचं नाव ते. मस्त. काय कमाल आहे निसर्गाची आणि विज्ञानाची? अगदी शब्दांच्या पल्याडचं.  ते कसं घडलं हे मला ठाऊक नाही, जाणून घायची इच्छा नाहीच पण जे होतं ते अप्रतिमच्या पलीकडले होते. असे दृश्य जर नेहेमी निर्माण झाले तर पहिल्या वाफेच्या गरमागरम घरच्या इडल्या  अधिक सांबार, चटण्या ई. सोबत जास्त फस्त होतील ह्याची खात्री आहे. मला अजून एक खात्री आहे कि त्या पीठाला पण खूप म्हणजे खूप मज्जा आली त्या भांड्या बाहेर इतक्या सुंदर रीतीने पडायला. ते ठळक दिसत होतं त्या कृतीतून. फुलून बाहेर पडावं तर असं, दिमाखात, स्वतः एन्जॉय करत आणि दुसऱ्याला आनंद देत. कित्ती शिकण्यासारखं आहे ह्यातून.   

गोंधळलेले व्यक्तिमत्व


एक फारच भन्नाट हिंदी चित्रपट तय्यार केला आहे आणि तो मस्त चालला, त्याच शीर्षक आहे "अतिथी तुम कब जाओगे". मस्त हलकाफुलका मजेदार चित्रपट आहे तो. "असे पाहुणे येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". हि एक फारच प्रसिद्ध म्हण आहे. प्रसिद्ध ह्या करता कि ह्या शब्दातून खूप काही शिकण्यासारखे आहे. पाहुणा कसा हवा हे चपराक पद्धतीने मांडलाय येथे. ज्याने कोणी हि म्हण लिहिली त्यांना साष्टांग नमन. आपल्या घरी पाहुणे आले तर, किंवा आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो तर कसे वागावे हे नमूद केले आहे. कोणच्या घरीच कशाला घरी, दारी कुठेही गेलात तरी आदर्श वागच. त्या व्यक्तीने पुन्हा पुन्हा यावे असे वाटले पाहिजे, सर्व कृती अश्या च असायला हव्यात. सामाजिक, आर्थिक, पारमार्थिक, वैयक्तिक भान ठेवायलाच पाहिजे. हाः, जर एखादा केमिकल लोचा झाला आहे, विस्मृतीच्या त्रास आहे, रुग्ण आहे तर वेगळी गोष्ट. पण जर सगळे आलबेल आहे तर मात्र माणसाने माणसाशी माणसा सारखे वागणे अत्यावश्यकच. आदर कमवावा लागतो, आणि तो टिकवण्यासाठी पण अथक मेहेनत आणि प्रयन्त करावेच लागतात. फक्त वय वाढलं म्हणजे सगळ्यांनी जबरदस्ती आदर द्यायचाच हे कुठे लिहिले आहे?


"अतिथी देवो भव" अगदी देवासारखे वागणे अपेक्षित आहे. अतिथीच्या वागण्यातून बोध घेता आला पाहिजे सर्वांनाच. एक उदाहरण म्हणून राहिले पाहिजे आणि ते देखील अगदी थोडे दिवस. कंटाळा येईल इतके दिवस किंवा महिनोन महिने नाहीच. 


प्रत्येक अतिथी देव असतो का? तर मुळीच नाही. एखादा लाखातून देवासारखा असतो. इंजिनीरिंग भाषेत एक बेल कर्व असतो. घंटेच्या आकाराचा ग्राफ, त्यात दोन टोक असतात, त्यात अत्यंत कमी जनता असते. इथे पण अगदी तसेच आहे. देवत्व येण्याकरता तपश्चर्या लागते हो, आणि ती अत्याधुनिक, अध्यात्मिक आणि धार्मिक पद्धतीची हवी. नाते संबंध टिकवावे लागतात देवाला सुद्धा. त्यामुळे माणसात राहून देवत्व हे फार दुर्गम आहे. आणि येणाऱ्याने एक काही तरी निश्चित करावे, ते पाहुणे म्हणून आलेत का घरचे म्हणून? आणि तसे वागणे, बोलणे, चालणे ठेवावे. 


दांभिक मुलाम्याचें सोनें । त्याला सांगा काय घेणें ।

गृहिणी म्हणून ठेवणें । काय कसबीण सदनांत ? ॥८५॥

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...