रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

२०६३: अलभ्य लाभ


आज संकष्टी चतुर्थी पण आहे आणि "करवा चौथ" हा सण पण. आमची सोसायटी म्हणजे विविधतेत एकता, इथे अनेक मराठी अमराठींसोबत अगदी गुण्या गोविंदाने नांदतात. त्यामुळे ह्या सणाची बातमी, जय्यत तय्यारी खूप दिवसांपासून दिसते आहे आणि जाणवते सुद्धा. हा सण सगळ्याजणी एकत्र येऊन साजऱ्या करतात त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतंच आणि अर्थात ते कानावर पडलं देखील, मज्जा वाटली दरवर्षीप्रमाणे कारण खूप मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा होतो हे फक्त एक कारण नाही तर दिवसभर निर्जळी उपवास म्हणजे त्या मुलींसमोर नतमस्तक व्हायला होतं आपोआप. गेले कित्येक वर्ष मी / आम्ही हे अनुभवलं आहे काही कुटुंबात कि दोघे एकमेकांसाठी निर्जळी उपवास करतात, एकानेच का करायचे? तिला साथ द्यायला ई. त्या मागच्या भावना, आणि हे सगळं ऑफिस चा कामाचा दिवस असला तरी देखील. खूप गोड वाटतं सगळं बघून. 


आज त्यात एक सुंदर भर पडली. काही पिटुकल्या कामानिमित्य आम्ही तनिष्क नावाच्या सराफाच्या दुकानात गेलो होतो. तेथे प्रचंड गर्दी होती. मराठी प्रातांत अमराठी लोकांची सणानिमित्त. अत्यंत उत्साहाने "हिरा है सदा के लिये" असं म्हणत खरेदी सुरु होती. कित्येक जण ताटकळत पण बसले होते कारण त्यांना वस्तू, जिन्नस दाखवायला कोणी उपलब्ध नव्हते. खूप मोठे दुकान आहे ते पण इतस्ततः खरेदीदार पसरले होते. प्रत्येक मुलगी, आई, सून, बायको अतिशय सुंदर दिसत होत्या त्या लालचुटुक वेशभूषेत, उत्कृष्ट रंगलेल्या मेहेन्दीत, आणि एका वेगळ्याच रूपात एकंदरीत. सण आहे म्हणून, निर्जळी राहता आलं म्हणून, घराची सकाळची पूजा आणि संध्याकाळच्या पूजेची जय्यत तय्यारी झाली म्हणून आणि एकंदरीत त्या खास हिऱ्याचा साज चढलाच होता, दृश्य दिसत होता तो, जाणवत होता. अर्थात हिरा / हिरे खरेदी म्हणजे भरभराट, आशीर्वाद, गुंतवणूक आणि अत्यानंद. तो एक फक्त दागिना नाही, किंवा एक वस्तू नाही, तर एक संस्कार आहे, उपलब्धी आहे, समग्र, संपूर्ण समाधान आहे. शब्दात न पेरता येण्यासारखं असं काही आहे. खूप कौतुक वाटलं बघून कारण मी हे पहिल्यांदाच अनुभवत होते, ह्याची देही ह्याची डोळा असे. 


वटसावित्री हि पूजा माझ्यामते "करवा चौथ" च्या बरोबरीचीच आहे. आणि बहुतांशी आपले सण भारतभर सारखेच असतात फक्त नावं आणि साजरा करण्याची पद्धत वेगळी असते.  माझ्या मते वटसावित्रीच्या दिवशी इतका भाव दिला नाही जाणार त्याच हिऱ्याला जो आज मिळत होता. हा फरक प्रकर्षाने लक्षात आला मात्र.  कदाचित प्रत्येकाकडे विविध वेळेला खरेदी होत असावी. 


प्रत्येक घर धनधान्य, पशुपक्षी, दागदागिने, प्रकृती स्वस्थाने उत्कृष्ट अश्या स्थितीत सदोदित भरलेले राहो, हि मनःपूर्वक प्रार्थना. "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे". 

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

२०६२: पानकळी


माझ्या अगदी न कळत्या वयापासूनच मला वैविध्य झाडांनी वेढले आहे. मी काही वर्षांची होते तेव्हा आमच्या घराच्या चारही बाजूंनी फारच मोठी बाग होती, किलोने वैविध्य फुलं, फळं, भाज्या उगवत होत्या, सातत्याने. एक तर जमीन फारच सुपीक होती, शेतीची होती आणि ती बाग सांभाळणारे अतिशय उत्कृष्ट लोक होते. शिवाय त्या काळी हवा, पाऊस, पाणी, जमीन, वातावरण, प्रदूषण ई. सगळेच प्रचंड साथ द्यायचे त्यामुळे पण उत्स्फूर्त बहर यायचा सतत. 


त्या नंतर माझ्या शाळेच्या दिवसात खूप प्रकारचे गुलाब आणि पत्रावळीच्या आकाराचे मनी प्लॅन्ट सर्वत्र होते. मग चाफा, लाल पेरू, कलिंगड, पोपटाच्या शेंगा, आणि बरीच शोभेची झाडं अंगणाची शोभा वाढवत होते. शोभेच्या झाडांचे वैशिष्ट्य म्हणजे रंगबिरंगी पाने, किंवा नुसतीच पाने, कधीतरी वेगळ्या पद्धतीची फुले पण ती देवाला वाहता यायची नाहीत, का? ते माहित नाही. पण असे काहीसे मी बघत होते आणि त्यांची नियमित काळजी पण घेत होते. 


इतक्या प्रकारची झाडे बघितली, पण परवाच दोन वेगळ्या धाटणीतली झाडे माझ्या संपर्कात आली. अर्थात मी काही ठिकाणी गेले होते गेस्ट म्हणून तेथे सत्कार करते वेळी मला ती झाडे कुंडीसहित दिली गेली. प्रेमाने दिलेली भेट म्हटल्यावर मी त्याचे संगोपन करत आहेच, आणि सध्या ती माझ्या घराच्या गच्चीत स्थानापन्न आहेत. माझ्या चार डोळ्यांना एवढ्यात आढळलं कि काही कळ्या आल्या आहेत त्या झाडांना आणि ती उंच पण झाली आहेत, किंबहुना डेरेदार पण. आणि ती दोन्ही झाडे अर्थातच शोभेची आहेत. मला असं दिसलं कि त्यांना कळ्या आल्या आहेत, खूप सुंदर दिसणाऱ्या कळ्या. बरेच दिवस झाले फुलं आली नाहीत म्हणून मला आश्चर्य वाटलं. म्हटलं कळ्या धरल्या पण मग फुलं कुठे गेलीत? तेव्हा उमजलं कि त्या पानकळ्या आहेत. म्हणजे नवीन पानं जेव्हा येतात तेव्हा ती दिसायला अगदी कळ्यांसारखी दिसतात पण ती उगवली कि त्याची नवीन पानं होतात. हे माझ्या साठी संपूर्णपणे नवीन होतं, इतकं नवीन कि ज्याचं नाव ते? कारण आत्तापर्यंत मला हेच ठाऊक होतं कि फांदीला पाने येतात, आणि ते चक्र सतत चालूच राहतं. बुंधा, मग विविध मोठ्या आकाराच्या फांद्या, त्याला फुटलेल्या छोट्या फांद्या आणि मग पाने. इथे तसं काहीच दिसतं नाही आहे. अगदी जसे कि पानांचे झाड. काय गम्मत आहे नाही?, कोणी हे संशोधन केलं कुणास ठाऊक? छोटेखानी गच्चीची अप्रतिम शोभा वाढवण्याचा मस्त उपाय आहे हा. क्या बात है? मज्जा आली ते अनोख्या पद्धतीने बहरलेले झाड बघायला.  किंवा त्याला बहरतांना साक्षी होतांना. बहरण महत्वाचे नाही का? स्मितहास्य फुलले बघितल्यावर कि बास. असेच काहीसे झाले ह्या झाडांसोबत माझे. आणि त्यात प्रेमाने दिलेली भेट आहे, त्यामुळे एक वेगळीच ओढ होती, वाट बघत होते कि ते कसे मोठे होतात ते. सुबक सुंदर कुंडी, त्यात अनोख्या पद्धतीने वाढणारे ते झाड, त्याला, मला आणि माझी गच्ची ज्यांना ज्यांना दर्शनीय आहे त्या सर्वांना नेहेमी मस्त अनुभव देऊन जात आहे, सुंदर अश्या पद्धतीने. वेगळे समीकरण आहे.  सुगंध नाही, फुलं नाहीत, पण वेगळी ठसन नक्की आहे, उठून दिसतं आहे दोघे, अहाहा च. 

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

२०६०: तो चपलेचा जोड


एवढ्यातच मी एका प्राध्यापकाच्या खोलीत गेले, मस्त मोठी केबिन आहे त्यांची. माझ्या चार डोळ्यांनी बरंच काही टिपलं आणि मला माझ्याच आठवणींच्या हिंदोळ्यात झुलता आलं पुन्हा एकदा. 


तर त्याच काय झालं कि मी जेव्हा नोकरी करत होते, तेव्हा मी ऑफिस च्या बसने जाणं - येणं करत होते. माझ्या घरापासून ते बस स्टॉप पर्यंत, आणि कचेरीतल्या बस स्टॉप पासून ते कॉलेज पर्यंत पण अंतर भरपूर होते चालायला. मी  बहुतांशी चपला वापरते आणि आम्ही शहरापासून खूप लांब जात असू त्यामुळे एक काळजी म्हणून किंवा सोय म्हणा मी एक जास्तीची चप्पल ठेवायचे माझ्या केबिन मधे. माझं केबिन झाडू पोछा करणाऱ्या मावशींपासून ते ज्यांना ज्यांना माझी हि सवय ठाऊक होती ते सगळे मला हसायचे. असो. त्यांचं त्यांच्या बरोबर. मी पण मग त्यांना हसण्यात साथ द्यायचे. मज्जा यायची. मग आली एक मोठी संधी आणि भव्य दिव्य असे काम, नॅक व्हिसिट. पहिल्यांदा दिज्जग येणार होते म्हणून जरा आव्हानात्मक वाटलं आम्हाला जरी आमची जय्यत तय्यारी होतीच, सर्वतोपरी तरी. ऑफिस च्या कामांचे वाढीव तास होते, खूप घाई गडबड होती आणि त्यात एका अतंत्य महत्वाच्या PA ची चप्पल तुटली कि, ऐन वेळेवर. मग? ताबडतोब तिचा फोन आला मला, कि तुमच्याकडे म्हणे एक जास्तीची चप्पल ठेवली असते, माझी चप्पल तुटली आहे, मी घालू का? मी अगदी अत्यानंदाने ती तिला देऊन टाकली नेहेमीकरता आणि दुसरी आणून ठेवली. मग मी एका क्षणात सगळीकडे अगदी मशहूर, प्रसिद्ध, फेमस झाले कि. क्या बात है? 


माझी एक मैत्रीण गेले अनेक दशकं स्कॉर्पिओ नावाचा हत्ती चालवते चप्पल न घालता. पण तिच्या त्या गाडीत दोन ते तीन जोड ठेवलेच असतात. 


तसेच अजून एक खूप गुणी आणि तरुण मैत्रीण आहे, तिला गाडी चालवतांना एक ठराविक बूट लागतात, त्यामुळे तिच्या गाडीत पण एक जोड पादत्राणांचा असतोच.  


असे मग अनेक उदाहरणं आठवत गेले. आणि खूप म्हणजे खूपच मज्जा आली कारण त्या सर्व दिवसांची आठवण झाली, ते दिवस / प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर अक्षरशः जसे च्या तसे उभे ठाकले आणि उत्कृष्ट अश्या भूतकाळात रमता आले. आणि हे सगळं घडलं ते त्या प्राध्यापकांच्या केबिन मधे मी एक जास्तीचा चपलेचा जोड बघितला.  उगाच भोसकपणा नकोच म्हणून विचारत बसले नाही, हा जोड कशासाठी?, जास्तीचा आहे का?, नेहेमीच ठेवता का?, मी पण ठेवत होते ई.  पण ह्या चार ओळी लिहून मोकळी झाले. त्या प्राध्यापक एक तर खूप मोठ्या आहेत, मानाने, आदराने, वयाने, अनुभवाने ई. त्यामुळे त्यांना हे प्रश्न विचारणे योग्य नव्हतेच.  पण माझ्यासारखे विचार करणारे कोणी तरी दुसरे आहेत हे बघूनच माझा आनंद गगनात मावेना, त्यामुळे मी फक्त तो जोड बघून खुश झाले आणि हे शब्द उमटले गेले आपोआपच.  "कनेक्टिन्ग डॉट्स" असं म्हणतात ना, तसे तो जोड बघून माझे अनेक डॉट्स जोडले गेले, स्मितहास्य सहज उमटलं आणि अंतर्बाह्य समाधान लाभले, आनंद झाला, घडलेल्या कृती, युक्ती आणि गोष्टीचे कौतुक वाटलेच. म्हणजे बघा ना, हि चप्पल तुटण्याची घटना २०१५ ची आहे हो, तब्बल १० एक वर्षांपूर्वी ची. आणि त्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत किंबहुना त्या छोट्याश्या चपलेच्या जोडला पाहून ताज्या झाल्या हो.  आई शपथ. 

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

२०५९: परिपक्वता / मॅच्युरिटी


शहाणपण हे असं म्हणतात कि वयानुसार नक्की येतं, म्हणजे काय बोलावं, काय बोलू नये, कसं वागावं ई. अर्थात माणूस आहे, चुका होणार, पण सर्वसाधारण पद्धतीने बेसिक, आधारभूत, मूळ, ई. तरी वयानुसार यायला हवे. घरच्यांशी आणि बाहेरच्यांशी सुद्धा कसे वागावे, बोलावे, उठावे, बसावे, ई. सगळेच आले त्यात. आपल्या पेक्षा छोट्या दर्जाच्या माणसांना कशी वागणूक दिली जाते हे खूप महत्वाचे आहे. फक्त वय नाही, किंवा वय वाढल्यावर मॅच्युरिटी आली म्हणजे नक्की काय तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनां वरून घेतलेला बोध, अनुभवातून शिकत जाणे ई. होय. प्रत्येक गोष्ट हि आई-वडिल सांगू शकत नाही, किंवा मुले ऐकत नाहीत मोठे झाले कि, पुस्तकाला आणि शिक्षकांना पण मर्यादा असतात, पण अनुभव / स्वानुभव हा एक महत्वाचा गुरु आहे. ह्या सगळ्यातून जो शिकत गेला, घडत गेला तो खरा शहाणा. असो. 


ज्या घरात मुलं होत नाही, किंवा नको तसे आजार उद्भवतात, मुलं दत्तक घेतली जातात, अश्या एक किंवा अनेक घटना जर, तर आपली लोकं कशी व्यवहार करतात ह्यावरून ते किती मॅच्युअर्ड आहेत हे दिसते ताबडतोब. ज्या घरात असे काहीही नाही, सगळे आलबेल आहे मग तेथे सगळं मस्त असतांना पुढे जाण्यास, समाजासाठी कार्य करण्यास, दररोज चे व्यवहार व्यवस्थित करण्यास केलेल्या कृती खूप काही सांगून जातात. 


अनेक अशी कुटुंब आहेत, माणसे आहेत, कुटुंब प्रमुख आहेत जे सगळं व्यवस्थित सुरु असतांना, हत्तीपायी सगळे धड असतांना सकाळ सुरु झाली कि कुरबुर सुरूच करतांना दिसतात. मग अश्या माणसांच्या संपर्कात बरं आहे कि लुळी पांगळी व्यक्ती नाही, किंवा पुढची पिढी स्वतःची आहे, नाहीतर आत्ताच सर्वांचा जीव नकोसा केलायं नाहीतर कायच केलं असतं? विचार देखील करवत नाही. का अशी लोक जन्माला घालतो "तो"? ह्याचं उत्तर काही मला आज पर्यंत मिळाले नाही.  कोवीड चा काळ पुढे आला, गेला, ह्या शिवाय अनेक चढ उतार बघितले असतील, कशातूनच काहीच बोध न घेता फक्त आकड्यानी मोठे होण्यात काय अर्थ आहे?   जिथे जिथे शांततेने सगळं समजावून घेऊन वागणं आहे, बोलणं आणि चालणं आहे तेथे जास्त अडचणी आहेत, हा एक भाग पण आहेच, न वगळता येणारा. असो. हा कधीही न संपणारा विषय आहे.

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

२०५८: अर्ली टू बेड ...


"लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे.." हि एक प्रसिद्ध म्हण आहे माझ्या माय मराठी मधे आणि अश्या असंख्य म्हणी ऐकत मी मोठी झाले. कित्ती मतितार्थ आहे ह्या एका छोट्या आणि सरळ वाक्यात, काहीच कठीण नाही समजायला आणि पालन करायला. असं नाही कि हि म्हण फक्त मराठी भाषेपुरती मर्यादित आहे. आपल्या इंग्लिश भाषेत सुद्धा तत्सम आणि तितकीच बहुउपयोगी वाक्य आहेच. अनेकविध संशोधकांनी ह्यावर विचार, विनिमय करून हे सिद्ध केले आहे गेली अनेक वर्ष. हे वाक्य फक्त दोन पायांच्या आपल्या मित्रांनाच नाही तर चार पायांच्या, पंख धारण करणाऱ्या सर्वांसाठी आहे आणि त्याचा ते तंतोतंत उपयोग करतात, करतांना दिसतात. "अर्ली बर्ड कॅचेस द वर्म". आपल्या पक्षी मित्रांनी पहाटे उठून मेहेनत केली तर खाद्य सहज साध्य होतं. उशीर झाला कि सगळेच उपाशी, त्यामुळे ते कधीच आळस करत नसावे कारण त्यांना स्विग्गी हे ऑप्शन उपलब्ध नाही मुळी. स्विग्गी हे अँप आपल्याला पण हक्काने प्रत्येक वेळी, खिशा गरम आहे म्हणून उपलब्ध होईलच असे नाही, वीज, कनेक्शन पाहिजे, आणि बरीच कारणे आहेत. "सातच्या आत घरात", "विषाची परीक्षा का घ्यायची", अशा अजून काही म्हणी देखील आहेत. "शहाण्या माणसाने कोर्टाची आणि पोलीस ठाण्याची पायरी चढू नये", ह्या म्हणीला आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने पण वापरू शकतो, "शहाण्या माणसाने रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये". असंख्य कारणे आहेत, मद्यधुंद, बाकी नशेत धुंद, काही ठसन मधे तर बाकी अहंकारात वाहून गेलेले असे निशाचर रस्त्यावर पडीक असतात. आपल्या आदरणीय जुन्या पिढीच्या लोकांनी घालून दिलेले आदर्श चुकीचे मुळीच नाहीत.  रात्रीच्या अंधारात, पाऊस पाण्यात रस्ता नीट नजरेस पडत नाही, खड्डे दृष्टीस पडत नाहीत, भल्या मोठ्या दिव्यांमुळे समोरचं कधी कधी दिसत नाही, आपण एक वेळेस व्यवस्थित गाडी चालवू पण पुढचा कसा चालवेल हे आपल्या सर्वस्वी हातात नाहीच. 


ह्या सर्व पार्शभूमीवरून एक विचारावंस वाटतं कि विविध कार्यक्रम सकाळी / दुपारी का नाही आयोजित करत? उशिरा रात्रीच का? कुठलाही कार्यक्रम म्हटला कि तो खूप दिवस आधी आयोजित केला जातो, कारण खाण्याचे ठिकाण, आमंत्रणं ई. आधीच दिली जातात, सगळ्यांची सोय बघून. मग इतक्या आधी माहित असतांना सकाळी यायला काय हरकत आहे, तसा दिवस आखणे सहज शक्य आहे. त्या दिवशीच्या सकाळी कामे आदल्या संध्याकाळी करून मोकळे व्हा नाहीतर त्या दिवशी संध्याकाळी करा.  पण रात्रीचं बाहेर जाणं टाळा. शिवाय असे म्हटले जाते कि दुपारचे जेवण जरा जास्त जड झाले तर सूर्यास्तापर्यंत ते पचते, सूर्याच्या ऊर्जेमुळे. आणि रात्रीचे जेवण हे अगदीच थोडेसे असावे ई. 


आपल्या भारतीय परंपरेनुसार अनेक धर्मात तर सूर्यास्ता आधीच जेवण केले जाते. बाहेरच्या देशाची गोष्ट निराळी. "जैसा देस वैसा भेस" त्या पद्धतीने वागायला काय हरकत आहे? आयुर्वेद शास्त्रानुसार देखील जेवणांनंतर दीड - दोन तासात झोपलेलं बरं म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ उत्कृष्ट सुरु होते आणि तो दिनक्रम तसाच आठवडाभर टिकून राहतो. 


"व्हेन यू ह्याव इनफ ऑफ स्क्रीन लुक ऍट ग्रीन", "अती तेथे माती". प्रत्येक इंद्रिय तुमच्यासाठी अविरत कार्यरत असते, त्यांना ठराविक वेळेला, ठराविक वेळेसाठी निसर्गनियमांनुसार विश्रांती द्यावी. एखाद दिवशी अपवाद ठीक आहे. एखाद दिवस नेहेमीच यायला नको. मानसिक, शारीरिक स्वास्थ्य जपा, वेळीच, कुठल्याही अवयवांना गृहीत धरू नका. जागे व्हा. पाश्त्यांकडून खूप काही चांगलं शिकण्यासारखं आहे, ते बघा. 


सकाळी उठा, वायुवेगाने कामे आटपा, तसे ठरवून करा, आणि मग दुपारच्या किंवा उशिरा सकाळी कार्यक्रम नियोजन करा, किंवा उपस्थित राहा. घरी जाऊन शांतपणे दुसऱ्या दिवशीची तय्यारी करा, व्यवस्थित वेळेवर जेव्हा, शतपाउली करा आणि वेळेत झोपा. एकत्र भेटून समारंभ साजरे करणे जास्त महत्वाचे, आणि त्याची वेळ जास्त महत्वाची, सर्वार्थाने.    

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

२०५७: विशाल


विद्यावाचस्पती होणं हे दिसतं तेवढं आणि वाटतं तितकं सोप्प नाहीच. संशोधक होण्याच्या मार्गावर अनेक पायऱ्या असतात, ज्यात तुम्ही आधी उत्कृष्ट असे कथाकार व्हावे किंवा असावे लागते. तांत्रिक गोष्टी, नाविन्यपूर्ण पद्धतीने, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या तज्ज्ञांना पटेल अश्या भाषेत म्हणजे भलं मोठं कौशल्याचं आहे. ते शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवले जात नाही तितक्याशा प्रकर्षाने किंवा आपण देखील त्या कडे इतके लक्ष देत नाही. ती पहिली पायरी गाठावी लागते संशोधक व्हायचे म्हणजे. हि पायरी पादाक्रांत करायची म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाचन आले. बाकी मंडळींनी ह्या क्षेत्रात काय काय केले आहे आधीपासून ते तपासायला लागतेच. त्याशिवाय आपण आपली दिशा ठरवू शकत नाही. वाचन, मनन, चिंतन, मग त्यावर काम आणि लेखन हे सगळं साध्य करावं लागतं.  हे जर तुम्ही पूर्णवेळ केलेत तर वेगळी गोष्ट असते, पण पूर्णवेळ नोकरी सांभाळून, घरचे बघून शिवाय ह्या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे कसरतच, नाही का? त्यात माझ्यासारखी गाईड मिळाल्यावर अजून त्यात भर पडते. कारण असं वाटत कि सगळ्यांसोबत, वेळेवर काम झालं पाहिजे. हे सगळं काय कमी आव्हानात्मक होतं, विषय अतिशय अवघड निवडला होता. घरच्या जबाबदाऱ्या, कचेरीतले वेगळे किस्से आणि ह्या सगळ्यांमुळे नाही म्हटलं तरी तब्बेतीवर होणारा परीणाम हे एक पॅकेज असल्यासारखं आहे. घरच्यांची प्रचंड मोठी साथ, समजदार पिल्लू ची मदत, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, उत्कृष्ट सांभाळलेल्या मैत्रिणी, शेजारी, आणि SCRI च्या संपूर्ण चमूची वेळोवेळी मिळालेली मदत ई. सर्वांमुळे अगदी आखून राखून वेळेत सगळं पूर्ण झालं. एवढी मोठी कामगिरी पार पडली.  सगळंच विशालकाय असं मांडलं होतं पुढ्यात पण केवळ ती वैशाली होती म्हणून निभावलं आणि सगळं वेळेत पूर्ण झालं. कुठेही डगमगली नाही वैशाली, अगदी मस्त आणि पाय घट्ट जमिनीवर ठेवून उभी राहिली. माघार घेतली नाहीच, धडपड सुरूच ठेवली आणि यश मिळत गेलं. ते इतकं वेगळ्या पद्धतीचं होतं  (म्हणजे माझ्या दुर्ष्टीने) कि आंतरराष्ट्रीय को-गाईड देखील सहजी मिळाले, त्यांची सगळी प्रक्रिया पट्टाकिनी पूर्ण देखील झाली कागदोपत्री आणि इतक्या मोठ्या पदावर असून देखील त्यांनी कुठलाही अडथळा निर्माण केला नाहीच. प्रत्येक वेळी त्यांची पण साथ मिळत गेली, हे खूप म्हणजे खूप वाखाणण्यासारखं आहे.  शाब्बास वैशाली. खूप शिकण्यासारखं आहे आणि म्हणूनच ह्या पुढे माझी विनंती आहे कि आपण हे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू. सरते शेवटी मी मनःपूर्वक आणि पुन्हा एकदा माफी मागते कि मी जरा जास्त कठोर झाले होते ह्या सगळ्या प्रक्रिये मधे, ते मला कळत होतं पण तरी देखील मी नरमले नाहीच, तशीच कठोर वागत गेले, जास्त वेळ दिला नाही पण खूप मुभा दिली काम करण्याची आणि आज नावामागे डॉक्टर लागलं. अभिनंदन.  मला खात्री आहे कि ह्या पुढील संशोधनाचा प्रवास असाच अविरत सुरु राहील आणि ह्या ज्ञानाचा फायदा अनेक जणांना निश्चित होईल.  

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४

२०५६: लाभलेली शांतता


हि माझ्या एका खास मैत्रिणीची कथा. आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी. तिची रीतसर परवानगी घेऊनच मी हे येथे मांडते आहे, का मांडावस वाटलं हे मला ठाऊक नाही, पण मी लिहिती झाले, आपोआप. 


अगदी लहानपणीपासूनच ह्या माझ्या सखीने जसे कि सगळं तिच्या हातात घेतलं होतं, म्हणजे घराचा कारभार. सणावारी रांगोळी काढण्यापासून ते घरची तिला जमेल तशी साफसफाई, स्वयंपाकात मदत ते सगळं म्हणजे सगळंच. हे करता करता तिने सगळ्याच जबाबदाऱ्या घ्यायला सुरवात केली, जसजशी ती मोठी होत गेली. तिला सगळं करण्यात अत्यानंद मिळत असे कारण तिच्या हातून सगळं खूप सुंदर पद्धतीने, अगदी वाखाणण्याजोगं घडत असे. उत्कृष्ट दारावरची तोरणं, भल्या मोठ्या रांगोळ्या, चविष्ट नैवेद्य, आणि त्या व्यतिरिक्त बाकी खूप काही. जसे कि दसऱ्याला सगळे सोने द्यायला येणार म्हणजे गोड तिखट करणे आलेच, ते देखील ती अगदी शिताफीने करत असे. तिच्या हातात कला होती. त्यामुळे प्रत्येक दसऱ्याला एक नवीन पैंटिंग किंवा भरतकाम करून ती घर सजवत असे. आणि हे सगळं महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतांना आणि त्यानंतर नोकरी करत होती तेव्हा पण नाविन्यपूर्ण रीतीने सुरु होतं. शेजारी पाजारी खूप आश्चर्य करत असतं तिच्या ह्या सगळ्या धडपडीला बघून.  खूपच व्यवस्थित सगळं होत असे आणि प्रत्येक सणाला जे हवे ते सगळे, भरभरून, यथोचित. त्यावेळी हे असे स्मार्ट फोन नव्हते त्यामुळे कुठेच कसलेच प्रूफ नाही आता दाखवता येणार. त्यावेळी ज्यांनी ते अनुभवले, बघितले तेच सांगू शकतील बास. पण तिचा उत्साह वाखाणण्यासारखाच होता. कुठेही कधीही अडले नाहीच, सगळे विकत आणण्यापासून ते करण्यापर्यंत सगळं ती ठरवत असे, त्याला मूर्त रूप देत असे. बैठा बंगला होता तिच्या वडिलांचा त्यावेळी. लोक रस्त्यावर उभे राहून तिच्या कलाकृती बघत असतं. घरी येणारे तर खुश व्हायचेच, पण बाहेरच्यांना पण मज्जा यायची.  


अशी अनेक वर्षे स्वातंत्र्याची आणि उत्साहाने भरभरून गेली, आणि मग दोनाचे चार झाले. ती एकत्र कुटुंबात दिली. तेथे जेव्हा सणवार सुरु झाले तेव्हा हिला प्रचंड आराम मिळाला कारण हिच्या नावे फक्त स्वयंपाक आला. बाकी सगळे घरचे सांभाळून घेत होते. पण हळूहळू हे लक्षात आलं कि सांभाळून घेणं पण जरा वेगळ्या पद्धतीचे होते. खूप चिडचिड करून सगळी कामे केली जात. मग ह्यांची बदली झाली. हि पूर्णवेळ काम करणारी गृहिणी होती. सुट्ट्या मिळत नसायच्या. त्यामुळे फक्त सणादिवशी जर सुट्टी तर त्या दिवशी बायका सुट्टीवर. मग हिची खूप तारांबळ होत असे. मुलं, स्वयंपाक, पूजा आणि बाकी इतर सांभाळण्यात. त्यात तिला जमेल तेवढे जमेल तसे ती करण्याचा अथक प्रयत्न करायची पण प्रत्येक वेळी "पालथ्या घड्यावर पाणीच" फिरायचे. खूप ऐकून घ्यावं लागायचंच, प्रत्येक गोष्ट चुकायचीच.  आजच्याच दिवशीचे उदाहरण घेऊ यात. आज प्रत्येक गाडीला हार घातला जातो. कधी छोटे पडायचे हार तिने आणलेले, तर वेळेवर तोरण होत नसे किंवा छोटेमोठे व्हायचे. तिने नैवेद्य केलेला गोड पदार्थ फारच अगोड लागायचा तर बाकी पदार्थ बेचव. असे तब्बल ३० वर्ष पार पडले. मागल्या वर्षीपासून हिला जरा शांतात अनुभवता आली आहे, मिळाली आहे कारण आता प्रत्येक जण पांगले आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे चुका काढण्यात तरबेज असलेले कुटुंबप्रमुख आहेत सध्या बदलीच्या ठिकाणी, त्यांच्या नोकरीचे ठिकाण / गाव वेगळे आहे सध्या, एक वर्षांपासून. त्यामुळे हिला आता श्वास घेता आला आहे. पुन्हा एकदा हिला जमेल तेवढे, हिला योग्य वाटेल असे, जमेल से करणे सुरु आहे, मनसोक्त असे. आता पंखात बळ नाही उरले, एक सण म्हणून आवश्यक ते नक्की करायचे तेवढेच आता तिने ठरवले आहे. पण बघा ना ३० वर्ष हा कालावधी अश्या नैपुण्य असलेल्या मुलीने कसा काय व्यतीत केला असेल कुणास ठाऊक.  आणि खरंच, ३० वर्ष सलग कोणी कसे सारखे बोलू शकतो आणि ते देखील अश्या धडाडीच्या मुली करता? देवालाच ठाऊक, किंवा तिचे भोग, ते भोगल्याशिवाय संपत नाहीत. आता संपले आहेत हे महत्वाचे. सण इतके सुंदर असू शकतात हे पुन्हा एकदा तिला समजले, नव्याने. अगाध त्याची लिला अजून काय. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...