शनिवार, ९ मार्च, २०२४

ये कहा आ गये हम


श्रावणी सोमवार, महाशिवरात्र ह्या दिवशी हमखास "बेल फुल वाले" अशी आरोळी ठोकत सायकल वर भल्या पहाटे तरुण मुलं येत असतं. त्या वेळी आमच्या नागपुरात आणि गल्लीत फक्त बैठे बंगले होते. फ्लॅट ह्या धारणेची सुरवात झाली नव्हती. त्यामुळे अगदी दारात १०८+ बरीच बेलाची पाने, पांढरी फुले आणि दुर्वा असे सगळे साग्रसंगीत पुड्यात मिळत होते. श्रावणी सोमवारी तर बहुतांशी पाऊस असायचा त्यात हि मुलं भिजत यायची आणि खणखणी आवाजात सर्वांना उठवायची. बहुतांशी माझ्या शिस्तीनुसार आदल्या दिवशीच मी हार वाल्याकडून सगळं आईला आणून दिले असल्याचे पण ह्या मुलांच्या कष्टाला मी मनःपूर्वक अजूनही सलाम करते. स्वच्छ वाळू आणून मी आईला देत असे. त्या वाळूचा महादेव अर्थात पिंड ती करायची आणि भक्ती भावे जप आणि पूजा. त्यात माझा खारीचा वाटा, मीपण तिच्या सॊबत बेल वाहणे, सर्व तिला आवडेल अशी तय्यारी करून ठेवणे, दारात साफ करून रांगोळी काढणे सणाला साजेशी, तोरण आवश्यक असेल तर ई. ती सातत्याने करत असल्यामुळे आणि त्यावेळी सर्वत्र मराठमोळं वातावरण असल्यामुळे हे मला करता आलं. अर्थात सहज ते संस्कार झाले आणि मला आवड निर्माण झाली. शाळा, महाविद्यालय आणि त्या नंतर नोकरी सांभाळून माझ्या हातून हे सगळं घडलं. संपूर्ण वर्षभर भरभरून पूजा, सण, व्रत वैकले असायचीच. त्या शिवाय शेजारच्यांकडे, मैत्रिणींच्याकडे आणि इतर ठिकाणी काही असले तर मी प्रकर्षाने हजार, सर्वात प्रथम आणि शेवट पर्यंत. सर्व कामांना अग्रगणी. कधीच नाही म्हंटले नाही कधीच कमी पडले नाही. सर्व आवडीने करायला जमलं मला. कसे ते ठाऊक नाही. अगदी समजायला लागल्यापासून ते स्नातकोत्तर शिक्षणासाठी जाईस्तोवर सगळं म्हणजे सगळं अथ: पासून इति पर्यंत घडलं. आत्ता समजतंय पंचपक्वान्नांचा नैवेद्यापासून ते मंगळागौरीच्या आवाक करून देणाऱ्या सुशोभी करण्यापर्यंत सगळं हिरीरीने का झालं ते. "त्याला" ठाऊक होतं कि लग्नानंतर फार काही घडणार नाही आहे हिच्या हातून. फ्लॅट संस्कृती येणार, जबाबदाऱ्या वाढणार, संपूर्ण वेळेची नोकरी असणार त्यामुळे त्या उत्कृष्ट पहिल्या फेज / पडावात सगळं झालं. मनःपूर्वक समाधानाने आणि कौतुक करत. त्याच्या प्लांनिंग ला सलाम. त्यामुळे आता जास्त काही घडत नाही ह्याच फार मनाला वाईट वाटत नाही. भरभरून सगळे अनेक वर्ष उपक्रम, कार्यक्रम उपभोगले, आठवणी ताज्या राहतील इतके. त्यावेळी तर क्षणोक्षणी फोटो काढणे नव्हते त्यामुळे सशक्त मेंदूत जसेच्या तस्से ते उभे आहेत आज देखील. अर्थात मी माझ्या आई सारखं सगळं केलं असतं तर माझ्या मुलांना ते आपसूक आलं असतं पण असो. सगळंच साध्य करता येत नाही, मला तर जमले नाही. 


बहुतेक सगळं सोडून दिल्यामुळे, तब्बेतीची कारणे म्हणा किंवा बाकी गोष्टींना जास्त महत्व दिल्या गेल्यामुळे मला "ये कहा आ गये हम..." असं वाटतं बरेचदा. "बदल हाच नेहेमी स्थिर असतो म्हणतात (चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट", असं मी स्वतःला समजावते, दोन हस्तक एक मस्तक वापरून नतमस्तक होते. 

उपवास


उपवास करावा तर माझ्या आईनेच. दोन प्रकार मी तिचे बघितले आहेत. एक म्हणजे त्या वेळी सर्व प्रवास बहुतांशी रेल्वे नी होत असे. तेव्हा ती आदल्या दिवशीपासून काहीही खात पीत नसे. आणि संपूर्ण प्रवासात पण नाहीच. इतके नियंत्रण स्वतःवर म्हणजे मला त्यावेळी खरंच कमाल वाटायची. 


सणवार असले, मोठी एकादशी, महाशिवरात्री, वटसावित्री ई. दिवशी ती सर्वांसाठी उपवासाचे पदार्थ तर करत होतीच, शिवाय जर गरज पडली तर साधा स्वयंपाक पण होत असे. एवढं करून देखील ती अगदी शास्त्र म्हणून फळ, ताक, लिंबू सरबत, भाजलेले रताळे किंवा खजूर-तूप असे काही तरी सेवन करत होती. "एकादशी दुप्पट खाशी" असं तिने कधीच म्हणजे कधीच केले नाहीच. काय करण होते माहित नाही, पण ती उपवासाच्या दिवशी औषध पण घेत नसे. तिची काय श्रद्धा होती, किंवा काय विश्वास होता ते तिचं तिलाच ठाऊक.  


तेव्हा पासून नकळत म्हणायला हरकत नाही पण ती दीक्षित पळत होती, किंवा पाळलं जायचं तिच्या कडून. तिची साग्रसंगीत पूजा झाल्याशिवाय ती काहीही खात नसे दररोज. दोन वेळा चहा, सुकामेवा, फळं आणि दोन वेळा साधं घरचं ठराविक प्रमाणातच, अधाश्यासारखं कधीच नाही. लग्न समारंभात देखील लग्न लागल्यावर दिलेला पेढा. बास. तिचे असे अनेक उपवास प्रकार होते. डायट म्हणून नाहीच पण तिची एक शिस्त होती. तशीच आपण देखील पाळूयात. घरचे ते सेवन करू या, आपल्या शरीराचे ऐकुया आणि स्वस्थ राहू यात. चला तर मग. 

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

उभे राहा


काल मी "कौन बनेगा करोडपती" चा एक भाग बघण्यात मग्न होते, त्याचा पुरेपूर आनंद उपभोगत होते. ती खेळाडू हिमाचल प्रदेशातून आली होती. तिच्या AV मध्ये म्हणते कशी कि पहाड / डोंगर तिच्या हिमाचल प्रदेशातले बर्फ असो नाहीतर भरपूर पाऊस किंवा कुठलेही वातावरण नेहेमीच ताड माड उभे राहतात नेहेमीच, कधीच तक्रार नाहीच. 


इतक्यात आमच्या पुण्यात सगळीकडे रस्त्यांचे सुशोभी करण सुरु आहे. त्यात भर वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला अप्रतिम रंग संगतीचे फुलांची झाडे लावली आहे. आणि ती ज्या दिमाखात बहरलेली आहेत, ज्याचं नाव ते, भन्नाट अशी. इतकी धूळ, प्रचंड ऊन, सततची रहदारी, वाहने, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण पण ते त्यांचा स्थायी भाव काही सोडत नाहीत, खूप म्हणजे खूप फुले फुलवून येणा जाणाऱ्यांना आनंद मुक्तहस्ते वाटतात. अहाहा च. "काय वर्णू तव गूण....". नाहीतर अतिहुशार माणसे, अगदी छोट्या छोट्या कारणाने रुसून फुगून बसतात, उणेदुणे काढतात, तक्रारी तर विचारू नकाच. माणसांनी ह्या डोंगरा एवढं मोठ्ठं व्हावं आणि फुलांसारखे रंग उधळावे, म्हणजे दुसऱ्यांसाठी नेहेमी उदाहरण म्हणून कार्यरत राहिल्यामुळे मग तक्रारींना वाव मिळत नाही, वेळ नसतो काही निरूपयोगी करण्यासाठी. चला तर मग झाडांचे / वृक्षांचे, फळ आणि फुल झाडांचे (रस्त्यावर भरलेले खास करून), डोंगर दर्यांचे आणि इतर सगळ्यांचे काही गूण अंगिकारुयात हळूहळू आणि आपले एक मस्त व्यक्तिमत्व घडवू यात, उभे करू या. म्हणजे मग तुमच्याकडून इतरांना प्रेरणा मिळेल भरभरून अशी.  

गुरुवार, ७ मार्च, २०२४

(ना -> आ) वडती


साडी नेसणे म्हणजे फार प्रताप वाटायचं मला. जरा जास्त होतं असे मला. ड्रेस कसा चढवला कि झालं असं साडीच नाही त्यामुळे असेल कदाचित आणि त्याची उठाठेव फार, हे आणि ते देखील पाहिजेच. पण आता नाही. हा बदल का आणि कधी झाला हे मला माहित नाहीच मुळी. पण अर्थात हलकी फुलकी साडी हवी सहज नेसता येण्यासारखी आणि सांभाळता येणारी. कारण मला ती नेसून शिकवायचं पण असतं. इथून तिथे जायचं असतं, वर्गात फिरायचं असतं आणि बरेच काही. पण आताशा एकदमच भावली मला ती. हे कित्येक वर्षांपासून म्हणत होते कि एक शिक्षिका म्हणजे साडी आलीच. पण तेव्हा ती आणि एकंदरीत सगळी प्रोसेस नावडती होती जी आवडती कधी झाली हे समजलं नाहीच. आता अजून एक प्रयोग करून बघावा म्हणते. जेव्हा जेव्हा क्लास घ्यायचा असेल तेव्हा तेव्हा पहिल्यापासून (अतः पासून इति: पर्यंत) नेसत बसण्यापेक्षा रेडिमेड आणून बघते. आवडेल ती पण कदाचित, अशक्य काहीच नाही. प्रयोग करून बघू तर. 


बाकीच्या देशातल्या मुली सहजी सातत्याने कधीच साडी किंवा सलवार कमीज त्यांच्या देशात घालून फिरतांना किंवा कामाला जातांना कधीच दिसत नाहीत. कधीतरी भारतात आल्या तर कौतुक म्हणून काही मिनिटे परिधान करतात किंवा ध्यान धारणा करण्यासाठी आल्या तर त्या दिवसांपुरत्या दिसतात भारतीय वेशात. मग आपलं सोडून भलत्याच्या पाठी का लागायचं. इतक्या वैविध्यतेने नटलेल्या साड्या आहेत, भारतीय पोशाख आहेत, मग पॅन्ट शर्ट च्या मागे च का धावायचे? मला तरी हे पटत नाही. ज्यांना पटत त्यांनी हवं तसं वागावं पण कदाचित ह्या मुळे पण माझं साड्यांवरच प्रेम जास्त प्रमाणात दृष्टीस पडतंय सध्या. इतक्या ढीगभर साड्या आहेत त्यांचा उपभोग घेते, जितके दिवस हे नवीन प्रेम उफाळून आलेलं सुरु राहतंय तेवढे दिवस राहू दे. कदाचित हेच टिकेल. काही सांगता येत नाही आणि सरते शेवटी त्यातून काही तरी मस्त निष्पन्न व्हायला हवं, आरामशीर, आरामदायक, सुखावह वाटलं कि मग मी काम करायला मोकळी. 


तुम्हाला जर असे काही डोहाळे लागले असतील, बदल नजरेस पडत असतील तर त्यांचं स्वागत करा आणि भन्नाट आनंद उपभोगा.   

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण...


अनेक जाहीरांतींमध्ये एक पेव फुटलेले दिसतंय आज काल. आणि ते म्हणजे "हिरवा चहा प्या आणि तो पोटाचा घेर कमी करा हमखास". कुठल्याही रंगांचे पेय प्या पण घेर कमी होईलच असे नाही. असा चहा प्यायला कि घेर कमी झाला असता तर मग काय हवं होतं. बाकी अजून दिग्गज मंडळी जे व्यायाम, जिम वगैरे करतात ते मग अजून काही सुचवतात. माझ्या मते आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर, व्यायाम, आहार, असले रंगीबेरंगी चहा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चिडचिड ला हद्दपार केले तरच फक्त पोटाचा घेर नाही तर अजून बरेच काही निश्चित सध्या होईल. ज्या आपल्या माणसांबद्दल चिडणे होते, किंवा ज्या वेळी चिडायला होते ते हळूहळू बंद करा. प्रत्येक जण आपले मार्ग वापरू शकतो शांत होण्याचे. एक ठोकताळा इलाज नाही त्यावर. पण ह्याचा परिणाम नक्की, एकदा करून बघायला काय हरकत आहे. कदाचित ह्याच करता आपल्या सर्वांना शाळेत असतांना Active and Passive Voice - कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग शिकवले होते. ते विस्मरणात गेले आहेत ते वापरायला लागा आणि बघा मग कसे भन्नाट बदल अनुभवता येतील ते. कुठलीही सिद्धी प्राप्त होण्यासाठी मन प्रसन्न हवेच. आणि प्रसन्न मन हे शांत डोक्यामुळे सध्या होणार. त्यामुळे आत्तापासूनच स्वतःच्या स्वास्थ्यासाठी (शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, सामाजिक, आणि इतर) राग शब्दकोशातून समूळ नष्ट कराच पट्टाकिनी. स्वतःचे लक्ष इतरत्र वेधून बघा, खूप कामात गुंतवा, काम आनंदाने पार पद, थोडासा उशीर झाला काम संपवायला तरी हरकत नाही, आप्स्वकिय म्हणजे पंचिंग बॅग नाही हे विसरू नका, राग आला तर त्या व्यक्ती ची चांगली बाजू आठवा किंवा अजून काही करा पण बाहेर पद. एकदा सवय कराच, न रागावता पण जगात येत सहज हे लक्षात येईल.

मंगळवार, ५ मार्च, २०२४

'उपसर्ग'


आता हि प्रथा नाही पण आधी होती. कुमार आणि कुमारिका असे मुलांच्या नावाआधी वापरले जायचे. पण कुमारिका हे जास्त प्रकर्षाने उपयोगात येणारे असे होते, मग ते लिहितांना असो किंवा वापरात. किंबहुना मुलींना त्या काळी कु. अमुकतमुक असे लिहावे लागायचे. पण कुमार अमुकतमुक हे मी कधीच पहिले नाही, पाहण्यात आले नाहीच. अनेक वर्ष कुमारिका म्हणून मिरवायचं आणि मग एक दिवशी अचानक हे हक्काचे शीर्षक तिच्या कडून काढून घेतले जेते, तिला काहीही समजायच्या आधीच कारण नवीन वाढलेले त्या पेक्षा अनपेक्षित आणि वेगळ्या स्वरूपाचे असते. ह्या बदलाशी सामावून घेत नाही तर अजून एक आव्हान समोर उभे टाकायचे आणि मग भलं मोठं शीर्षक मिळायचं अगदी मोजक्या दिवसांसाठी "चि. सौ. का.". एक घटिका आणि ह्याचे फक्त "सौ." त रूपांतर व्हायचे. ते शेवटपर्यंत टिकायचे नाही तर मग श्रीमती. बाप रे. काय हे. 


हे तेव्हा काय कमी होतं तर आधी कु. मुलीचे वडिलांचे नाव आणि आडनाव. मग ज्या मुळे संपूर्ण जगाला तुमची ओळख असते तेच समूळ बदलले जायचे, सौ. नवीन नामकरण नवरायचे नाव आणि सासरचे आडनाव. एकदा नव्हे तर दोनदा बारसे होत असे मुलींचे. अगदी समजायला लागल्या पासून तो अभिमान म्हणजे नाव, किंवा ते नाव म्हणजेच मी हे सोडून नवीन नावाशी जुळवून घ्यायचे. संपूर्ण शिक्षण आणि प्रमाणपत्रे मिळवलेली जुन्या नावावर सोडून द्यायची किंवा फक्त स्मुर्तीत जपून ठेवायची. सातत्याने एका प्रश्नाचे उत्तर द्यायचेच "तू आधीची कोण? माहेरचं नाव काय? आई वडिल कुठले? ई." अर्थात घरच्यांनी, दारच्यानी, शेजारच्यांनी, समाजाने ते खूपच सोप्पं आणि सुकर करून टाकलं होतं सातत्य राखून, उठ सुठ तेच ते बिंबवून. आणि अर्थात मुलींची ध्येये पण वेगळ्या स्तरावरची असल्यामुळे हे नगण्य ठरवून त्या देखील सातत्याने "पुढचे पाऊल" टाकत आणि गाठत गेल्या नेहेमीच. माझे शाळेतले शिक्षक आम्हा सर्वांना "अडथळ्याची शर्यत" ह्यात भाग घ्यायला का लावायचे हे समजलं मला आत्ता. हे दृश्य फक्त महाराष्ट्रातलेच आहे बाकी इतर राज्यात कमी अधिक प्रमाणात हेच असणार पण मला ठाऊक नाही. शारीरिक,मानसिक, सामाजिक, नैतिक, वैचारिक आणि नैमिक पातळीवर भरपूर, अविरत, अथक आणि निरपेक्ष काम करावे लागत होते. आता सगळेच बदलते आहे, त्या करता सर्व स्तरावर मुलींनी विडा उचलला आहे. 

कित्ती आणि काय काय समजावत पुढे जायचं ना त्या मनाला. पण माझ्या आणि त्या आधीच्या पिढीतल्या मुलींना जमलं ते. हे सगळं करता करता बरेच काही केले त्यांनी, अगदी डोंगर एवढे, नोकरी च्या ठिकाणी, समाजासाठी, कुटुंबासाठी, आणि इतरांसाठी देखील, कळत न कळत, दृश्य आणि अदृश्य स्वरूपाचे असे. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्याने सुचलं ते उतरवलं. बघा म्हणजे स्त्रीच्या हक्कांसाठी असा दिवस उभा राहिला, त्या मागे सुद्धा कित्ती लढाया होत्या त्या काळी. 

चला तर मग प्रत्येक दिवस आप आपल्या परीने भन्नाट रीतीने साजरा करू यात. "मस्त खा आणि स्वस्थ राहा" मैत्रिणींनो. 

शुक्रवार, १ मार्च, २०२४

उब


मला अगदी स्पष्ट आठवतंय अजूनही, जसे कि मी आत्ता सगळं अनुभवते आहे. आमच्या नागपूरच्या उन्हाळ्याविषयी लिहावं तेवढं कमीच आहे. सतत भले मोठे डेसर्ट कूलर्स सुरूच असायचे आणि दुपारी वामकुक्षी घेते वेळी सुरवातीला तो गार वारा खूप भावून जायचा पण काही वेळानंतर, झोप लागल्यावर तोच थंडगार वारा बोचायचा किंचितसा. त्या करता आम्ही आधीच सोया करून ठेवायचो आणि ती म्हणजे आईची मऊ साडी अंगावर पांघरायाची. ती माउली कधीच त्याला नाही म्हणत नसे. 


सकाळी शाळा, महाविद्यालय किंवा त्या नंतर नोकरी ह्या सगळ्या काळात सकाळी उठायचं नसायचंच मुळी मला, कारण झोप म्हणजे महा प्रिय. मग जबरदस्ती स्वतःच्या अंथरुणातून / खोलीतून उठायचं आणि थेट आईची गादी, उशी, आणि तो प्रेमळ स्पर्श गाठायचा, अनुभवायचा. ते लोळणं म्हणजे काय हे शब्दात पेरणे अशक्यच. ती उब जागावेगळीच होती. आणि प्रत्येकवेळा अनुभवता यायचीच, अनुभवायला मिळायची. 


आमच्या विश्वविद्यालयाने एक खास स्पर्धा आयोजित केली होती, अमुक दिवस अमुक योगासने करायची, त्याची माहिती त्यांना कळवायची पुराव्यासहित. मी ते सातत्याने केलं आणि जिंकले. बक्षीस म्हणून मला खप काही मिळालं आणि त्यात एक योग मॅट पण सामील होती. माझ्यामते हे २०१७ ला झाले होते. तेव्हापासून दररोज मी योग करतेवेळी त्यावर, त्या मॅटवर पाठ टेकली कि मला त्याच उबेची पुन्हा अनुभूती मिळते. जशी कि मी अजूनही खूप लहान आहे, लाडोबा आहे आणि आईच्या त्या वस्तू वापरते आहे. ह्याही मुळे मला एक प्रचंड स्फूर्ती मिळते आसने करण्याची, सातत्य टिकवून ठेवायची आणि अर्थात हे सगळं करतांना मी वेगळ्या विश्वात पोचत असल्यामुळे मला जरा जास्त वेळ लागतो आसने संपवायला. का माहित नाही पण बक्षीस मिळाली मॅट स्व कष्टाने मिळवली होती, जिंकली होती म्हणून एक वेगळा लगाव असेल कदाचित. काहीही असो, तो स्वानुभव फारच उबदार आहे. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...