रविवार, ३१ मार्च, २०२४

"ते" गाण्याचे सार्थ बोल


"सासुरलं गेंदा फुलं ", "तेरे साथ गंदी गंदी गंदी बात..." असे बोल असलेले हिंदी चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं होतं साधारण दहा वर्षे आधी. सर्वानुमते हे गाणं म्हणजे रोमांचित संभाषण असे आहे किंवा होते. पण एवढ्यातच कसे कुणास ठाऊक पण अनेक किस्से ऐकून, वाचून, बघून नाण्याची दुसरी बाजू समजली. परवाच टीव्ही वर "कौन बनेगा करोडपती" ह्या भल्या मोठ्या नावाजलेल्या कार्यक्रमात खुले आम एक बायको नवऱ्याचे खडे बोल सुनावत होती. त्यातला नवरा म्हणतो कसा "तू कमावत नाहीस तर तुझा उपयोग काय ह्या घराला", किंवा "आई कुठे काय करते" हे पण सर्वश्रुत आहेच कि. सगळ्या स्तरात भारतात बायकोला बोलणे आहेच, अर्थात आऊट लायर्स  किंवा चांगले अपवाद असतात. कोणी कबूल करतात कोणी नाही, कोणाच्या घरी असे तर कोणाच्या तसे. कोणाकडे स्पष्ट तोंडावर ऐकवतात तर कोणाकडे काही वेगळी पद्धत असेल. पण "बायको कायच काम करते" हे खूप ठिकाणी बघायला मिळते. उगाचच नाहीत बायका नोकरी करायला बाहेर पडल्यात इतक्या मोठ्या प्रमाणात. छे छे, फक्त शिक्षण घेतले म्हणून नाहीच, मुळात शिकल्याच त्या कारण अर्थकारण जास्त महत्वाचं बायको, आई आणि इतर नात्यांपेक्षा. अर्थात पुन्हा सांगते "आमच्या कडे असे का$$$$$ही नाही" अश्या म्हणाऱ्या सापडतील, पण ते कितपत खरं खोटं हा एकतर विषयच नाही, आणि ते त्यांचं ते बघू देतं.

सारखं बोलून छान तय्यार करतात ते मुलींना समाजात वावरण्यासाठी आणि खूप मस्त उंची गाठण्यासाठी. कित्ती विचारपूर्वक कृती आहे नाही. सगळे श्रेय अश्या दृष्टीने त्या बोलक्या बाहुल्यांनाच जाते. 

"गंदी बात..." ह्या मागे काय दडलंय: तर मी नवरा. नवरा म्हणजे सातत्याने बोलणारच. अर्थात पुढील पिढी मध्ये हे नाही, नसावं, पण आधी होतं. सासू सासरे कित्येकदा काडी लावायचे, आणि हे पोपट बोलायचे. ह्याला गंदी बात म्हणतात. म्हणजे लग्न झालं, आता तू कधीही कानावर न पडलेले, अनपेक्षित असे ताशेरे ऐकायला तय्यार राहा असे आहे, असे दृश्य आहे अनेक कुटुंबात, मग ते शिकलेले असो, अतिउच्च विद्याविभूषित असो नाही तर अनपढ.  "शुभ मंगल सावधान" असा मतितार्थ आहे ह्या गाण्याचा एका दृष्टीने. प्रत्येक लग्नात करतात सावधान पण त्याचा असा देखील अर्थ असू शकतो, काही मुलींना तर आयुष्यभर हे ऐकावं लागतं, कुठलेही स्वतंत्र दिले जात नाही किंवा त्यावर देखील एक वाचक असतो, खुप उदाहरणं आहेत आणि खूप भोगले आहे माउलींनी. असो. म्हणूनच अजून मुलींपर्यंत हे पोचावं, अजूनही वेळ गेलेली नाही असं सांगण्याकरता हे गाणं लिहिलेलं असावं आणि अश्या प्लॅटफॉर्म वर सादर केलं असावं. बोल, चाल आणि चित्रीकरण लक्षात राहण्यासारखं आहेच. तेव्हा जुन्या पिढीतल्या मुलींनो सजग व्हा. ज्यांचं सासर ह्याला अपवाद आहे त्या सुना फार भाग्यवान आहेत. आणि अशी मस्त माणसे आहेत ह्या जगात अजून.

सोमवार, २५ मार्च, २०२४

वेगळाच बदल


मी होमिओपॅथी औषधांवर विश्वास ठेवणारी आहे. मला ती औषधे आवडतात, परिणामकारक वाटतात आणि हि औषधे ज्या पद्धतीने तय्यार केली जातात, ज्या रीतीने उपचार केले जातात ते मला भावतं. अंतर्बाह्य असा परिणाम साधला जातो, स्वभाव लक्षात घेऊन. आणि असे नेहेमीच म्हटले जाते कि "स्वभावाला औषध नाही". म्हणजे माणसाचा स्वभाव हा कधीच बदलत नाही. पहिल्यांदा जर रुग्ण होमिओपॅथी डॉक्टर कडे गेला तर खूप वेळ त्याची चौकशी होते. त्यात अगदी गरम खायला आवडते का थंड? काही दुखत असल्यास गरम पाण्याची पिशवी घेतली तर बरं वाटतं का? असे असंख्य प्रश्न विचारले जातात, किंवा एक भला मोठा फॉर्म भरून घेतला जातो. 


एकाद्या शारीरिक दुखण्याला गरम पाण्याची पिशवी किंवा बर्फ हे दोन उपाय आहेत. म्हणजे पोटात औषध, थोडा आराम आणि शिवाय शेक हे सगळे मिळून पट्टाकिनी बरे व्हायला होते. आधी माझा एक भला मोठा गैरसमज होता कि सूज आली तरच बर्फ वापरतात, बर्फ किंवा तत्सम जेल असेल, फ्रिज मध्ये ठेवून गार केलेली पिशवी = आईस पॅक. काही वेगळ्या स्वभावाच्या माणसांना ह्या पद्धतीने दुखण्यात बरे वाटेल असं ठाऊक नव्हतं किंवा मला पटत नव्हतं, का कुणास ठाऊक. मला सुरवातीला प्रचंड राग यायचा जर मी कोणाला असं थंड पिशवी घेऊन शेकतांना पाहिलं तर, कारण सरळ आणि स्वच्छ होतं. शेकणे आणि थंड पिशवीने? ह्या, काही काय? असं कधीतरी होऊ शकतं का? मला शाब्दिक समीकरणापासूनच झेपलं नव्हतं हे सगळं. पण वारंवार माझ्या पायांच्या दुखण्याकरता डॉक्टर मला थंड शेक चा सल्ला देत राहिले. काही दिवसांपूर्वी, ह्या भल्या गर्मीच्या मोसमात मग मी हा प्रयोग करून बघण्याचे ठरवले. आणि सांगते काय? मी माझीच ना राहिले. माझ्या पायांना तो शेक इतका म्हणजे इतका भावाला कि ज्याचं नाव ते. माझ्या पायांना बोलता आलं असतं तर त्यांनी नक्कीच धन्यवाद दिले असते आणि शिव्या पण. इतके दिवस हे अमृत का नाही चाखवलंस आम्हाला असं नक्कीच विचारलं असतं त्यांनी. अर्थात माझ्या पायांची अजून एक सवय आहे कि गरम असो वा थंड त्यांना मी साधारण एक तासभर तरी  शेकत बसणं भावतं. शेकत असतांना गप्पा पण हव्यात हो. भलतेच आगाऊ आहेत पठ्ठे. तर आताशा जेव्हा जेव्हा पाय त्यांचं डोकं वर काढतात, तेव्हा तेव्हा गारेगार अनुभव अनुभवतो आम्ही. 


आता मला सांगा ह्याला काय म्हणायचं? स्वभावात बदल? का आणखीन काही? का उन्हाळा म्हणून शरीराला आणि त्या दुखण्याला सुद्धा गारेगार जास्त भावतंय? मग आता जर मी पोटात औषध घ्यायला होमिओपॅथी डॉक्टर कडे गेले तर ते कशी औषधे देणार मला, गरम आवडते म्हणून का थंड? 


डॉक्टर ठरवू दे ते, मी तर सध्या अजून मोठ्या आकाराचे जेल पॅड मागवण्याचा मार्गावर आहे. सध्या मी गारेगार चा पुरेपूर अत्यानंद उपभोगतो आहे. पुढचं पुढे बघू. आज माझे पाय ठणठणीत आहेत हे जास्त महत्वाचे. आणि स्वभावालाच औषध असते, स्वभावच बदलतो आणि हे शक्य आहे. बदल हाच तर स्थिर असतो ना सरते शेवटी. आधी कदाचित पहिली म्हण योग्य असेल हि पण आताशा नाही. आता बदल करत राहणे हे जास्त योग्य. म्हणजे सर्वांमध्ये सामावून घेता येत सहजी. सतत हटवादी किंवा ठाम बनून न राहता हवे तेव्हा स्वभाव विरुद्ध बदल स्विकारुन बघा तर?, कदाचित आवडेल, हे मी आधी का नाही अनुभवलं? असं देखील वाटेल तुम्हाला कदाचित. 

शनिवार, २३ मार्च, २०२४

सांगीतिक मेजवानी


मी एवढ्यातच एका सुंदर, विचारपूर्वक आखलेल्या कार्यक्रमाला गेले होते, उपस्थित राहिले होते. दिग्गज, नावाजलेली माणसे व्यासपीठावर स्थानापन्न झाली होती. पेटपूजा आधीच करवली होती आयोजकांनी. थंडगार वातानुकूलित जागेत, शिस्तीत आणि भरपूर आसनव्यवस्था असलेल्या ठिकाणी, सगळ्या उच्च विद्याविभूषित, भल्या मोठ्या हुद्द्यांवर काम करणारी, किंवा काम करून झालेली उच्चभ्रू मंडळी होती श्रोते म्हणून. अगदी सगळ्यांकडे किमान एक किंवा जास्त अती महागडे मोबाईल होते. भन्नाट वेष आणि केशभुषा करून सगळे उपस्थित होते. आटोपशीर साधारण दीड तासाचा कार्यक्रम होता. दोन लहान मुले होती बाकी सगळी मोठी मंडळी. जसा कार्यक्रम सुरु झाला प्रत्येक मिनिटाला एकाच फोन वाजला. माझ्या मते एखादाच व्यक्ती सोडला तर प्रत्येक जणांनी तो फोन घेतला आणि हळू आवाजात (असं त्यांना वाटलं) बोललेच. एक डॉक्टर मॅडम तर सतत दीड तास फोन वरच होत्या. एकाच फोन वाजल्या नंतर तरी आपला फोन बंद करावा किंवा आवाज बंद करावा कि नाही? पण चे हो. हे काय कमी होतं माझ्या अगदी समोर बसलेल्या मॅडम संपूर्ण वेळ त्यांची साडी सारखी करत होत्या, ते झालं कि डोळ्यात औषध टाकत होत्या मग पर्स ची एक, दोन, मग तिसरी चेन उगढझाप करत होत्या, डोळे पुसत होत्या, पुन्हा साडी... मी डॉक्टर नाही, पण डोळ्यात औषध फक्त दिवसातून दोन किंवा तीनदा च घालतात, प्रत्येक मिनिटाला नाहीच. 


कित्ती जण ह्या खुर्ची वरून त्या वर, इथून फोटो कधी, तिथून फोटो कधी, ह्याला धक्का मार, इतके फिरत होते सतत कि अरे तुम्ही कशासाठी आलात कार्यक्रमाला. 


कित्ती फोन वर मोबाईल डेटा चालू होता, त्यामुळे सोशल मीडिया चे नोटिफिकेशन्स सारखे दर मिनिटाला / क्षणाला हजर. काय हे आणि कशासाठी. कित्ती म्हणजे कित्ती ती अस्वस्थता आणि ती दर्शवायची कशाला कि मी अस्वस्थ आहे. स्थिर व्हा ना आता तरी, ह्या टप्प्यावर तरी. तो जर मोबाईल काही वेळ बंद ठेवला, नाही फोन उचलला तर काय होणार आहे? सांगीतिक मैफिल होती अगदी, आठही बाजूंनी सतत आवाज, नोटिफिकेशन्स, फोन ची रिंग, फोन वर बोलणे, आवाज करत फिरणे ई. इतकी सुंदर भाषणे होती, त्या वक्त्यांनी तय्यारी केली होती, मग त्यांना मान द्या लोकहो. ज्यांना ऐकायचे आहे त्यांना तरी ऐकू द्या. 


सरते शेवटी मी डोळे बंद केले, चष्मा काढून हातात ठेवला आणि शब्दमोती कानात साठवून घेण्याचा प्रयत्न केला, कारण कुठलेही सादरीकरण नव्हते व्यासपीठावर, फक्त ऐकायचे होते. कमाल वाटली पण ह्या उच्च विद्या विभूषित माणसांची. विचित्र वागणं, अनपेक्षित होतं मला कारण तेथे सगळे बहुतांशी साधक म्हणणारे च होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्याच काहीच वाटतं नव्हतं कि आपण काही तरी चुकीचं करतो आहोत. छे छे. काहीही घेणं देणं नाहीच. त्या वक्त्यांची कमाल आहे, मानायला हवं त्यांना, एक ब्र शब्द न बोलता, कुठलीही तक्रार न करता त्यांनी त्यांचे भाषण सुरु ठेवले होते. मला खूप शिकण्यासारखे आहे ह्या तुन. मला नाही आवडत असं वागणं. असो. अनेकदा / आजकाल बरेचदा काय नाही करायचं हेच शिकवणारे जास्त होतं चाललेत. मोबाईल बाबाच्या इतक्या आहारी जाऊ नका, जपा स्वतःला मंडळी, खूप उशीर व्हायच्या आधी. मूलभूत, साधी, अपेक्षित, प्राथमिक अशी हि नैतिक कर्त्तव्य आहे कि जबाबदारीने वागावे, मोबाईल बाळगावा, सोशल मीडिया वापरावा. म्यूट, सायलेंट, आणि बंद कारणे शक्य आहे जेव्हा आपण अश्या एखाद्या सभेत जातो, ऐकायला जातो, किंवा दुसऱ्यांशी संवाद साधत असतो. इतके तर अत्यावश्यक आहे. सन्मान द्या आणि घ्या.  

चाळीशी


माझ्या लहानपणी पासून मी एक निरीक्षण केले होते आणि तेव्हा असे बोलले जायचे, किंबहुना हि वस्तू स्थिती होती कि चष्मा म्हणजे चाळीशी. एखाद्याला चष्मा आहे म्हणजे तो किंवा ती चाळीशीच्या आसपास आहे. "अलीबाबा आणि चाळिशीतले चोर" नावाचा नवा चित्रपट येऊ घातला आहे. त्या निमित्याने सर्व कलाकारांशी चर्चा झाली. मी ती बघितली, ऐकली, एक प्रश्न त्या कलाकारांना विचारण्यात आला, कि "चाळीशी म्हणजे काय?". तर उत्तर असे होते कि "कोणाही बद्दलचे गैर समज दूर झाले", "हा माझ्याशी असंच का वागला असेल, मग मी पण त्याचाशी तसेच वागणार ई." निघून गेले. असेल काही समस्या म्हणून असे बोलला किंवा वागला असेल अशी समजूत आपोआप निर्माण झाली = चाळीशी. हे प्रत्येकाने काबुल केले. कोणाच्या अध्यात मध्यात न पडणे, किंवा पडण्याचा मोह न होणे = चाळीशी. असे अनेक किस्से, अनुभव आणि घटना सांगितल्या गेल्या. 


आत्ता किंबहुना गेले काही वर्षे मात्र हि परिभाषा बदलली आहे. चष्मा म्हणजे चाळीशी असं समीकरण राहिलेले नाही. आताशा अगदी लहान वयात चार डोळे होतात, दोनाचे. ह्या मागची कारणे अनेक आहेत, वाढलेला  स्क्रीन टाइम, जीवनसत्त्वांची कमतरता, प्रदूषण आणि बरीच इतर. मला आज नवीन एक कारण सापडले आहे. ते असे. प्रत्येक वयात, ठिकठिकाणी इतकी चढाओढ निर्माण झाली आहे, बऱ्याच जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, खूप स्थरावर कामे करायची आहेत, बाहेर देशात नोकरी / शिक्षण किंवा फिरायला जायचे आहे, पैसे ढिगाने मिळवायचे आहेत ई. मुळे मग जीवाचे रान करावे लागत आहे. अशात कशाला कोणाच्या अध्यात मध्यात पडायचे, आपले काम बरे आणि आपण बरे, नाही का? काल आपण कसे होतो आणि आज त्यात प्रगती आहे का हे बघितले तरी बास. म्हणजे पैशांची प्रगती नाही तर तब्बेतीची, स्वास्थ्याची, शिकण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची. प्रगती पथावर गाडी असायलाच हवी ते दर्शवण्यासाठी हा चष्मा स्थानापन्न झाला आहे आपल्याकडे जरा लवकर मंडळी. त्या दोन जास्तीच्या डोळ्यांनी आधी स्व मग बाकीचे, खार तर नकोच बाकीचे, असं पवित्रा घ्या आणि बदल अनुभवा. त्याचा अर्थ बाकीच्यांची काळजी घ्यायची नाही असे नाही. तर समतोल साधायचा, अती नको. तुलना नकोच, दुसऱ्यांच्या मार्गात अडथळा नको, अती नको ते विचार नकोत, आणि अर्थात स्व कडे लक्ष केंद्रित हवे. 

प्रत्येकाला आताशा गेली १५ एक वर्षे मोठे व्हायची फार घाई झाली आहे. लवकर मोठं व्हायचं, सगळं अनुभवायचं असं झालायं. घ्या मग आता? ४०शी पण जवळ लवकर पुढ्यात उभी ठाकली आहे, चष्म्याच्या रूपात. आणि जर इतक्या लवकर चार डोळे लाभलेच आहेत तर मग तसेच वागा देखील ना, नेहेमीच.  वागायचं  नाही, तर ऐकायचं, बोलायचं, अनुभवायचं, मिरवायचं, ई. सगळ्याच कृती हो.  कधी असे आणि कधी तसे हे कसे चालणार? एक ठरवा आणि पुढे मार्गस्थ व्हा. 

४० म्हणजे नवीन ६० अशी मी एक जाहिरात बघितली इतक्यात. खूप तथ्य वाटले मला त्यात. 

चला तर मग, आजपासून प्रत्येक दिवस चार डोळ्यांसोबत अत्यानंदाने साजरा करू यात जसा कि एक सण. 

गुरुवार, २१ मार्च, २०२४

अनन्य साधारण


काल सहज यू ट्यूब वर फेरफटका मारतांना एक विडिओ नजरेस पडला आणि त्याने खिळवून ठेवले मला अक्षरशः. इतके कि त्यानंतर मी त्या व्यक्तींचे अजून दोन विडिओ बघून काढले. समोरचे दिसत नव्हते डोळ्याला मी इतकी भारावून गेले होते. "डाउन सिन्ड्रोम" असलेल्या एका मुलीची  (अनन्या) आई तिची कहाणी कथन करत होती. दिवसभर कशी अनन्या ची आई कणखर, खंबीर आणि अविचल आहे हे जरी दर्शवत असली तरी ती कोलमडायची अनन्या झोपी गेल्यावर. अनन्या खूप लघवी असली तरी तिची शारीरिक, मानसिक आणि वैचारिक क्षमता नव्हती सामान्य मुलांसारखी झेप घ्यायची. अगदी तसेच आईला पण सगळे आधी करून दाखवावे लागत होते अनन्याला सातत्याने प्रेरित करण्यासाठी, जे फार अवघड होते. पण सगळी दिव्य पार पाडत शिवाय घरी आणण्याची सख्खी जुळी बहीण, आई डॉक्टर, सगळीच तारेवरची कसरत सांभाळत त्याच अनन्या चा शाशत्रोक्त पद्धतीने शुभविवाह पार पडला. अनन्या आता दुबई ला स्थायिक झाली आहे, तिथली सून झाली आहे. हे सगळं मी पहिल्या व्हिडिओत बघितलं 


पण त्यानंतरचे दोन डोळ्यातले पाणी थांबवतंच नव्हते. जितके अनन्या च्या आई ने पराकाष्ठेची तिला एक माणूस म्हणून घडवले, अर्थात सख्या लोकांची, डॉक्टरांची आणि इतर जणांची मोलाची मदत घेत अगदी तसेच विघ्नेश च्या आईने देखील शिवधनुष्य पेलले दुबईत गेली कित्येक वर्ष. तिच्या कडे देखील विघ्नेशची छोटी बहीण होती, त्याची शाळा, कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि अर्थात माणूस म्हणून जडण - घडण, हे सगळं होतंच. आणि असं सगळं अनेक वर्ष सरल्यावर विघ्नेशची आई अजून एका तश्याच पिल्लाला सांभाळायला तय्यार झाली म्हणजे ती कित्ती वेगळ्या कोटीची व्यक्ती असेल हे मला शब्दात मांडता येत नाहीच, कारण माझ्या शब्द कोशात तिच्या साठी योग्य अक्षरसमूह नाहीतच. 


मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबात खूप शिकलेली, नोकरी करणारी, पैसे कमवत राहणारी, घर सांभाळणारी, स्वयंपाक येत असलेली, घरचे दारचे कामे करता येत असलेली, गाडी चालवायला येत असलेली, हुशार, नाती जपणारी, आणि अशी १००-२०० पाने भरतील अशी सून हवी असते. त्यात चुकीचे काहीच नाही. अशी सून मिळाली तरी उणे दुणे काढणे अगदी पहिल्या घटकेपासून सुरु. अश्या समाजात विघ्नेशच्या आई सारखी माउली पण असते हे नव्याने समजलं. हे नवीन जोडपं कितीही निर्मल, स्वच्छ, सरळ आणि प्रेमळ असलं तरी त्यांना सांभाळण्याची पण गरज आहेच. कमालीच्या पल्याड, असामान्य व्यक्तिमत्व असतात ह्याचं पुन्हा एकदा दर्शन घडलं. विघ्नेश च्या आई वडिलांचं एक वाक्य मला जास्त भावलं. ते दुबईला च वास्तव करण्या मागचं कारण म्हणजे त्या देशात अश्या मुलांना खूप जपतात, मानाने सन्मानाने, अगदी सगळेच. कोणीही कुणालाही हिणवत नाहीच. अनन्या च्या आईला तर माझा साष्टांग नमस्कार पण विघ्नेश च्या आईला कोटी कोटी प्रणाम आणि दररोज तिच्या साठी खास प्रार्थना आणि मागणे कि तिला शक्ती दे. 


आणण्याच्या जुळ्या बहिणीला तिच्या आईने सहज म्हणून एक प्रश्न विचारला, कि तुझ्या साठी विघ्नेश सारखा जोडीदार बघितला तर? ती म्हणते कशी, तो दररोज कुठलीही अढी मनात न ठेवता मला अनेकदा "आय लव्ह यू" म्हणेल. रागावणार नाही, उगाचच चिडणार नाही, उणे दुणे काढणार नाही, फक्त म्हणजे फक्त माझ्याच साठी माझाच होऊन राहील आणि हि तिची यादी फार लांब लचक आहे. माणुसकीचा एक स्वच्छ सुंदर आणि कल्पक नजराणा असतात हि माणसं. दिलेले काम मनापासून, कलात्मक रीतीने, वेळेआधी करतात, कोणाच्या अध्यात मध्यात नाहीच, डावपेच नाही, राजकारण नाही अगदी सरळ मार्गी आयुष्य जगणारे. प्रत्येकावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करणारे असे. 


मला कित्ती लिहू आणि कित्ती नाही असं झालायं. मला हे असे विश्व संपूर्ण पणे अनभीन्य आहे पण तरी देखील संपूर्ण बुडायला झालायं त्यात मला आता. "काय वर्णू तव गूण, अल्पमती नारायण". 

https://www.youtube.com/watch?v=7FM3egDfidM

सोमवार, १८ मार्च, २०२४

स्थिर सायकल


मला गेली अनेक वर्षे विविध सायकलींबद्दल ठाऊक आहे. अर्थात साध्या, गिअर नसलेल्या अश्या. सायकल अगदी माझ्या वडिलांची भली मोठी, काळी, मग माझी आली छोटी तीनचाकी, मग दुचाकी, त्या नंतर अनेक. रस्त्यावर वाऱ्याशी गप्पा मारत फेरफटका मारणे म्हणजे मोठ्ठी गम्मत. त्या सोबत आईची, माझी कामे होत असतं. अमेरिकेला गेल्यावर अजून एका प्रकारच्या सायकलीशी माझी गट्टी झाली, ती चारभिंतींच्या आत चालवायची म्हणजे चाकांचा एवढा संबंध नसतोच, माझ्या दृष्टीने. मग त्यात असंख्य प्रकार, आकार आणि उंचीच्या सायकली बघितल्या, वापरल्या देखील. कधीही व्यायामात खंड नको पडायला म्हणून ह्या अश्या सायकली. उत्साह टिकून राहावा, बहाणे न करता कुठल्याही ऋतूत मस्त पद्धतशीर शारीरिक हालचाली व्हाव्या म्हणून वापरायच्या. आज मला अचानक अजून काही कारणे सुचली. सायकल म्हणजे पडणे आलेच. किंबहुना पडले नाही तर सायकल काय शिकणार? रस्त्याचा अंदाज कसा बांधता येणार? रहदारीत न घाबरता, आत्मविश्वासाने सायकल मिरवण्याचा, ठिकठिकाणी पोचण्याचा अत्यानंद कधी घेणार? असे सगळे वाक्प्रचार माझ्या लहानपणी प्रचलित होते. तर आत्ताच्या बेशिस्त रहदारीत, खड्यांच्या रस्त्यात आणि वाहनांनी चोवीसतास दुथडी भरून वाहत्या रस्त्यात सायकल काढण्यापेक्षा, प्रदूषण (हवेचे, धुळीचे, वासाचे, आवाजाचे) अनुभवण्यापेक्षा हि स्थिर सायकल बरीच बरी. बाल्कनीत किंवा एखाद्या बागेत असलेली व्यायामासाठी योग्य. उगाच धडपड नको, लागणं नको कि डॉक्टरच्या फेऱ्या आणि दुखणे. त्या पेक्षा स्थिरता महत्वाची, जी योग आणि अश्या सायकली किंवा तत्सम व्यायाम करून साधता येईल. चला तर मग मंडळी अश्या सायकल वर स्वर होऊ यात आणि स्वस्थ राहू यात. 

रविवार, १७ मार्च, २०२४

सारी कायनात...


हि एक हिंदी भाषेतली म्हण आहे कि सगळे विश्व तुम्हाला मदत करायला हजर होते अनेकदा, जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा किंवा अगदी सहज पणे जेणेकरून कोणाचीच गरज पडणार नाहीच. वातावरण निर्मिती इतकी जगावेगळी असेल, अनपेक्षित असेल कि कदापि कोणावर अवलंबून राहावे लागणार नाहीच. स्वयंसिद्ध होण्याचा अप्रतिम उपाय जो खूप काळ टिकतो, तुमच्या स्मृतीत राहतो, अगदी ताजा तवाना असा.


काही दिवसांपासून मोगरा आल्यासारखा बहराला आहे, जेथे तिथे, सर्वत्र. माझ्या बाल्कनीत आहे, माझ्या वर, खाली, आजू आणि बाजूला देखील. जगावेगळा सुगंध घेऊन तो नटाला आहे. कुठलेही कुंजूशी न करता तो तो सुगंध वाटतोय सर्वांना आणि सर्वदूर. सर्वदूर नेण्यास मंद वारा त्याला साथ देतोय. हवा / वारा ज्याच्या अदृश्य भव्य दिव्य शक्ती पुढे मी निःशब्द होते, नतमस्तक होते तो ह्या सुगंधाला सातत्याने माझ्या पर्यंत पोचवतो आहे, आपणहून, न सांगता. आमच्या घराला भल्यामोठ्या खिडक्या आहेत, प्रत्येक खोलीत, सर्वत्र, भरपूर अश्या. त्यामुळे मी कुठेही गेली तरी सुगंध हजर. वर्षातून एकदा तो अनुभवायला मिळतो आणि काही दिवस फक्त. त्यामुळे मी तो मनाच्या गाभाऱ्यात सांभाळून ठेवण्याचा प्रयन्त करते आहे. माझा सकाळचा अबोल गजर आहे तो. चौफेर नृत्य करतोय जसा, असा तो सुगंध माझ्या आधी पोचतो त्या ठिकाणी आणि रोमांचित करून सोडतो. कुठलाही भलता, वेगळा, निरूपयोगी, त्रासदायक ई. विचार मला स्पर्श करण्याआधी. कित्ती करावं कोणी माझ्या साठी आणि का? कित्ती म्हणजे कित्ती शिकण्या सारखं आहे ह्या जोडगोळी (हवेच्या स्पर्शामुळे किंवा स्पर्शाने मोहून वाहिलेली हवेमुळे) कडून, देवा. ह्याची परतफेड होणार का माझ्या हातून? इवलेसे रोप लवियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलाला...

मोगऱ्याला तोड नाहीच. त्या नंतर "तो" माझ्या साठी मुक्तहस्ताने मातीचा सुगंध पसरवतो, मग येतो जाईचा आणि इतर मनमोहक दरवळ, मृदगंध, आमोद, परिमल... ह्यांची श्रुंखला सातत्याने मला "पुढचे पाऊल" टाकायला लावतेच.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...