शुक्रवार, ३१ मे, २०२४

आपल्या पायांवर उभे

 तसे मी घरीच गमाडी जम्मत म्हणून माझ्या पेक्षा लहान मुलांचा अभ्यास खूप आधीपासून घेत होते, तेव्हा मी देखील एक विद्यार्थिनी होते. माझं तंत्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी जेव्हापासून नोकरी करायला लागले शिक्षिका म्हणून तेव्हा पासून शिकवतांना बसून राहणं, किंवा बसून शिकवणं ठाऊकच नव्हतं अजिबात. किंबहुना कशावर बसायचं? आणि का? सगळं काही फळ्यावर लिहावं लागायचं किंवा नोट्स वर्गात कथन कराव्या लागायच्या. अगदीच कधीतरी ट्रान्स्परन्सी शीट्स तय्यार केल्याचं तर मग त्यावेळचा प्रोजेक्टर वापरायला मिळायचा. पण तरी देखील उभंच, सतत. खुर्ची नसायची वर्गात शिक्षकांसाठी आणि स्मार्ट बोर्ड किंवा आज सारखं तंत्रज्ञान विकसित न झाल्यामुळे आधीपासून PPT तय्यार करून पाठवणे वगैरे अशक्यच. रक्तात भिनलं होतं कि शिकवतांना उभे राहणे. 


माझ्या मते प्रोफेशनल दर्जाचे जे विविध क्षेत्र आहेत जसे स्वयंपाक, चित्रकला, गाणे, फॅक्टरीत काम ई. उभे राहूनच करावे लागते, पर्याय नाहीच. 


आताशा माझे पाय बंद पडल्यापासून मी उठत बसत शिकवते आहे ते पर्यायच नाही म्हणून आणि तंत्रज्ञानाची जोड आहे म्ह्णून. नाही तर उभं राहिल्याशिवाय मज्जा नाही, सर्वांचे हावभाव नजरेस पडत नाहीत आणि त्यांना शिकवलेलं समजलं कि नाही हे लक्षात येत नाही. त्यामुळे उभे राहणे हाच पर्याय किंवा ते आपसूकच होतं खरं.  


एका दिज्जग गाणाऱ्या कलाकाराची मुलाखत ऐकत होते. त्यांना गाण्यास सांगितले, किंबहुना चारच ओळी, मुलाखतीचा कार्यक्रम असल्यामुले पूर्ण गाणे नाही. एवढे जगमान्य व्यक्तिमत्व असून सुद्धा त्या ओळी उभ्याने गायल्या आणि गाणं झाल्यावर पट्टाकिनी वादकांना दाद दिली. क्या बात है? मस्तच. 


हिंडत फिरत शिकवणे, समजावून सांगणे, मधेच एखादा प्रश्न टाकणे आणि चाचपणे, त्यामुळे सर्व वर्ग लक्ष तर देतोच आणि एक नाते देखील निर्माण होते. 


मधे एक व्हिडीओ बघण्यात आला माझ्या, त्यात एक भला मोठा, नावाजलेला, लोकप्रिय असा शेफ होता / आहे. त्याचे काही कारणास्तव पाय कामातून गेले. तज्ज्ञांच्या मते ते ठीक होणं अशक्य होतं. त्याला उभे राहणे अर्थात कधीच जमणार नव्हतं. पण नोकरी करणं अत्यावश्यक. मग काही दिवस त्याने आराम केला आणि त्याच वेळी त्याच्या जिवलग मित्रांनी मस्त शक्कल लढवली. त्यांनी जेथे स्वयंपाक होत असे तिथले छत वेगळ्या धाटणीतले बसवले. एक खुर्ची आणली आणि दोरखंड. अर्थात तो साधारण दोरखंड नव्हता. तो पुली होता, जो आडवा, तिरका, आणि हव्या त्या दिशेला सरकू शकत होता. त्यामुळे काय साधले गेले तर   हा शेफ खुर्ची वर बसायचा. त्याला जो पदार्थ तय्यार करायचा आहे ऑर्डर प्रमाणे त्यासाठी लागणारे घटक पदार्थ ह्या त्या स्टेशन वर ठेवलेले असायचे. ते तो सहज स्वतः घेऊ शकेल, कोणावर अवलंबून राहणार नाही, स्वावलंबी होईल आधीसारखा म्हणून हि केलेली जय्यत तय्यारी. काय दिमाख लावला आहे ना?  भन्नाट च. असे असावते दोस्त. ह्या सगळ्या महेनतीमुळे त्या शेफची नोकरी टिकून राहिली, त्याला पैसे मिळत राहिले, शिवाय त्या खानावळीचा फायदा झाला, गिऱ्हाईक खुश आणि त्यामुळे त्याचे परत मिळालेले स्वावलंबन. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाहीच. 


न्यू नॉर्मल दिवसांमधे मी हे आवर्जून टिपले आहे कि ऑनलाईन शिकवायचं असलं तरी बरेच हाडाचे शिक्षक उभा राहूनच शिकवत होते, तसे कॅमेरे सेट करत होते.  त्या शिक्षकीपेशाचा अत्यादर म्हणून, किंवा सवय म्हणून किंवा सवय टिकून राहावी म्हणून, कारण हे दिवस जाणार हे ठाऊक होतं त्यांना. कदाचित बघणाऱ्या विद्यार्थ्याला शिकता यावं हे देखील म्हणून असेल. पण उभं राहण्याने जो खंबीरपणा येतो. वर्गात लक्ष राहतं आणि सर्वांपर्यंत पोचता येतं,हे शिकवतांना नेहेमीच खूप कामी येतंच. आपल्या पायांवर उभे आहोत दिमाखात ह्याचा सतत प्रत्यय येत राहतो. असेच अखंड उभे राहायचे आहे ह्याचं बळ मिळतं. 


  

गुरुवार, ३० मे, २०२४

सुवासिकता


आमच्या सोसायटीची शान औरच आहे. वैविध्य रंगांनी नटलेली, सजलेली अशी. त्यात एक खास लहानपणीची आठवण करून देणारे घंटीच्या फुलाचे झाड पण आहे, म्हणजे पिवळ्या आणि केशरी रंगांची, दोन्ही. काल मी संध्याकाळी खाली जाऊन पाय मोकळे करत असतेवेळी माझ्या देखत आणि फक्त माझ्या साठी एक ताजतवानं फुल माझ्या पुढ्यात अवतरलं. अहाहा. मग काय विचारता? तो न्यारा सुगंध घेऊन मी वेगळ्याच विश्वात पोचले. कित्ती म्हणजे कित्ती वेळ तो सुगंध देत राहिला मला. इतका उत्साहवर्धक आणि स्फूर्तिदायक असा अनुभव होता ना तो, कि ज्याचं नाव ते. 


उन्हाळ्यातला तो मोगऱ्याचा मंदधुंद सुवास अगदी बहुतांशी प्रत्येक फ्लॅट मधून येणारा कारण सगळ्यांच्याच बाल्कनीत मोगरा स्थानापन्न झालेला आहेच. सकाळची सुरवात काय मोहक होते म्हणून सांगू? हे काय कमी होतं, त्या नंतर एकावर एक घरं असल्यामुळे गवतीचहा घालून उकळी आली कि असं वाटतं कि जे शब्दात मांडणे अश्यक्यच.  माझ्यासारखी गवतीचहा वेडी सर्व ऋतूत तो वापरते, पावसाळ्यात आल्याला खास, विशेष प्राधान्य दिले जाते, आणि त्याचा घमघमाट तर वर्णन करण्या पल्याडचं. हेच आलं त्याच हिवाळ्यात "जिंजर कुकी" ह्या नावाने तय्यार केलं जातं तेव्हा ओव्हन ने पसरवलेला सुवास भूक चाळवून जातोच. हेचं आलं कढीची शान वाढवतं तेव्हाचा घमघमाट भूक वाढवून जातो. प्रत्येक वेळी ऊर्जेचे स्तोत वेगळे, घटक पदार्थ वेगवेगळे असतात तरी सुवास छाप सोडतोच.  स्वयंपाक घरात तय्यार होणाऱ्या गोड, तिखट, आंबट प्रत्येक पदार्थाची अवीट गोडी पोचतेच घरी आणि दारी सुद्धा. प्रत्येक मसाल्याचा सुगंध वेगळा आणि तो जेव्हा एखाद्या पदार्थाची शान वाढवतो तेव्हा तेव्हा प्रकर्षाने जाणवणारा घमघमाट पसरवतोच. शेकणे, शिजवणे, भाजणे, तळणे, बेक करणे, अगदी प्रत्येक वेळचा अनुभव निराळा. 


तर अशी हि आमची सोसायटी, सुगंधी. सातत्याने माणसांच्या स्वभावाचा, सहवासाचा, पदार्थांचा, फुलांचा, मातीचा, पॉलिशचा, रंगरंगोटीचा, पेट्रोलचा, आणि असे अनेक विविधत्वाने नटलेली. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण, या आणि स्वतः अनुभवा आमच्या सोसायटीचा अनोखा गंध. 

मंगळवार, २८ मे, २०२४

मानसिक स्थैर्य


मोबाईल हा एक नवीन प्रकार जेव्हा पासून उदयास आला आहे तेव्हा पासून जणू हा एक मानवी आणि जीवापेक्षा महत्वाचा अवयव झाला आहे. "जेथे जातो तेथे तो माझा सांगाती", जेव्हा पाहावं तेव्हा आणि ज्याला पाहावं तेव्हा फक्त मोबाईल हातात, सोबत आणि ध्यान लागल्याची परम अवस्था. काय बोलायचे हे समजतंच नाही मला. अगदी वाहता रस्ता म्हणू नका, दुकानं, गाडी चालवतांना (दोन्ही दोन आणि चार चाकी), उठता बसता... दमले मी बघूनच. मी तर असे दिग्गज बघितले आहेत कि जे उच्च विद्याविभूषित आहेत, अनेक दशकांचा अनुभव गाठीशी आहे, तरी देखील मोबाईल आणि सोशल मिडिया वर आलेला प्रत्येक संदेश, मग तो ऑडिओ असो, विडिओ असो, लिंक असो नाहीतर टेक्स्ट, वाचलाच पाहिजे, उघडलाच पाहिजे. कित्ती धोकादायक आहे ते, कसं समजत नाही ह्या मंडळींना? आणि का उघडायचा? दुसरे काही महत्वाचे करण्यासारखे नाही का? बरं पाठवणारा आहे हो भले हि ओळखीचा पण त्याचे मूळ? कोणाला ठाऊक? मग का?


वय, वर्ग, शैक्षणिक पात्रता, ठिकाण, कामाचा अनुभव, कामाचे स्वरूप काहीही म्हणजे काहीही फरक नाहीच. कोणालाही इतकं जवळ कधीच कोणीच बाळगले नसेल इतका त्याचा ध्यास आणि सहवास. कंटाळा येत नाही का? डोळे, मान, कान ई. दुखत नाहीत? 


आताशा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात वावरत असला तुम्हाला मिटिंग ला हजर राहणं आलंच, म्हणजे बोलणं आणि समजावून सांगणं देखील आलं, त्यामुळे मुका सुद्धा बोलायला लागला आहे आजकाल. मुका म्हणजे अगदीच शब्दार्थी घेऊ नका. अबोल म्हटलं तरी चालले. प्रेसेंट केलं नाही, काम कसं आणि किती वेळेत केलं हे समजावून सांगितले नाही तर गाडी पुढे जाणारच नाही. हा एक भाग झाला. दुसरा महत्वाचा म्हणजे ह्या मोबाईल मुळे आणि अर्थातच तंत्रज्ञानामुळे सगळे सतत बोलतांना आढळतात, काय आणि कुणाशी इतके बोलतात कुणास ठाऊक. आणि मी असे संशोधन पत्रिकेत ऐकले आहे कि बोलका माणूस मोकळा असतो. त्याच्यात काहीही साठून राहात नाही. त्यामुळे तो आतून शांत असतो. तिसरे म्हणजे व्यक्त झालीत सगळीच माणसं आताशा, ह्या ना त्या पद्धतीने. काही जण बोलण्याला प्राधान्य देतात, काही रील्स करतात, काही जण लिहून मोकळे होण्याचा अनुभव घेतात, आपआपली मते मांडतात, आणि आवर्जून करतातच. 


मग एक फार मोठा प्रश्न उद्भवतो माझ्या देखत तो असा कि मग ह्याच सगळ्या मोकळ्या माणसांना मानसिक आजाराची लक्षणे का दिसत आहेत आणि ती देखील खूप मोठ्या प्रमाणात आणि सर्वत्र पसरलेल्या अवस्थेत? सगळा समाज पोखरून निघतो कि काय हि भिती आता निर्माण झाली आहे. दिसायला उत्तम, वागण्या बोलण्याला व्यवस्थित, कामं मार्गी लावणारा तरी देखील मानसिक रित्या खोकला का? काय त्रासदायक आहे असं? सर्वांचे स्वभाव असे का होत चालले आहेत? हा एक गहन आणि गंभीर प्रश्न आहे, सर्वच वयोगटासाठी आणि जगभरात निर्माण झालेला. काहीही होऊ नये म्हणून तर सगळे जणं स्वतःला गुंतवून ठेवत आहेत ना त्या मोबाईल नामक निर्जीव वास्तूसोबत, व्यक्त पण होत आहेत, आता पुढे काय करायचं हा देखील प्रश्न नाहीच कारण खूप काही मोबाईल ने दिले आहे करायला. बरं आधी सारखं नाही, आता भिशी आहे, सहली सजह काढल्या जातात, हवी तेवढी खाण्याची ठिकाणे आहेत, ओला आणि उबेर आहेत, नको तेवढ्या, जुन्या पान्या मित्र मैत्रिणीचा गोतावळा आहे, मग काय उणं आहे? समाधानी वृत्ती का नाही मग? अजून काय हवंय?  हे सगळं नव्हतं तेव्हा माणसं शांत निद्रेचा अत्यानंद घेत होती, अचानक दत्त म्हणून घरी येत होती आणि जेवूनच जात होती, कमाई थोडी होती, कुठलेही सहज उपलब्ध तंत्रज्ञान नव्हते खेळण्यासारखे वापरायला. 


डोळे उघडा, नीट बघा, आजार टपकण्याची वाट बघू नका, सर्व काही प्रमाणात वापरा, सर्वकष स्वरूपाचा विचार आणि आचार ठेवा, मोबाईल आपल्यासाठी आहे हे विसरू नका, घरची कामे करा, व्यायाम करा, जेवतांना जेवा फक्त, माणसाने माणसाशी माणसासम वागून तर बघा, सातत्याने स्क्रीन टाळा मंडळी, कृपया.  खूप उत्कृष्ट गोष्टी आहेत, कामे आहेत, संध्या आहेत, जरा मान वळवून तर बघा.  

नागपूरकरांचे नवखे दर्शन


माझ्या संत्रा नगरीचा मला अभिमान होता, आहे आणि सदोदित राहील. पूर्वीचे नागपूरकर कसे होते हे जगमान्य होतं आणि ठाऊक होतं. तिथल्या पाण्याचा रंग अनोखाच आणि ढंग देखील. तिथल्या हवेत आणि पाण्यात जी काय जादू आहे, ती अनोखीच, पट्टाकिनी लक्षात येतेच. "कालाय तस्मै नमः", म्हणतात ते काही वावगं नाहीच. काळ आपला महिमा दाखवतोच. त्याची जादू निराळी आहेच. आणि "बदल हाच तर स्थिर आहे" ना सगळ्यात. जुने आणि असली नागपूरकर पांगलेत इकडे तिकडे, नोकरी निमित्य किंवा इतर कारणांनी. त्यामुळे माझ्या लाडक्या संत्रा नगरीत एक पोकळी निर्माण झाली आहे आणि ती दृश्य आहे. जे नागपूरकर पांगले आहेत ते नागपुरी हवाहवासा बाणा इतरत्र पसरवत आहेत. म्हणजे उत्तमोत्तम गूण बाकिच्यांना पोचत आहेत त्या अनोख्या मातीचे. आत्तापर्यंत तरी बघितलं, ऐकलं, सानिद्यात आलं कि कळत होतं कि हि व्यक्ती नक्कीच नागपूरची आहे. पण एवढ्यात मला एक नवीन नवखा अनुभव आला आणि थोडासा हादरा बसला. मुळचे एक नागपूरकर कुटुंबीय सध्या दुसऱ्या ठिकाणी स्थायिक आहेत. माझी त्यांची अनेक वर्षांची ओळख. जेव्हा यथोचित ठरलं भेटायचं तेव्हा का कुणास ठाऊक मनात पाल चुकचुकलीच पण तरी देखील म्हटलं नाही असं होणं शक्य नाही. पहिला धक्का बसला जेव्हा उण्ग्यासारखा पत्ता पाठविला. पोचले तर घर कुठे सापडतंय. आपलं घर खोपच्यात आहे म्हटल्यावर जरा आजूबाजूची माहिती, किंवा खूण द्यावी का नाही? म्हटलं असो. मग पोचले घरी, एका खुर्चीचं ऑफिस आहे तेथे बसलो, मोघम बोललो. आधीच काय काम आहे ते कळवलं होतं, मला वाटलं ते तयारीने बसतील, उत्तरे तय्यार ठेवतील मस्त भन्नाट काही तरी ऐकायला मिळेल, पण छे. मग कसा तरी पाण्याचा पेला आला समोर. आणि हो विसरलेच. काही किलोमीटर प्रवास झाल्यावर मला अचानक फोन आला कि "आमच्याकडेच आज नाश्ता करायचा हं". मी सांगितलं कि मी इथपर्यंत पोचले आहे आणि घरूनच व्यवस्थित खाऊन निघाले आहे.  मनात म्हटलं हि काय वेळ आहे आमंत्रण द्यायची. कित्ती दिवस आधीच ठरलं होतं तेव्हा नागपुरी आग्रह गेला कुठे? असो. कसं तरी बोलणं झालं, मग लहान मुलांना वाढतो तेवढे आजाऱ्याचे पोहे आले पुढ्यात, आणि त्या सोबत फूस झालेली राजगिरा वडिचा तुकडा. आजाऱ्यासाठी खास तय्यार केलेले, अगदी काहीही न बघितलेले असे पोहे, म्हणजे अगदी हळद, मीठ, तिखट सुद्धा विसरलेले. असो. रसविरहित जे काही बोलणे सुरु होते ते एकतर्फी होते, मध्ये फक्त काही हुंकार किंवा छोटीशी वाक्ये येत होती, पोहे खाता खाता. त्यांनी अक्षरशः डोळे मिटण्याच्या आत ते पोहे फस्त पण केले. आणि मग दोघे आपआपले फोन बघायला लागले, चाळवाचाळव करायला लागले. ती देहबोली हे स्पष्ट दर्शवत, खुणावत होती मला कि कधी निघताय? माझं नशीब बलवत्तर त्यामुळे मला पट्टाकिनी उबेर मिळाली. गेट पर्यंत सोडायला आले तेव्हा मी म्हटलं कि या आता माझ्या घरी, भेटू आणि भेटत राहिलं पाहिजे. घरी या, कारण माझ्या आजूबाजूला आपल्या दोघांच्या ओळखीचे अनेक जण राहतात. मी सर्वानांच बोलावून घेते. पण "तू पुन्हा ये निवांत, सावकाश, जेवून गेली असतीस तर बरं वाटलं असतं, किंवा काय हे धावपळीत येणं, पुढल्यावेळी जरा वेळ काढून ये..... ह्या पैकी काही म्हणजे काही च कानावर पडले नाही. टॅक्सी वाळल्यावर मी हात काढून टाटा करणार तर बघते काय गेटपाशी कोणीच नाही हो. घरात सुद्धा शिरले नाही मी, घर दाखवतो ना आपण फिरवून, ते नाही. चार घरं सोडून अजून एक दोघांच्या ओळखीचे राहतात. आधी आमचं एक दोनदा बोलणं झालं होतं फोन वर तेव्हा मी इच्छा व्यक्त केली होती कि अनायासे मी इतक्या दूर येते आहे तर एकाच ठिकाणी दोघांना भेटू. त्याची पण काहीही व्यवस्था केली नाही, सुतवाच्य पण नाही हो. मला वाटलं कि मला सरप्राईझ देतील दोन्ही कुटुंब, पण अगदीच नाही.  कमाल कमाल आहे.  इतके कोरडे नागपूरकर हे अस्वस्थ करणारं आहे मला. कसं शक्य आहे हे? मी स्वप्न तर नाही ना बघितलं? वाईट स्वप्न? पण नाही, टॅक्सी ला नोटा दिल्या मी दोन्ही वेळा, कारण भरपूर भाडं झालं, अंतर लांब असल्यामुळे. असो. 


माझे बाबा म्हणतात तसे, प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. प्रत्येक म्हणजे फक्त माणूसच नाही, प्रसंग देखील. शिकण्यासारखं म्हणजे प्रत्येक वेळी काय करायचं, किंवा काय घ्यायचं असंच नाही तर काय करायचं नाही हे पण प्रकर्षाने शिकण्यासारखे आहे. हा प्रसंग मला नागपूरकर असे वागूच शकत नाही, किंवा कोणीही घरी बोलावून असे वर्तन करू नये हे शिकवून गेलं नक्को. मस्त धडा मिळाला. खूप समाधान मिळालं कारण नकळत मला अगदी आदल्या दिवशी झालेली अजून एका नागपूर च्या कुटुंबाकडून आवभगत आठवली आणि इतर अनेक अत्योत्तम असे प्रसंग आठवले, आणि खूप जणांशी मनःपूर्वक जोडले गेले, जास्त प्रकर्षाने. माझी नवीन भागात मस्त मोठ्ठी लांब चक्कर झाली. खूप नवनवीन रस्त्यांवरून भटकंती करून आले, मनसोक्त, कुठलीही घाई नाही, घड्याळाच्या काट्यांवर पळायचे नाही, शोरूम मधून नुकत्याच, अगदी माझ्यासाठी बाहेर पडल्या होत्या कि काय अश्या कोऱ्या करकरीत गाड्या दोन्ही वेळा लाभल्या. अजून काय हवंय मला. आणि हो, माझ्या हातून होणारे पोहे कित्ती म्हणजे कित्ती चविष्ट, अप्रतिम, भन्नाट आणि सर्वगुणसंपन्न असतात हे नव्याने कळले, शिक्कामोर्तब झाला. अहाहा च. 


पुण्याच्या पाण्याचा असर होता, कि घरी काही गडबड होती, केमिकल लोचा झाला होता का? माहित नाही. पण जे काही असेल ते सगळ्यातून निघून पुन्हा एकदा संत्रा नगरी सारखे सर्वांशी वागोत हि सदिच्छा.  

रविवार, २६ मे, २०२४

वर्थ

 मी काल माझ्या एका खास, आवडीच्या आणि सूर जुळलेल्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. सर्व भेटीच्या आठवणी सामावून घेत परत निघाले. सातची वेळ साधारण त्यामुळे रस्त्यावर बऱ्याच गाड्या होत्या, माणसं होती, चाकरमानी पण असतील त्यात कदाचित. बरेच ठिकाणी थांबत थांबत / थबकत थबकत माझी टॅक्सी पुढे जात होती. त्यामुळे मावळता सूर्यामुळे आकाशात निर्माण झालेली जगावेगळी रंगबीरंगी नक्षी भन्नाट दिसली, भावली. भव्य रस्ते, मोठ्ठी दुकाने ई. बघतांना एक प्रकर्षाने जाणवले. एका रांगेत काही दुकाने होती त्यात कारागीर कपाटे तय्यार करत होती. काही तय्यार झालेली कपाटे रस्त्यावर, म्हणजे दुकानाच्या दृश्य भागी मांडून ठेवली होती. लक्ष वेधून घेतील असे काही माझ्या चार डोळ्यांना दिसले. मी आजतागायत फक्त भल्या मोठ्या आकाराची महागडी मार्बलची फरशी बघितली होती. पण हे म्हणजे माझ्यासाठी तरी वेगळं होतं. हुबेहूब त्याच मार्बल ची प्रतिकृती होती ती. तीच रचना, मूळ कल्पनेचा आराखडा जसाच्या तस्सा उतरवला होता, पण अर्थात  सनमाइका डिज़ाइन स्वरूपात. जबरदस्तच. दिसायलाच इतकं वेगळं वाटलं कि ज्यांना खोलीची भव्यता दाखवायची आहे, किंवा फर्निचर चं वेगळेपण दाखवायचं नाही आहे, लपवायचं आहे अश्यांसाठी खास केलं होतं असं वाटलं. काही जण फरश्या पण भिंतींवर लावतात ना (तश्या वेगळ्या पण मिळतात) तसेच काहीसे भासले दुरून बघते वेळी पण ते प्रत्यक्षात मात्र कपाट होते. इतके हुबेहूब उभे करणे हि कमाल आहे आणि मी पहिल्यांदा हे बघितल्यामुळे मला वाटल्याशिवाय राहिलं नाहीच कि असं पण कपाट होऊ शकतं हे कसं काय कोणाच्या डोक्यात आलं असणारं? 


माझ्या विद्यालय / महाविद्यालयाच्या दिवसात नागपुरात एक वेगळ्या धाटणीतली सोसायटी बांधली गेली होती आणि ती माझ्या बघण्यात पण आली, जंतरमंतर. जमीन आणि भिंत एकाच रंगसंगतीचे म्हणजे भुलभुलैय्या सारखं अनुभवता येईल त्या घरात. माझी लेक नेहेमीच म्हणते मला, काहीही झालं, कुठेही गेलीस तरी नागपूर कसं नजरेस पडतं तुझ्या, नेहेमीच, सदोदित? 


एकंदरीत काल माझं बाहेर पडणं सार्थकी ठरलं.  "इट वॉज वर्थ इट". पुन्हा एकदा लहान मुलं झाल्यासारखं वाटलं मला, माझ्या बाबांच्या गाडीतून चक्कर मारतांना जगावेगळा अनुभव मिळायचा अगदी तस्सा. 

मधुर रसाळ

 मनमोकळा संवाद आणि हलका फुलका हसण्याचा आवाज दारावरची पाटी वाचतांनाच आला. दार उघडले तर काय? आल्हाददायक गारेगार वातावरण. निश्चितच ते वातानुकुलीत यंत्राने उगाचच थंड करायची म्हणून हवा गार केली नव्हती हे निश्चित समजले. मी पहिल्यांदा हजेरी लावली होती त्यामुळे मी पूर्णपणे अनभिन्य होते. आवाजावरून लक्षात आले कि हा कूलर आहे, चार डोळ्यांनी बघितल्यावर माझे नागपूर उभे ठाकले असे दृश्य दिसले. तो डेसर्ट कूलर होता, खोली बाहेर मांडलेला, स्थानापन्न झालेला असा, क्या बात है? अपार्टमेंट मधे हे मी कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच अनुभवलं प्रत्यक्ष, अगदी तिथल्या मंडळींसारखे, वेगळे, उत्कृष्ट आणि भन्नाट. ती माझ्या माहेरचीच / माहेरच्या गावचीच मंडळी होती, "नो वंडर" त्यामुळेच अशी सुरवात झाली आमच्या भेटीची, जी खूप महिन्यांनी होत होती. ठरतंच नव्हतं काही कारणांमुळे. आणि मग काय विचारता, त्या गप्पा अघळ पघळ अश्या, ते सुबक सुंदर घर, दिलखुलास माणसे, चविष्ट नाश्ता आणि अनेक विषयांची देवाण घेवाण त्या तासात झालेली. असं फक्त आमच्या नागपूरकरांचंच होऊ शकतं हे निश्चित. कुठलेही टोकाचे विषय नाहीत, कोणा  एका बद्दल पाल्हाळ लावले नाही, उणे-दुणे तर नाहीच नाही, अनेकविध विषयांवर मस्त चर्चा झाली. नवीन मंडळींची थोडक्यात ओळख झाली.  पट्टाकिनी बरी झालेली, अगदी पहिल्यासारखी फ्रेश, उत्साहपूर्व / उल्हासित मैत्रीण बघून, बोलून, तिच्या सोबत वेळ घालवून एक वेगळी पर्वणी लाभली  /गाठली असं वाटलं. 

"चेरी ऑन केक" म्हणजे वातावरण मस्त होतं, गर्मी विशेष नव्हती, दोन्ही वेळा उत्कृष्ट गाड्या आणि वाहनचालक मिळाले. माझ्या घरापासून साधारण अर्धा तास लागला जायला आणि यायला. त्या बघत माझं फारसं काय नाहीच जाणं होत. त्यामुळे मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं, माहेरी जातांना कसा उत्साह असतो तसं झालं. जातांना एका बाजूचे नवनवीन दुकानं, गगनचुंबी इमारती, सजलेले / नटलेले रस्ते, वेगळं दृश्य बघत बघत, अत्यानंद घेत मी पोचले, मस्त हवेशीर आणि मोकळ्या जागी वसलेल्या सोसायटीत. आणि येतांना रस्त्याची दुसरी तितक्याच ताकदीची दुसरी बाजू होतीच. मोठ्ठी चक्कर अनुभवता आली. काय ती भव्य दिव्य फर्निचर ची दुकाने, ओळीने, दुतर्फा, अबब च. भले मोठे रस्ते काय, उड्डाणपुलं काय, बागबगीचे काय, अहाहा च.  

एकंदरीतच अनुभवलेला नागपुरी बाणा (मधुर रसाळ नेहेमीच) वाखाणण्यासारखाच होता. माझ्या माहेरच्या गावचं पाणीच वेगळं आहे, त्यामुळे अशीच मंडळी असणार, खुलल्या स्वभावाची, अनोळखी व्यक्तीला पण आपलंस करून घेणारी अशी, पुन्हा पुन्हा भेटावसं वाटणारी अशी. क्या बात है? सहीच. 

"अश्या भेटी होती आणिक स्मृती ठेवुनी / देऊनी जाती". 


बचत पिंड


स्वभाव असतो का घडतो का घडविला जातो हे मला आज सुस्पष्ट झालं. 

मला समजायला लागल्या पासून फक्त माझ्याच घरात नाही तर आजूबाजूला, शेजारीपाजारी आणि सर्वत्रच एक घोष वाक्य ऐकत आम्ही सर्व जणी मोठ्या झालो. "सासरी जायचं आहे". बसणं, उठणं, सवयी, खर्च ई. सगळं म्हणजे सगळं सासरी जायचं आहे ह्यांच्याशीच कसं निगडित होतं कोणास ठाऊक? पैसे अगदी सांभाळून खर्च करायचे, कारण एक तर वडिलांचे आहेत, खरंच गरज आहे का?, अशीच सवय टिकून राहिली तर? त्यामुळे सातत्याने अकुंश ठेवला जायचा, गरज नसतांना, परिस्थिती असतांना देखील. असं होता होता स्वतः कमवायला लागल्यावर ५०% बचत करायची असे वडिलांनी सांगितले. कुठे ठेवायचे ते पैसे हि दिशा दाखवली. उरलेले पैसे गाडीच्या सर्व्हिसिन्गला, इंधनाला, वाढदिवस वगैरे अश्या ठिकाणी, किंवा घरी आई वडिलांना काही छोटं मोठं आणण्यात खर्च होत असतं. हे सगळं करते वेळी वाटलं कि सासरी गेलं कि सगळंच आलबेल असणारच, म्हणजे दुसरे मत नव्हते, कुठलेही स्वप्न नव्हतेच, खात्रीच होती. पण तेथे पण जपून वापरणे च पदरी पडले. किंवा इतक्या वर्षांची सवय एकदम मोडली नाही. मग घरासाठी, मुलांची फी, हे - ते खर्च, सरकारी नोकरी नसल्यामुळे मग नंतरच्या वेळी / उतार वयात कामी येतील म्हणून ठेवले गेले काही. जोडीदाराने भरपूर खर्च केले पण कुठेतरी ती कुणकुण होतीच, स्वछंद वागता आलेच नाही.  आता काय इच्छा निवृत्ती, त्यामुळे अजूनच फुंकून मार्गक्रमणा. आजचीच ताजी पिटुकली गोष्ट. काहीही कारण नसतांना मनात आलेली. दोन कंपन्यांची टाल्कम पावडर ची किंमत बघितली. नेहेमीची पावडर फक्त मंद सुगंध देते आणि दुसरी बघितली ती कमी किमतीत (डील सुरु असल्यामुळे) पण अत्तर किंवा परफ्युम लावल्याचा आनंद देते, एक दगडात दोन ... मग का नाही घेऊ मी. मनाला शिवले कि दोन जिन्नस घेण्या ऐवजी एकाच घेऊ. 

जडण घडण, आजूबाजूचे तेव्हाचे वातावरण असे होते कि उद्या माझीच मुलं कमवायला लागल्यावर त्यांच्या पुढे हात कधीच पसरवणार नाहीच. 

म्हणजे बचत हा पिंड / स्वभाव झाला आहे माझा किंवा माझ्या वेळच्या मराठी, साध्या, मध्यमवर्गीय मुलींचा. हवे तेव्हा, हवे तेवढे खर्च करतो, केला आहे, कंजूस नक्कीच नाही, रडत बसत नाही पण हात राखून म्हणतात ना तसे काहीसे. चांगली सवय लावली आहे कळत - नकळत. त्यामुळे थोडे तरी बाजूला राहिले आता. कशी मज्जा असते नाही. नोकरी करणारी मी, किंवा माझ्या सारख्या चाकरमान्यांना नाही भावात कोणालाच पैसे मागायला आणि उडवायला. तक्रार अजिबात नाही, खूप म्हणजे खूप धूम केली जेवढं होतं तेवढ्यात, सगळ्यांनीच हं, आई बाबांनी, लग्नाच्या आधी, लग्नानंतर, मुलांसोबत, हे खूप मस्त आहे आणि शिकवणारं असं, खूप समाधान आहे. जमिनीवर पाय  घट्ट रोवून आहेत हे सगळ्यात महत्वाचं.   

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...